मलकापूर: या देशातला मुस्लिम, दलित, धनगर समाज आत्तापर्यंत काँग्रेसचा पाठीराखा होता. निवडणुका जवळ आल्या की या समाजाला भाजपाची भिती दाखवून, काँग्रेसने नेहमीच स्वत:चा स्वार्थ साधत सत्ता संपादन केली. पण त्यानंतर मात्र या समाजातल्या लोकांकडे त्यांनी ढुंकुनही पाहिलं नाही. खर्या अर्थाने जर या देशातल्या मुस्लिम, दलित व धनगर समाजाचं जर कोणी वाटोळं केले असेल, तर ते काँग्रेसने केले, अशी घणाघाती टीका राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष नामदार पाशा पटेल यांनी केली.
मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आहिल्यानगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना.डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे, कराडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, शेतीमित्र अशोकराव थोरात, मोहनराव जाधव, तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, पैलवान आनंदराव मोहिते, ईसाक मुजावर, तानाजी देशमुख आदी मान्यवर होते.
भाजपाला सातत्याने जातीयवादी पक्ष म्हणून हिणवले जाते. पण मी गेली 20 वर्षे पक्षात आहे. मुसलमान असूनही पक्षाने माझी कधी जात-धर्म पाहिला नाही. उलट शेतकर्यांना न्याय देण्यासाठी माझी कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करून मला राज्यमंत्री बनविले. मुस्लिम समाजाला खर्या अर्थाने सन्मान मिळवून देण्याचे काम भाजपा करते. पण काँग्रेसने मात्र मतासाठी वापर केला. मलकापूर नगरपालिकेत गेली इतकी वर्षे काँग्रेसची सत्ता आहे, पण इथल्या नगरपालिकेत एकही मुस्लिम समाजाचा कर्मचारी कार्यरत नाही, यावरूनच काँग्रेसची वृत्ती स्पष्ट होते. याऊलट आपल्या मलकापूरची ज्या संस्थेमुळे खर्या अर्थाने जगभरात ओळख निर्माण झाली त्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये मात्र हिंदू, मुसलमानच नव्हे तर सर्वधर्मीयांना आप्पासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आणि डॉ. सुरेशबाबांच्या शालीन नेतृत्वामुळे रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. त्यांच्या ऋणातून उतराई होण्याची हीच वेळ असून, मलकापूरच्या जनतेने भाजपाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहन केले.
ना. डॉ. अतुल भोसले यांनी गेल्या 2 वर्षात कराडसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 26 कोटींचा निधी आला असून, मलकापूरातही येत्या काळात नागरी सुविधा देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यावेळी भाजपा व मित्रपक्षांचे उमेदवार मनिषा शिंदे, नितीन काशीद, नुरजहॉ मुल्ला, विक्रम चव्हाण, मनोज येडगे, उमा शिंदे, अवंती घाडगे, सुहास कदम, भास्कर सोळवंडे, शोभा यादव, दिनेश नार्वेकर, पूनम जाधव, प्रज्ञा दरागडे, निर्मला काशीद, अजित थोरात, अश्विनी हिंगसे, स्वाती पवार, शामराव शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काँग्रेसने मुस्लिम, दलितांचं वाटोळं केलं : ना.पाशा पटेल
RELATED ARTICLES