कोरेगाव : नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव नगरपंचायतीची विकासाकडे वाटचाल सुरु असून, नजिकच्या काळात हे शहर स्मार्ट सिटी म्हणून निश्चितच ओळखले जाईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आ. शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.
कोरेगाव नगरपंचायतीच्यावतीने शहर विकास आराखड्यासाठी नव्याने सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून, त्याचा शुभारंभ मंगळवारी आ. शिंदे यांच्या हस्ते झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष जयवंत पवार, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय पिसाळ, यात्रा कमिटीचे अध्यक्ष शहाजीराव बर्गे, शिवाजीराव साळुंखे, विलासराव बर्गे, रामभाऊ बर्गे, उदयसिंह बर्गे, गजानन बर्गे यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते.
आ. शिंदे पुढे म्हणाले, गेल्यावर्षी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निर्विवाद सत्तेचा कौल दिला. पक्षाने शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राजाभाऊ बर्गे यांच्याकडे नगरपंचायतीची सत्ता सुत्रे दिली, त्यांनी आपल्या कार्यकालामध्ये अनेकविध विकास योजना मार्गी लावल्या असून, जनतेची प्रलंबित कामे पूर्णत्वाकडे नेली आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची सांगड घालत त्यांनी विकासात्मक वाटचाल सुरु ठेवली असून, आजवर शहराचा विकास झाला नाही, तेवढा नजिकच्या काळात होणार असून, हे शहर स्मार्ट सिटी म्हणून राज्यात गणले जाईल, असा मला विश्वास आहे, असेही आ. शिंदे यांनी नमूद केले.
राजाभाऊ बर्गे म्हणाले, नगरपंचायत नव्याने अस्तित्वात आल्याने नागरी सुविधा दर्जेदार व अधिक स्वरुपात पुरविण्याची जबाबदारी असून, ती आम्ही निश्चितपणे पार पाडत आहोत. आ. शिंदे यांच्या सततच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला शहरासाठी विकासाचे नवीन धोरण हाती घेता आले आहे. आजवर कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव शासनस्तरावर पाठविण्यात आले आहेत. नजिकच्या काळात या प्रस्तावांना मान्यता मिळणार आहे. रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या पाणी पुरवठा केंद्राचा कायापालट केला जाणार असून, तेथे नव्याने आधुनिक इमारत, पंपिंग स्टेशन व बागबगीचा विकसीत केला जाणार आहे. आ. शिंदे यांच्या पुढाकारामुळे या कामासाठी सुमारे पाऊण कोटी रुपयांची तरतूद झाली आहे. शहराचा साचेबंद विकास करता यावा, प्रत्येक प्रभागात मूलभूत सोईसुविधा देता याव्यात यासाठी नव्याने शहर विकास आराखड्याचे सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. त्याचा देखील आज शुभारंभ झाल्याने नजिकच्या काळात शहराचा प्रत्येक विभागात बागबगीचा, खेळाचे मैदान आदी सुविधा देता येणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जयवंत पवार, संजय पिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. भैरवनाथ शहाजीराव बर्गे यांनी स्वागत केले. मुख्याधिकारी पूनम कदम-शिंदे यांनी प्रास्ताविक केले. किशोर बर्गे यांनी आभार मानले. कार्यक्रमास नगरसेवक राजेंद्र बर्गे, नागेश कांबळे, बच्चूशेठ ओसवाल, महेश बर्गे, नगरसेविका सौ. संगीता बर्गे, सौ. मंदा बर्गे, सौ. शुभांगी बर्गे, सौ. साक्षी बर्गे, सौ. रेश्मा जाधव, सौ. शोभा येवले, सौ. सुलोचना फडतरे, सौ. पूनम मेरुकर, दिलीप बर्गे, नवनाथ बर्गे, सुनील बर्गे, राहूल र. बर्गे, अमरसिंह बर्गे, गणेश धनावडे, दीपक फडतरे, महादेव जाधव, अमोल मेरुकर, गणेश येवले सुरेश शिंदे, संभाजी शिंदे, अजिज पठाण, विनोद गोरे, अजित पवार, प्रकाश ता. बर्गे, संजय पवार, सुनील पवार, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
एक कोटींच्या कामांना सुरुवात : नगराध्यक्ष
आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी रेल्वे स्टेशन समोरील पाणी पुरवठा केंद्र व बागबगीचाची नव्याने उभारणी, शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांची देखभाल-दुरुस्ती, नव्याने शहर विकास आराखड्याचे सर्वेक्षण आदी कामांचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी सुमारे एक कोटीहून अधिक रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या कामांमुळे नजिकच्या काळात शहरातील विकासकामे जलदगतीने मार्गी लावली जाणार असल्याचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले.