सातारा : खा.श्री. छ. उदयनराजे भोसले हे छत्रपतींचे तेरावे वंशज आहेत. त्यामुळे त्यांची कॉलर नेहमीच ताठ असते. परंतू काहीजण त्यांच्यावरील निष्ठा दाखविण्यासाठी कॉलर उडवत असतात. वास्तविक त्यांच्या विचारांचे अनुकरण झाले पाहिजे, असे मत सातार्यातील ज्येष्ठ नागरिक व सेवानिवृत्त शिक्षक व्यक्त करु लागले आहेत.
सातारा जिल्ह्याची ओळख ही क्रांतिकारक जिल्हा अशी असली तरी अलिकडच्या काळात छ. उदयनराजे भोसले यांच्यामुळे ही ओळख छत्रपतींचा सातारा अशी झाली आहे. कारण त्यांचा रोखठोक स्वभाव व वाट्टेल ते झाले तरी माणुसकीसाठी धडपडणारे राजे, ही गरीबांच्या मनातील प्रतिमा आजही कायम आहे. ऐन तारुण्यात पितृछत्र हरपल्यामुळे एवढ्या मोठ्या घराण्यातील व्यक्तीलासुद्धा सामान्यासारखे जीवन जगावे लागले. तसेच शिक्षणासाठी घराच्या बाहेर पडावे लागले. प्रॉडक्शन इंजिनिअर म्हणून त्यांनी पदवी घेतलेली आहे. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा त्यांचा अभ्यास वाखाणण्याजोगा आहे. अलिकडच्या काळात पाच ग्रॅम सोन्याची चेन गळ्यात असली तरी शर्टची दोन बटणे काढून ती चेन दाखवण्याची अनेकांना हौस असते. परंतू छ. उदयनराजेंकडे सव्वा कोटींचे सोन्याचे दागिने असूनसुद्धा त्यांनी विजयादशमी दिन वगळता कधीही अंगावर गुंजभर सोनेही घातलेले नाही. त्यांच्या हातातील मोबाईल हा स्मार्टफोन नसून फक्त कॉलिंगसाठी ते वापरतात. विशेष म्हणजे इंटरनेटच्या जमान्यात ते व्हॉटसअॅप, फेसबुकसुद्धा पाहत नाहीत. तरीही मतदारसंघात फुल्ल कव्हरेज असणारे खासदार अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांच्या आवडीचे खाद्य म्हणजे पोहे आणि चॉकलेट आहे. निवडणुकीच्या काळात मटकी, साधा भात, चपाती असे त्यांचे खाद्य आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते उद्योजकांपर्यंत अनेकजण त्यांना भेटायला येतात. त्या प्रत्येकाची समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी ते पुढाकार घेतात. अलिकडच्या काळात साध्या ग्रामपंचायत सदस्याकडे जरी कोणी किरकोळ काम घेवून गेले तरी त्याला दोन-चार हेलपाटे मारावे लागतात, असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. त्यामुळे खा. उदयनराजेंचे अनुकरण करायचे असेल तर त्यांची स्टाईल नाही, तर ते ज्या पद्धतीने सर्वसामान्यांचे काम करतात, याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
निवडणुकीच्या धामधुमीत नाष्टा, जेवण करण्यास उशीर होत असला तरी खा. उदयनराजे जेव्हा नाष्टा व जेवण करण्यासाठी बसतात, तेव्हा पहिला घास घेण्यापूर्वी त्याठिकाणी उपस्थित सर्वांनी नाष्टा, जेवण केले आहे का? असा आपुलकीचा प्रश्न विचारतात आणि त्यानंतर ते घास घेणारे छत्रपती आहेत. अनेकजण त्यांच्या समवेत असल्यामुळे त्यांचाही गौरव केला जातो. त्यांनीसुद्धा आता अनुकरण केले पाहिजे.
कारण सध्या छत्रपती उदयनराजे यांच्या वलयामुळे अर्ज दाखल करताना झालेली गर्दी पाहून अनेकांना त्यांचा हेवा वाटत आहे.या गर्दीमध्ये खेड्यापाड्यातून आलेले शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य महिला व आघाडीचे कार्यकर्ते उन्हातान्हाची पर्वा न करता उदयनराजेंसाठी पाच तास राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत थांबले होते. हा करिष्मा फक्त उदयनराजेच करु शकतात. कारण ते नुसतीच कॉलर उडवत नाहीत, तर अनेक मान्यवरांच्या विचारांचे अनुकरण करुन माणुसकी जपतात, याकडेही आता त्यांचे नाव घेणार्या कार्यकर्त्यांनी अनुकरण करुन खरे छत्रपतींचे मावळे आहोत, हे सिद्ध करावे असे आता सांगण्याची गरज निर्माण झाली आहे.
नुसतीच कॉलर उडवू नका! त्यांच्या विचारांचेही अनुकरण करा
RELATED ARTICLES