साताराः राज्यातील सर्वच प्रस्थापित पक्षांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाजाची फसवणूक केली आहे. या लोकसभा निवडणुकीत 48 पैकी एकाही जागेवर धनगर उमेदवारी देखील दिली नाही. म्हणून माढ्यासह 10 जागांवर धनगर समाजाचे उमेदवार निवडणूक लढतील आणि जिंकतील, असा विश्वास धनगर युवा नेते जगन्नाथ जानकर यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
सातार्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी माढा अपक्ष उमेदवार सचिन पडळकर, विनायक मासाळ, अण्णासाहेब सुळ, सचिन होनमाणे, पप्पू शिंगाडे, शिवराज पुकळे, अक्षय वणरे यांच्यासह युवक उपस्थित होते.
धनगर समाजाची महाराष्ट्रात दोन कोटी लोकसंख्या आहे. माढा मतदार संघातून धनगर समाज जास्त असल्याने निवडणूक ताकदीने लढविणार आहे. माढ्यासह दहा लोकसभा मतदार संघातील समाज बांधव व युवकांशी चर्चा करूनच निवडणूक लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कालपर्यंत काँग्रेस- राष्ट्रवादीने धनगर समाजाला फसवले तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा निर्णय घेवू, असे आश्वासन देवून देशात व राज्यात सत्तेत आलेल्या भाजप देखील धनगर समाजाची फसवणूक केली.
सोलापूर विद्यापीठाचे नामकरण केले. त्या निर्णयाचे स्वागत करतो. मात्र, आरक्षणाच्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी नामकरणाचा निर्णय घेण्यासाठी त्यांना निवडणुकीचा मुहूर्त काढावा लागला.
आता लागलेल्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीने जाणीवपूर्वक धनगर समाजाला डावलले आहे. चार ही पक्षांनी एका ही धनगर समाज बांधवाला उमेदवारी दिली नाही. यावरून सर्व राजकीय पक्षांची जातीयवादी भूमिका स्पष्ट होत आहे.
धनगर समाजाला एस टी चे आरक्षण मिळाले तर हक्काचे 10 लोकसभा व 40 विधानसभा मतदार संघातून धनगर समाज्याला प्रीतिनिधी मिळू शकतो.. मात्र, आम्हाला प्रतिनिधित्व मिळूच नये असा प्रस्थापित पक्षांचा डाव आहे.हा डाव उधळून लावण्यासाठी आणि हक्काचे आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी माढ्यासह दहा जागांवर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे धनगर युवा नेते जानकर यांनी सांगितले.
प्रस्थापित पक्षांकडून समाजाची फसवणूक झाल्याने माढासह दहा जागा धनगर लढविणारःजगन्नाथ जानकर
RELATED ARTICLES