Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीमाजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यावर शुक्रवारी सकाळी 10 वाजता बोपेगाव येथे होणार...

माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्यावर शुक्रवारी सकाळी 10 वाजता बोपेगाव येथे होणार अंत्यसंस्कार

सातारा : राष्ट्रवादी काँगेसचे जेष्ठ नेते व माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे आज सकाळी मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्यावर  शुक्रवारी सकाळी 10 वाजता बोपेगाव येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचे पार्थिव गुरुवारी संध्याकाळी सव्वासहा विकासनगर येथील कृष्ण विहार कॉलनीतील बंगल्यात आणण्यात आले तेव्हा लक्ष्मण तात्यांच्या अंत्यदर्शनासाठी जनसागर लोटला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे खंदे समर्थक असणार्‍या लक्ष्मण तात्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनाने संपूर्ण सातारा जिल्हयावर शोककळा पसरली आहे.
लक्षमणराव पाटील यांचा जन्म वाई तालुक्यातील बोपेगाव येथील एका सर्व सामान्य शेतकरी कुटुंबात 25 फेब्रुवारी 1938 रोजी झाला होता.
लक्षमणराव पाटील यांची राजकीय कारकीर्द स्व. किसन वीर आबा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाली होती. बोपेगावच्या सरपंच पदापासून त्यांचा खर्‍या अर्थाने राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर तात्यांनी राजकारणात कधीही मागे वळून पाहिले नाही. तात्यांनी राजकारण, समाजकारण करताना सडेतोड बाणा कधीही सोडला नाही. राजकारणातले त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्पष्ट वक्तेपणा आणि पक्षाने किंवा पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणे ही होती. किसनवीर आबांनी दिलेल्या अनेक जबाबदार्‍या तात्यांनी चोखपणे पार पाडल्या होत्या. तात्या राजकारण करताना मैत्रीला कधीही विसरले नाहीत. माजी खासदार प्रतापराव भोसले आणि लक्षमणराव पाटील यांची मैत्री जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. अलीकडच्या काळात भोसले व पाटील घराण्यात राजकीय विरोध असला तरी तात्या आणि भाऊंच्या मैत्रीत कधीही राजकारण आले नाही. लक्षमणराव पाटील यांनी मैत्रीला मैत्री आणि विरोधाला विरोध करत जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे.
लक्षमणराव पाटील हे खा. शरद पवारांचे कट्टर निष्ठावंत मानले जातात. गेल्या काही वर्षापासून लक्ष्मण तात्या पार्किसन्स या दुर्धर आजाराने ग्रस्त होते. गेल्या महिन्यात त्यांच्या प्रकृतीचा आलेख सतत वर खाली होत होता . विशेष उपचारांसाठी तात्यांना मुंबईच्या जसलोक रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र गुरूवारी मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. गुरुवारी सकाळपासूनच लक्ष्मणराव पाटील यांच्या निधनाचे वृत्त कळताच तात्यांचे मूळ गाव बोपे गाव व सातारा विकास नगर येथील बंगल्यात आप्तेष्ट मित्रपरिवार यांची रिघ सुरु झाली. जिल्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी भवनामध्ये गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी राजकीय कार्यक्रम रद्द करून सायंकाळी सातार्‍यात हजेरी लावली. पवारांचे पावणेपाच वाजता हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यांनी जिल्हा मध्यवती बँकेच्या दालनात तळ दिला.
यावेळी रामराजे नाईक निंबाळकर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्र राजे भोसले, आमदार बाळासाहेब पाटील, विक्रमसिंह पाटणकर जिल्हाध्यक्ष सुनील माने जिल्हा बँकेचे सर्व संचालक यावेळी उपस्थित होते . मुंबईवरून लक्ष्मण तात्यांच्या पार्थिवाचे आगमन सायंकाळी सव्वासहा वाजता झाले. तत्पूर्वीशरद पवार व राष्ट्रवादीची सर्व मान्यवर नेते मंडळी तात्यांच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होती. कृष्ण विहार कॉलनीतल्या बंगल्यावर कार्यकर्त्या ची प्रचंड गर्दी झाली होती.आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले तरी सुद्धा गर्दी हटत नव्हती. शरद पवार व रामराजे नाईक निंबाळकर यांनी लक्ष्मणता त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले. क्षणभर ज्येष्ठ मित्राच्या आठवणीने पवारही क्षण काळ स्तब्ध झाले. त्यानंतर तात्यांच्या अंत्यदर्शनाला सुरवात झाली. रात्री उशिरा तेथून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रवादी भवन येथे सुद्धा लक्ष्मणराव पाटील यांचे शेवटचे दर्शन घेण्यात येउन अभिवादन करण्यात आले.
तात्यांचा कळीचा मुत्सद्दीपणा :
लक्ष्मणराव पाटील यांनी 1999 साली पवारांच्या सांगण्यावरून काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा खांद्यावर घेतला. आणि संपूर्ण सातारा जिल्हा राष्ट्रवादी मय करत काँग्रेसला बँकफूटवर ढकलले . त्यावेळी सातारा जिल्ह्यातुन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणारे तात्या हे पहिले पदाधिकारी होते. शरद पवार यानीही तात्यांवर विश्वास दाखवत तात्यांकडे राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. तात्यांनी सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची मजबूत घडी बसवली होती. तात्या राष्ट्रवादीचे जिल्हाअध्यक्ष असताना पक्षाला 1999 च्या विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यातून 9 आमदार निवडून आले होते. आणि ते स्वतः व श्रीनिवास पाटील खासदार म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटिल यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणून आमदार करण्याचा तात्यांचा मोठा वाटा होता.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular