पाटण:- “समन्यायी विकास, सर्वांचा विकास” या सूत्रानुसार डॉ भारत पाटणकर यांच्या नेतृत्वात श्रमिक मुक्ती दलाच्या झेंड्याखाली राज्यातील ९ जिल्ह्यासह पाटण तालुक्यातील कोयनानगर येथे १२ फेब्रुवारीला सुरू केलेले कोयना प्रकल्पग्रस्तांचे दुसऱ्या टप्प्यातील निर्णायक ठिय्या आंदोलन १८ व्या दिवशी शेवटच्या निर्णायक टप्प्यात येऊन ठेपले आहे. कोयना प्रकल्पग्रस्त जनता उद्या शनिवारी निघणार्या लाँगमार्चला सज्ज झाली आहे.
कोयना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात लवकरच बैठक होणार अशी चर्चा सुरू असताना प्रत्यक्ष मुख्यमंत्री कार्यालयाकडून श्रमिक मुक्ती दलास बैठकीचे पत्र येत नाही. त्याशिवाय आम्ही लाँगमार्च स्थगित करणार नाही असा ठराव कोअर कमेटीने केला असून त्यानुसार उद्या शनिवार दि २ रोजी सकाळी १० वाजता कोयनानगर येथून लाँगमार्चस सुरूवात होणार असुन वृद्ध व ज्या प्रकल्पग्रस्तांना चालणे शक्य नाही असे प्रकल्पग्रस्त स्त्री पुरुष आंदोलन स्थळीच ठिय्या कायम ठेवनार आहेत.
दरम्यान या लाँगमार्चसाठी सातारासह रत्नागिरी, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलनास बसलेले प्रकल्पग्रस्त कोयनानगर येथे शुक्रवारी मुक्कामी मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. कोयनानगर ते मंबई पर्यंत निघणार्या लाँगमार्चच्या मुक्कामाची ठिकाणे निश्चित झाली असून सातारा येथे पोहोचल्यावर प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी यांना जाब विचारण्याचा निर्धार केला आहे. साता-या पासुन पुढे पनवेल पर्यत सुमारे २५ हजार प्रकल्पग्रस्त जनता लाँगमार्चमध्ये सामिल होणार असून पनवेल पासुन पुढे सुमारे ५० हजाराच्या संख्येने प्रकल्पग्रस्त मंत्रालयावर धडकणार आहेत. या मध्ये नोकरी धंद्या निमित्त मुंबई, ठाणे, उपनगरात वास्तव्यास असलेले प्रकल्पग्रस्त सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याने हा लाँगमार्च सरकारला जड जाण्याची शक्यता असुन प्रकल्पग्रस्त जनता पेटून उठली आहे.
मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्याची मानसिकता दिसत आहे. आम्ही मागतो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी. “सर्वांचा विकास व समन्यायी विकास” हे आमचे सुत्र आहे, तरी लोकांना चालायला लाऊ नका. अश्रुंच्या ठिणग्या बनू देऊ नका. असा इशारा श्रमुदचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर यांनी या पुवीॅच सरकारला दिला आहे.