सातारा : कोयना अभयारण्य प्रकल्पग्रस्तां अनेक मागण्या प्रलंबीत आहेत. पुर्नवसनासह पुनर्वसनाच्या ठिकाणी घर, प्लॉट मिळाला पाहिजे. यासह इतर काही प्रमुख आणि रास्त मागण्या प्रकल्पग्रस्तांच्या असून या सर्व मागण्या तातडीने पुर्ण करा. प्रकल्पग्रस्तांना भेडसावणार्या समस्या त्वरीत सोडवा, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी वन विभागाच्या अधिकार्यांना केल्या.
जावली तालुक्यातील खिरखंडी, आडोशी, माडोशी, रवंदी, कुसापूर आदी गावे कोयना अभयारण्य क्षेत्रात येतात. या गावातील 54 प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवण्यासासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृह येथे वन विभागाच्या अधिकार्यांसमवेत बैठक झाली. या बैठकीत आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. बैठकीला कोयना अभयारण्य प्रकल्पग्रस्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम पवार, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक (कोल्हापूर) डॉ. विनिता व्यास, सहायक वनसंरक्ष (वन्यजीव) सुरेश साळुंखे, वनक्षेत्रपाल (फिरते पथक) श्रीमती ज्योती घोरपडे, मेट इंदोली वनपाल (वन्यजीव) योगेश गावित यांच्यासह तानाजी जाधव, अशोक जाधव, आनंद कदम, सीताराम जाधव, एकनाथ जाधव, नारायण जाधव आणि प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
सदर 54 खातेदारांना पुर्नवसनाच्या ठिकाणी घरप्लॉट मिळवेत. 2019 पर्यंत 18 वर्ष पुर्ण असणार्या प्रकल्पग्रस्तांना वयोमर्यादा वाढवून तसा शासन निर्णय करण्यात यावा. तसेच त्यांना घरप्लॉट मिळावा आणि पर्यायी जमीन देण्यात यावी. 18 वर्ष पुर्ण झालेल्या खातेदारांना शासकीय नोकरी मिळावी तसेच त्यांना प्रकल्पग्रस्त दाखला देण्यात यावा. याशिवाय या खातेदारांना प्राधान्याने वन विभागामध्ये नोकरी मिळावी. तसेच ज्या खातेदारांचे अद्याप पुनर्वनस झालेले नाही त्यांना लाँच प्रवासाची सवलत देण्यात यावी आदी मागण्यांबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली. या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेवून प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडवा, अशा सुचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित अधिकार्यांना केल्या. आमच्या अखत्यारित बाबींची तातडीने पुर्तता केली जाईल आणि वरिष्ठ पातळीवरील मागण्यांबाबत वरिष्ठांना लेखी स्वरुपात कळवून योग्य तो मार्ग काढला जाईल, असे डॉ. व्यास यांनी यावेळी सांगितले.
कोयना अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडवा
RELATED ARTICLES