सातारा : सातारच्या राजकारणाचा महामेरू माजी खासदार व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे जेष्ठ संचालक लक्षमणराव पाटील (तात्या) यांचे काल निधन झाले. आज शुक्रवारी सकाळी त्यांच्या जन्मस्थानी बोपेगाव ता. वाई या गावात त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जनसागर लोटला होता. सकाळी 7 वाजल्यापासून जिल्ह्यातून मिळेल त्या वाहनाने तात्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अबाल वृद्धांपासून सर्व जण बोपेगावमध्ये अंत्यसंस्कार ठिकाणी थांबले होते. सर्वांच्या नजरा त्यांच्या पार्थिवाकडे लागल्या होत्या. यावेळी
मान्यवरांनी तात्यांच्या आठवणींना उजाळा देऊन श्रद्धांजली अर्पण केली. दरम्यान मिलींद पाटील, आ. मकरंद पाटील, नितीन पाटील या तीन पुत्रांनी 11.46 वाजता लक्षमणराव पाटील (तात्या) यांच्या पार्थिवला अग्नी देण्यात आला.
यावेळी सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, विधान परिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. शंभूराज देसाई, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा बँकचे उपाध्यक्ष सुनील माने, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माजी सौ. अरुणादेवी पिसाळ, रणजीत नाईक-निंबाळकर, अशोक गायकवाड, साहेबराव पवार, बकजीराव पाटील, शंकरराव गाढवे, भिमराव काका पाटिल, सारंग पाटील, बाबाशेठ तांबोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तेजस शिंदे, सातारा जिल्हा बँकचे सरव्यवस्थापक राजेंद्र सरकाळे, सुरेश वीर, शिवाजीराव महाडीक, प्रल्हाद चव्हाण, धैर्यशील कदम, सुधीर धुमाळ, डॉ. रमेश पाटील, राजेश पाटील-वाठारकर, महाबळेश्वर पालिका नगरसेवक कुमार शिंदे, पुरुषोत्तम जाधव, नरेंद्र पाटील, नितीन भरगुडे-पाटील, प्रकाश गवळी, राजेंद्र शेलार, हणमंतराव चवरे, पै. नंदकुमार विभूते यांच्यासह सर्वच राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, तात्यांनी मला मोठे सहकार्य लाभले आहे. अजिक्यतारा कारखाना अडचणीत असताना त्यांचे मोलाचे सहकार्य मिळाले होते. तात्यांमुळे आज देशात सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उंची वाढली आहे. पारदर्शक कारभार कसा करावा हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
आ. शशिकांत शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील जेष्ठ नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले. काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केल्या नंतर त्यांनी आजाराला झुंज दिली. तात्यांच्या जाण्याने जिल्ह्यात पोकळी निर्माण झाली आहे. कार्यकर्ता पोरका झाला आहे.
खा. उदयनराजे म्हणाले, तात्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण झाली. आमच्या वडीलांचे 1978 ला निधन झाले. त्यावेळी त्यांनीं अनेकदा आमच्या घरी येऊन आपुलकीने चौकशी करत होते. कॉलेज जीवनापासून त्यांचे मला सहकार्य मिळाले आहे.
ना. रामराजे म्हणाले, त्यांचे आजारपण मला बघण्याचे धाडस झाले नाही. इच्छा शक्ती प्रबळ होती म्हणून त्यांनी अशा आजारी पणाला गेले महिनाभर झुंज दिली. तात्यांनी घालून दिलेले विचार तरुण पिढीने पुढे नेण्यासाठी काम केले पाहिजे एवढेच मी या ठिकाणी बोलून श्रद्धांजली अर्पण करतो.
माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणाले, माणसाने जीवनात नीटनेटके कसे राहावे तात्यांकडून शिकावे. आम्ही दोघांनी संसदेत एकत्र काम केले. असा सहकारी आपल्यातून निघून गेले याचे मोठे दुःख झाले आहे.
यावेळी गेले दोन तास अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण करताना तात्यांनी केलेल्या सहकार्याचा जाणीवपूर्वक उल्लेख केला. राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, विठ्ठल माने यांनी यावेळी सूत्रसंचालन केले.
लढवय्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बोपेगावला उसळा जनसागर
RELATED ARTICLES