वडूज ( धनंजय क्षीरसागर) : माण – खटाव विधानसभा मतदारसंघात भाजपा, शिवसेना व अपक्ष उमेदवारामध्ये जोरदार तिरंगी सामना होत आहे. भाजपाचे आ. जयकुमार गोरे, शिवसेनेचे शेखरभाऊ गोरे व आमचं ठरलयं टिमचे प्रभाकर देशमुख या तिघांमध्ये अटीतटीची निवडणूक होणार आहे. निवडणूकीच्या निमित्ताने उमेदवाराच्या सह मात्तबरांच्या राजकीय अस्तित्वाची लढत होणार आहे. तिनीही उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी आपापल्या परीने जोरदार प्रचार मोहिम राबविली आहे. मात्र या निवडणूकीत निवडणूक प्रक्रियेपासून हाताच्या अंतरावर असणार्या तटस्थ मतदारांचीच भूमिका निर्णायक ठरणार असल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये आहे.
आ. जयकुमार गोरे यांनी दुष्काळी तालुक्याच्या विकासाबरोबर स्वत:ची राजकीय सोय डोक्यात ठेवून काँग्रेसमधून सत्ताधारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. सद्या ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नजीक गेले आहेत. ते तिसर्यांदा निवडून आले तर त्यांना मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यातच म्हसवड येथील जाहीर सभेत जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मताने गोरे निवडून आले तर त्यांना मंत्री करु असा शब्द दिला आहे. त्यामुळे आ. गोरे व त्यांचे समर्थक नेटाने कामाला लागले आहेत. त्यातच बारामतीकर व फलटणकरांना ठोकून काढणारा पश्चिम महाराष्ट्रातील एक बहाद्दर गडी भाजपाच्या दृष्टीने गरजेचा आहे. त्यादृष्टीने भाजपाच्या वतीने गोरे यांना सर्वप्रकारची रसद पुरविली जात आहे. त्यांच्या दृष्टीने निवडणूकीत यश मिळाले तर सोन्याहून पिवळे, अन्यथा अपयश आले तर संघटना खिळखिळी होवू शकते.
दुसरीकडे सुरुवातीला नाही नाही म्हणत प्रभाकर देशमुख यांनी आपलं ठरलयं च्या घोड्यावर स्वात होण्याचा निर्णय अखेरच्या क्षणी घेतला. निवडणूकीत यश मिळविणे हे त्यांच्यासह माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगांवकर, प्रभाकर घार्गे, रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, पोळ बंधू,.दादासाहेब गोडसे, राष्ट्रीय काँग्रेसचे अशोकराव गोडसे, डॉ. विवेक देशमुख, एम. के. भोसले, रा.स.प. आघाडीचे सर्व पदाधिकारी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या सर्व मातब्बरांनी आ. गोरे यांची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. अश्या परस्थितीत या सर्वांच्या चक्रव्यूहात आ. गोरे अडकून पडणार की चक्रव्यूह भेदून अर्जुन होणार हे दि. 24 रोजी निकालादिवशी ठरणार आहे. देशमुख यांच्यासाठी प्रचाराच्या दुसर्या टप्यात चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. त्यांच्यासाठी समाजातील वेगवेगळे बुध्दीवादी घटक झटत आहेत. त्यातून यंत्रना शेवटच्या घटकापर्यंत कशी पोहोचतेय यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. चुकून चक्रव्यूह भेदून आ. गोरे अर्जुन झाले तर या सर्वांची पुरेपूर वाट लागू शकते.
तिसरीकडे मागील निवडणूकीत दुसर्या क्रमांकावर असणार्या शेखरभाऊ गोरे यांनी चार महिन्यात निवडणूकीची मोठी तयारी केली आहे. युवक तसेच महिला या दुर्लक्षीत घटकांना जवळ करण्याचा त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. त्यांची ही शक्ती प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेपर्यंत टिकली तर तेही प्रस्थापितांसमोर मोठे आव्हान निर्माण करु शकतात. त्यातच आदल्या दिवशी रद्द झालेली शिवसेना कार्याध्यक्ष उध्दवजी ठाकरे यांची सभा दुसर्या दिवशी घेवून शेखरभाऊंनी आपले पक्षातील महत्व दाखवून दिले आहे.
सौ. पुकळे, गुदगे, प्रचारापासून अलिप्त
निवडणूक प्रचारामध्ये तालुक्यातील मान्यवर पदाधिकार्यांसह गांव पातळीवरील पुढार्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. निवडणूकीच्या निमित्ताने अनेक गावातील मातब्बर विरोधक एकमेकांच्या हातामध्ये हात घालून प्रचार करत आहेत. असे असले तरी कलेढोण पंचायत समिती गणाच्या भाजपाच्या सदस्या सौ. मेघाताई पुकळे, त्यांचे दीर मुळीकवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब पुकळे, मायणी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविलेले भाजपा उमेदवार व सद्या मायणीचे सरपंच असलेले सचिनदादा गुदगे हे प्रचारापासून अलिप्त आहेत.
रात्रीस खेळ काय होणार ?
आठवडाभर तिनही प्रमुख उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराचा धुरळा चांगलाच उडवला आहे. प्रचार दौरा, सभा, बैठका या माध्यमातून मतदारांच्या गावापर्यंत पोहोचण्याचा सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मात्र आदल्या दिवशीच्या रात्री थेट मतदारापर्यंत पोहोचून आपली भूमिका पटवून देण्यात यशस्वी होते. या रात्रीस काय खेळ होणार याबाबत उलट-सुलट चर्चा आहे.
माणमध्ये उमेदवारासह मात्तबरांच्या अस्तित्वाची लढत
RELATED ARTICLES