भुईंज : सध्या समाजात एका बाजुला आर्थिक डामडौलात सोहळे होताना दिसत असून दुसर्या बाजुला आर्थिक अडचणीमुळे कौंटुबिक जीवन अडचणीत आल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. हे चित्र बदलावयाचे असल्यास आपण सर्वांनी संतपरंपरेतील दान देण्याच्या वृत्तीला अंगीकारत एकमेकांना दिलासा देण्याचे काम करण्याची गरज आहे. यासाठी समाजप्रबोधानाची गरज असून यासाठी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या सोहळ्याची मोठ्या प्रमाणात गरज आहेे. काल्याचे किर्तन म्हणजे सामाजिक ऐक्याचा संदेश आणि प्रेमाचे खर्या अर्थाने दर्शन असून या सोहळ्यातून हे दर्शन सर्वदुर पोहचविण्यात किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले व त्यांचे व्यवस्थापन यशस्वी ठरले असल्याचे प्रतिपादन, श्री क्षेत्र आळंदी येथील अमृतनाथ स्वामीमहाराज संस्थेचे ह.भ.प. महंत पुरूषोत्तमदादामहाराज पाटील यांनी काल्याच्या कीर्तनात व्यक्त केले. दरम्यान, आज नामयज्ञ सोहळ्याबरोबरच कृषी व पुष्प प्रदर्शनाची सांगता कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प.बबनबुवा सापते, जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती प्रल्हादराव चव्हाण, मोहनराव भोसले व संचालक मंडळाची प्रमुख उपस्थितीत झाली.
ह.भ.प. पुरूषोत्तमदादा महाराज पाटील पुढे म्हणाले, भगवंत नेहमी आपल्या भक्तावर प्रेम करीत असतो. जगाने आपला कितीही तिरस्कार केला तरी भगवंताने आपल्याला अंगीकारले पाहिजे. किर्तनाने मनुष्य घडला पाहीजे. परमार्थाने अहिताची, अज्ञानाची निवृत्ती तर हिताची आणि ज्ञानाची स्वीकृती होत असते. सुख ही अशी अवस्था आहे ती प्रत्येकास अनुभवता आली पाहीजे, त्यासाठी संसारामध्ये परम्यात्माला आपलेसे केल्याने सुखाची अनुभती लाभते . आज वृक्ष लागवडीच्या बातम्या पाहावयास मिळतात. परंतू ती झाडे जगविण्याबाबत निरूत्साह आहे. किसन वीर कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांनी निसर्गाप्रती एकनिष्ठ राहत असंख्य झाडे नुसती लावली नाहीतर ती चांगल्या प्रकारे जोपासली आहे. याबाबत त्यांना व त्यांच्या व्यवस्थापनास धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे. गेल्या पंधरा वर्षापासून आयोजिलेला हा सोहळा समाजमनाला अध्यात्मिक दिलासा देणारा ठरेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान यावेळी किसन वीर कारखाना प्रायोजित शिवाजी विद्यापीठाकडून दिला जाणारा वेणुताई चव्हाण स्मृति पारितोषिक जाहीर झाल्याबद्दल कारखान्याच्यावतीने आजच्या कार्यक्रमात प्रियांका अशोक कुंभार (रा. देगाव रोड, सातारा) हिचा कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले आणि ह.भ.प. महंत पुरूषोत्तमदादामहाराज पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. झी मराठीवर गाजत असलेली लागीर झालं जी या मालिकेतील अजिंक्य शिंदे व टिमने वारकर्यांसमवेत मंडपामध्ये प्रसादाचा आस्वाद घेतला. कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी अखंड नामयज्ञ सोहळा समितीस कायम स्वरूपी देणगीरूपाने वीणा आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट दिली.
गेले चार दिवस राज्यातील विविध कीर्तनकार, प्रवचनकार यांनी आपल्या अमोघ आणि रसाळ वाणीने उपस्थित असंख्य वारकरी आणि कार्यक्षेत्रातील शेतकर्यांना मंत्रमुग्ध केले. सोहळ्यातील अन्य कार्यक्रम आणि यानिमित्ताने आयोजित कृषी आणि पुष्प प्रदर्शनामुळे किसनवीरनगरीला प्रतीपंढरीचे स्वरूप आले होते. अखंड नामयज्ञ सोहळ्यात चार दिवस सहभागी झालेल्या साधक, वाचक, मृदंगमनी, टाळकरी यांचा सत्कार कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले व संचालक मंडळाने केला. तसेच कृषी प्रदर्शन यशस्वी करणेसाठी परिश्रम घेतलेल्या व या प्रदर्शनात सहभागी झालेल्या विविध कंपन्या व कृषी उत्पादकांचा सत्कारही करण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष मदनदादा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ, कार्यकारी संचालक अशोकराव जाधव यांच्यासह कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, वारकरी, पुरूष-महिलांनी महाप्रसाद वाटप नियोजनबद्ध करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
काल्याच्या कीर्तन सोहळ्यातून किसनवीरचा सामाजिक ऐक्याचा संदेशः ह.भ.प. पुरूषोत्तम दादामहाराज पाटील
RELATED ARTICLES