(अजित जगताप)
वडूज दि: महाराष्ट्राच्या विधिमंडळाची मुदत संपण्यास अडीच महिन्याचा अवधी आहे .सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चा बांधणी सुरू केलेली आहे. महायुती विरोधात महाविकास आघाडी अशीच राजकीय लढत होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक उत्सुकता लागलेल्या माण- खटाव विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते व हरणाई सूतगिरणीचे प्रमुख रणजीतसिंह भैय्या देशमुख यांना संधी दिली तर महाविकास आघाडी घटक पक्षातील राष्ट्रीय काँग्रेसचा विजय म्हणजेच जीत निश्चित मानली जाऊ लागलेली आहे.
सातारा शासकीय विश्रामगृहात माण- खटाव तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते आ .पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. अशी माहिती राष्ट्रीय काँग्रेस अधिकृत सूत्रांनी दिली आहे.
माण व खटाव तालुक्यात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्राबल्य राहणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आलेले आहेत. खटाव तालुक्यामध्ये ५६ व माण तालुक्यामध्ये २१२ मतदान केंद्र आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या सर्वच नेते व कार्यकर्त्यांनी एकजुटीने , एका विचाराने प्रचार यंत्रणा राबवली. त्यामुळे धनशक्तीचा वापर करून सुद्धा भाजपच्या महायुतीला म्हणावे इतके यश मिळाले नाही. अवघ्या सहा हजाराचे मताधिक्य म्हणजे विद्यमान आमदाराविरोधात नाराजीचे सूर असल्याचे दिसून आलेले आहे. अशी आकडेवारी सुद्धा कार्यकर्त्यांनी मांडली. राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची माण व खटाव तालुक्यातील राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज साताऱ्यात भेट घेतली. महाराष्ट्राच्या विधानसभा मतदार संघासाठी आतापासूनच महाविकास आघाडी एकजुटीने काम करत आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या हाताचा पंजा व युवा नेते रणजीतसिंह देशमुख यांना उमेदवारी दिल्यास पुन्हा एकदा या मतदारसंघात राष्ट्रीय काँग्रेस तथा महाविकास आघाडीचा उमेदवार निश्चित निवडून येऊ शकतो. अशी खात्री सर्वच कार्यकर्त्यांनी दिली आहे.
माण व खटाव तालुक्यामध्ये विकास कामातून मान उंचावण्यासाठी युवा नेते रणजीतसिंह भैय्या देशमुख यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे. देश व राज्य पातळीवरील सर्वच नेते त्यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास ठेवत आहेत. त्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाल्यास खऱ्या अर्थाने माण व खटाव तालुक्यातील स्वाभिमानी जनता राष्ट्रीय काँग्रेसच्या हाताच्या पंजाला मतदान करून स्वाभिमान दाखवून देखील. असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
खटाव तालुका राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष डॉ. संतोष गोडसे , ऍड. पी. डी. सावंत, राहुल सजगणे, दादासाहेब माने, इम्रान बागवान, राजूभाई मुलाणी, डॉ. महेश गुरव, सुनील फडतरे, विशाल गोरे, निलेश घार्गे, रमेश जाधव, अमरदीप कांबळे, संजय देशमुख, विशाल जगताप यांच्यासह माण व खटाव तालुक्यातील मतदारांनी युवा नेते रणजितसिंह देशमुख यांना उमेदवारी मिळावी. अशी जोरदार मागणी केलेली आहे.
यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अन्वर पाशा खान उपस्थित होते. दरम्यान, माण खटाव मतदारसंघात परिवर्तन साठी महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण तयार झालेले आहे. अशा वेळेला महाविकास आघाडीने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार दिल्यास परिवर्तन ही काळ्या दगडावरील रेष ठरेल. असेही भाकीत राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. ……… ………… … छाया- राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते रणजितसिंह देशमुख यांच्याशी चर्चा विनिमय करताना कार्यकर्ते (छाया- निनाद जगताप सातारा)