वडूज: लोकसभा निवडणूकीचा निकाल 23 मे ला जाहीर झाला. या निवडणूकीत माढा मतदारसंघातून जोरदार मुसंडी मारत भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर मताधिक्याने विजयी झाले. ही निवडणूक मोठी चुरशीची झाली होती. त्यामुळे नेमके कोण निवडून येणार याची शेवटपर्यंत उत्कंठा होती. अशा परस्थितीत अनपेक्षितरित्या खा. नाईक निंबाळकर मोठ्या मताधिक्याने निवडून आले. या मोठ्या मताधिक्यामचा श्रेयवाद व भविष्यातील विधानसभा निवडणूकीची रणनिती डोक्यात ठेवून माण, माळशिरस विधानसभा मतदारसंघात आत्तापासूनच कलगीतुरा सुरु झाला आहे. हा प्रकार म्हणजे नव वराची हळद निघण्यापूर्वीच सुंदोपसुंदी असे झाले आहे. त्यामुळे युतीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यात नाराजी व्यक्त होत आहे. तर विरोधी काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीला आयते कोलीत मिळत आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, लोकसभा निवडणूकीत माण विधानसभा मतदारसंघातून युतीचे उमेदवार नाईक-निंबाळकर यांना सुमारे 23 हजार मताचे मताधिक्य मिळाले आहे. निवडणूकीत रणजितसिंहांची उमेदवारी घेण्यापासून शेवटपर्यंत आ. जयकुमार गोरे कुरवल्याच्या भूमिकेत होते. त्यामुळे श्रेयाचा मोठा वाटाही त्यांच्याकडे जातो. मात्र सर्वच क्रेडिट त्यांना गेले तर त्यांच्या तोडीस तोड प्रचार करणार्या नेतेमंडळींना काय मिळणार ? असा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय बघ्याची भूमिका घेतली तर भविष्यात आमदारांचे नेतृत्व मान्य आहे. असा संदेश जावू शकतो. याचे गांभीर्य ओळखून युवा नेते शेखरभाऊ गोरे व माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर यांनी आ. गोरे यांच्यावर टिकेचा धडाका उठवला आहे.
याबाबत शेखरभाऊ गोरे यांनी पत्रकार परिषद घेवून आ. गोरेंच्या सर्वच कार्यकत्यांनी भाजपाचे काम केले नसल्याचा आरोप केला आहे. तसेच ङ्ग त्यांच्यामुळेच म भाजपा उमेदवाराचे मताधिक्य घटले आहे. ते नेहमीच स्वत:च्या स्वार्थासाठी नौटंकी करतात. असा आरोप केला. आपण स्वत: तसेच आपल्या कार्यकत्यांनी तळागळात जावून प्रचार केल्यामुळेच चांगले मताधिक्य मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तर दुसर्या बाजूला माजी आ. डॉ. येळगांवकर यांनीही सातारा येथे पत्रकार परिषद घेवून स्वत:च्या शैलीत आ. गोरे यांचा समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी पनवेल येथील जमिन घोटाळा लपवण्यासाठीच निवडणूकत भाजपाचे काम केल्याचे ओपन सिक्रेट जाहीर केले. तसेच लायकी नसणार्या लोकांना घेवून नवनिर्वाचित खासदारांनी फिरु नये. असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
माण मतदारसंघात अशी टिकाटिप्पणी सुरु असताना माळशिरस तालुक्यातही भाजपाचे तालुकाध्यक्ष सोपानकाका नारनवर यांनीही माळशिरस मतदारसंघात मिळालेल्या मताधिक्याची टिमकी एकट्या मोहिते-पाटलांनी वाजवू नये. असे मत व्यक्त केले आहे. तसेच वाढत्या मताधिक्यामध्ये भाजपाची पारंपारिक मते, उत्तमराव जानकर व इतर छोटे-मोठे घटक कारणीभूत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
हळद निघण्यापूर्वीच महायुतीत सुंदोपसुंदी
RELATED ARTICLES