Friday, June 20, 2025
Homeताज्या घडामोडीलोकसभा झाली ..... विधानसभेचे काय ?

लोकसभा झाली ….. विधानसभेचे काय ?

वडूज(धनंजय क्षीरसागर) : लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने खटाव व माण या दोन्ही तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ही निवडणूक दोनच प्रमुख पक्षात झाल्याने विधानसभा निवडणूकीसाठी इच्छुक असणार्‍या अनेकांना एकाच पक्षाचा प्रचार करावा लागला. या पार्श्‍वभूमीवर विधानसभा निवडणूक कशी होणार ? याची उत्सुकता अनेकांना लागून राहीली आहे. तर निवडणूकीच्या निमित्ताने राजकीय ध्रृवीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकसभा निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीला फाटा देत विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर समर्थन दिले. उद्याच्या निकालात श्र नाईक निंबाळकर निवडून येण्याबरोबर केंद्रात पुन:श्‍चय एकदा मोदी सरकार आले तर आ. जयाभाऊ अच्छे दिन च्या वाहत्या गंगेत हात धुवून घेण्यासाठी पुढे येणार का याचे औत्सुक्य त्यांच्या समर्थकांसह राजकीय जाणकारांना लागून राहीले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील तसेच करवीरचे माजी गृहमंत्री सतेज पाटील यांची पाऊले याच दिशेने पडू लागल्याने आ. गोरेही असाच निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अश्या प्रकारचा निर्णय घेवून ते भाजपाची उमेदवारी घेणार ? की सोनसळकरांच्या मैत्री धाग्याची वीन कायम ठेवत काँग्रेसच्या निष्ठेचा झेंडा कायम खांद्यावर ठेवणार हे पाहण्यासाठी जनतेला काही काळ थांबावे लागणार आहे.
दुसर्‍या बाजूला माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर व माणचे युवा नेते अनिलभाऊ देसाई हे दोघेजण भाजपच्या उमेदवाराचे नैसर्गिक दावेदार होते. मात्र लोकसभा निवडणूकीत बंडखोर युवा नेते शेखरभाऊ गोरे यांनी वडूज, औंध, दहिवडी, म्हसवड या ठिकाणी मोठमोठे कार्यकत्यांचे मेळावे घेतले. त्याचबरोबर साम, दाम …. नितीचा अवलंब करत पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या पदाधिकार्‍यांना भाजपाचा प्रचार करण्यास भाग पाडले. त्यामुळे आ. गोरेंनी नकार दिल्यास भाजपाच्या उमेदवारीसाठी शेखरभाऊंचेही नांव अचानक पुढे आल्यास कोणास आश्‍चर्य वाटणार नाही.
दुसर्‍या बाजूला लोकसभेसाठी जय्यत तयारी केलेल्या निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्याकडे माण मतदारसंघाची निवडणूकीतील सुत्रे देण्यात आली होती. त्यामुळे उद्या कदाचित माण व इंदापूर मतदारसंघाची आदलाबदल झाल्यास देशमुख साहेबांनाही विधानसभेच्या घोड्यावर बसवले जावू शकते. दहिवडी येथे झालेल्या लोकसभेच्या प्रचार सभेत शरद पवारांच्या उपस्थितीत श्री. देशमुखांच्या भाषणात चांगलाच जोश व आत्मविश्‍वास जाणवत होता. असे असले तरी प्रत्यक्षात माण तालुक्यात आघाडीच्या उमेदवारास किती मते मिळणार त्यावर श्री. देशमुखांचे भवितव्य अवलंबून राहील. तर माणच्या तुलनेत खटावमध्ये आघाडीस चांगले मतदान मिळाले तर विधानपरिषदेचे माजी आमदार प्रभाकर घार्गे हेही उमेदवारीसाठी दावा करु शकतात. त्याचबरोबर लोकसभा निवडणूकीत प्रभावी कामगिरी करण्याबरोबर सभापती पदावरुन पायऊतार होवूनसुध्दा पै. संदिप मांडवे यांनी आपला जनसंपर्क कायम ठेवला आहे. या जनसंपर्काच्या जोरावर पै. पिंटू पैलवान आतली टांग लावत एखाद्या मोठ्या मल्लाचा एकेरीपट काढत ढाक लावणार का ? याबाबतही सर्वसामान्य कार्यकत्यांना औत्सुक्य आहे.
लोकसभा प्रचारात दहिवडी येथील सभेत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर फलटणला जाण्याच्या घाईत केवळ पाच वाक्य बोलले. पण त्यांच्या एका वाक्यामध्ये मोठा मतितार्थ दडला आहे. त्यांनी भाषणात दुष्काळाबरोबर गोरे बंधूंच्या तथाकथीत दहशतवादाविरुध्द लढणार्‍या कार्यकत्यांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर लोकसभा निवडणूकीनंतर दहिवडीला सभा घेण्यासाठी आवर्जुन येण्याचे सांगितले. तसेच माण ला आपण सोडणार नाही असे छातीठोकपणे सांगितले.
त्यामुळे उद्या कदाचित गोरे बंधू विरुध्द दोन हात करण्यासाठी कोण पुढे येणार नसले तर राजेसाहेब स्वत: मैदानात येण्यास कमी पडणार नाहीत असे सुचित होते. स्वत: लढण्याशिवाय बंधू जि. प. अध्यक्ष संजिवराजे नाईक निंबाळकरांना मैदानात उतरवणे अथवा दुष्काळी भागातील सकस मैदानात पुत्र अनिकेत राजेंचा राज्याभिषेक करुन घेणे हेही दोन पर्याय त्यांच्यासमोर असू शकतात.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular