Friday, June 20, 2025
Homeताज्या घडामोडीलढायला शिका, मन विचलित होऊन देऊ नकाः डॉ. धनंजय दातार

लढायला शिका, मन विचलित होऊन देऊ नकाः डॉ. धनंजय दातार

सातारा: आपण जे करणार आहोत, ते हटके असायला हवे. आपल्याकडे युनिक असेल तर निश्‍चितपणे लोक आपल्याकडेच येतात. कोणताही व्यवसाय असो माणसामध्ये जिद्द नको; चीड हवी. एकदा माणूस चिडला, की तो ताकदीने काम करतो. मी आजारी असताना माझ्या मनातही एकदा आत्महत्येचा विचार आला होता. मात्र एका ब्रिटिश महिलेने मी कसा चुकीचा विचार करत आहे, हे सांगितले. महाराष्ट्रातल्या एकाही तरुणाने आत्महत्या करू नये, आपल्याला सक्सेस व्हायचे आहे. लढायला शिका, मन विचलित होऊन देऊ नका. माझ्यापेक्षाही मोठे उद्योगपती व्हा, असा कानमंत्र जागतिक कीर्तीचे उद्योगपती आणि दुबईस्थित अल अदिल समूहाचे व्यवस्थापकीय संचालक, मसाला किंग डॉ. धनंजय दातार यांनी सातारकरांना दिला.
येथील अश्‍वमेध वाचनालय आणि ग्रंथालयातर्फे कै. सौ सुमित्रा नरसिंगराव क्षीरसागर स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित व मिती क्रिएशन्स् निर्मित उद्योगप्रेरणा कार्यक्रमांतर्गत येथील शाहू कलामंदिरामध्ये प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांनी डॉ. धनंजय दातार यांची प्रकट मुलाखत घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन झाल्यावर रवींद्र झुटिंग यांनी प्रास्ताविक करताना अश्‍वमेध वानालयाने चांगले वाचक मिळावे आणि वाचकांना चांगली पुस्तके वाचायला मिळावीत या उद्ेदश्याने व्यासपीठाद्वारे सातार्‍याची ओळख बदलण्यासाठी अश्या यशस्वी उद्योजकांची मुलाखत आपणासाठी आयोजीत केली असल्याचे सांगितले.
डॉक्टर धनंजय दातार यांचा शाल, पुष्पगुच्छ, सातारी कंदी पेढ्याचा हार देऊन तर सौ.वंदना दातार यांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.
रंंगलेल्या मुलाखतीत आपल्या यशस्वी कारकिर्दीबद्दल बोलताना डॉ.दातार म्हणाले की, दुबईसारख्या देशामध्ये मसाला पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर होत होती. त्या देशांमध्ये उद्योग करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे टॅक्सेस नाहीत. होणार्‍या मागणीचा फायदा उचलला पाहिजे, असा मनात निश्‍चय करून व्यवसायाला प्रारंभ केला. दुबईमध्ये 40 दुकानांचा शुभारंभ केला. 41 व्या दुकानाचा पुढील महिन्यात शुभारंभ आहे. 42 व्या दुकानाचा शारजामध्ये शुभारंभ करण्याचा मानस आहे.
शिक्षण व राहणीमानाबद्दल बोलताना दातार म्हणालेकी, माझे बाबा एअरपोर्टवर नोकरीला होते. त्यांची सतत बदली होत असे. त्यामुळे मला शिक्षणासाठी आजीकडे ठेवण्यात आले. शिंदखेडा येथे प्राथमिक शिक्षण झाले. आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची होती. सकाळी केवळ चहा मिळत असे. जेवणात साधे वरण, दही याचा समावेश असायचा. शाळेत जाताना एकच गणवेश असायचा. शाळेत जाताना छत्री नसल्याने अंगावर गोणपाट घेऊन जायचो. पुढील शिक्षण अत्यंत कठीण परिस्थितीत मुंबई येथे घेतले.
माणसाजवळ पैसा नसला, की सोबतीला कोणीही माणूस नसतो. आयुष्यात तेव्हा खूप वेळा अपमान सोसावा लागला. एकदा तर जेवणाच्या पंक्तीतून मला उठवले गेले. व्हीआयपी रांग आहे, असे सांगितले गेले. जेव्हा आपल्याला नाव, पैसा मिळतो. तेव्हा मित्र, नातेवाईक आपल्यापासून तुटून जातात. त्यांना आपली प्रगती बघवत नाही. जुनी नाती तुटताना अनेक नवीन नाती जोडली जातात.
शिक्षणानिमित्त मी मुंबईत राहत असताना काही जण दुबईला साधेपणाने जाताना पाहिले. मात्र परत भारतात येताना ते खूप पैसा कमावून येत असल्याचे दिसून आले. टी शर्ट, जीन्स पॅन्ट, गॉगल, हातात, गळ्यात सोने अशी त्यांची जीवनशैली पाहिली. त्यामुळे दुबईला जाण्याचा विचार केला. दहावीत असताना गणित विषयात 5 वेळा नापास झालो. 150 पैकी केवळ 2 ते 3 गुण मिळत असे. शिक्षकांनी माझा एकदा जास्वंदीच्या फुलांनी सत्कार केला. तेव्हापासून खूप अभ्यास केला. गणितामध्ये 150 पैकी 56 गुण मिळवले आणि दुबईचा माझा रस्ता सुकर झाला.
दुबईमध्ये मी 15 ते 16 तास काम करत असायचो. गोडाऊनमध्येच झोपायचो. मी स्वतः जेवण तयार करायचो. मला दुबईची भाषा येत नसल्याने तेथील ग्राहक अ‍ॅक्टिंग करून कोणती वस्तू पाहिजे ते मला सांगत असे. शिक्षणामध्ये कच्चा असल्याने आईला नेहमीच माझी चिंता वाटायची. मात्र मनात एक चीड होती. त्यामुळेच दुबईमध्ये स्थिरस्थावर झालो.
दुबईमध्ये व्यवसाय करताना सर्वप्रथम खूप नुकसान सोसावे लागले. घरातील सर्वकाही विकले. एवढेच नव्हे तर आईचे मंगळसूत्र, दागिने विकून टाकले. तेव्हा आईच्या डोळ्यात पाणी पाहिले. तुझे दागिने घेऊनच परत भारतात येईन, असे मी तिला सांगितले. एवढ्या कठीण परिस्थितीतही पुढे टाकलेले पाऊल मागे घेऊ नकोस, असे आईने बजावले. कुवेतमध्ये युद्ध सुरू झाल्याने युद्धाच्या भीतीने तेथील लोकांनी मोठ्या प्रमाणावर कडधान्य, मसाले खरेदी केले. तेव्हा चार पट किमतीने आम्ही वस्तू विकल्या. मोका देखकर चौका मारा. आईचे दागिने घेऊनच मी भारतात परतलो. तेव्हा आईने माझ्या तोंडावर फिरवलेला हात हीच गोष्ट माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची होती.
महाराष्ट्रातील तरुणांना पुढे जाऊन उद्योग क्षेत्रात येण्यासाठी सल्ला देताना डॉ.दातार म्हणालेकी, मी दुकानात काम करताना शेजारी हॉटेलमध्ये चहा प्यायला जायचो. हॉटेल चालक रोज काही पैसे वेगळे ठेवत असे. मीही व्यवसायातून 500 रुपये रोज बाजूला ठेवू लागलो. त्यातून 1 लाख 80 हजार रुपये साठल्यानंतर ते पैसे डिपॉझिट करण्यासाठी बँकेत गेलो असता तेथील कॅशियरने थोडे कर्ज घेऊन अबुधाबी येथे दुकान उघडण्याचा सल्ला दिला. कमी व्याजदरात कर्ज देण्याचे मान्य केले. तरुणांनी बँकेकडून कर्ज घेऊन व्यवसाय करण्यास हरकत नाही. मात्र व्याजदर कमी असला पाहिजे.
मुंबईत शिक्षण घेताना पार्ट टाइम घरोघरी जाऊन चिंचा, आईस्क्रीम, फिनेल, टॉयलेट क्लीनर विकण्याचा अनुभव होता. दुबईमध्ये दुकानांमध्ये हीच सेल्समनशिपची कला मी जोपासली. मी माझे ब्रँड स्वस्तात कधीच विकले नाहीत. टर्न आऊटमध्ये फायदा किती हे महत्त्वाचे. बोलण्यात गोडवा हवा. मी ग्राहकालाच देव समजतो. सर्व जाती, धर्माच्या लोकांचा मी सन्मान करतो. मराठी माणूस व्यवसायात उतरला, की आजूबाजूची माणसे त्याला हसतात. मलाही लाजिरवाणे अनुभव आले. कोणतेही काम करताना लाजू नका हा संदेश देण्यासाठी पिठाची चक्की सुरू केली.
दुबईमध्ये 40 दुकाने सुरू करणे, आणखी काही दुकाने सुरू करण्याचा माणस हे साम्राज्य कसे निर्माण केले याबद्दल बोलताना डॉ.दातार म्हणालेकी, मी खूप काम करायचो. खूप पैसा कमावणे एवढाच उद्देश डोळ्यापुढे होता. एवढे साम्राज्य निर्माण करण्यासाठी ब्रँडिंगवर लक्ष वेधले. त्याच्यावर खूप पैसे खर्च केले. दुकानांच्या शुभारंभासाठी नामवंत अभिनेत्रींना बोलावले. आमच्याबद्दल ग्राहकांमध्ये विश्‍वासार्हता निर्माण झाली. ती विश्‍वासार्हताच समाजामध्ये परिवर्तीत झाली.आपण जे करणार आहोत ते हटके असायला हवे. आपल्याकडे युनिक असेल तर लोक येतात. 150 जणांना विमानात बसून त्यांना आनंद झाल्याचे समाधान मिळाले. पत्नी वंदना दातार हिने व्यवसायात लक्ष घातल्यानंतर पहिल्याच वर्षी 40 टक्के व्यवसाय वृद्धी झाली. अशिक्षित महिलाही आपले घर चांगले चालवते. मग सुशिक्षित बायकांना व्यवसायामध्ये सहभागी करून घेतले पाहिजे.
माझे अनेक नातेवाईक जयसिंगपूर परिसरात राहतात. माझ्यासाठी लग्नाची स्थळे पाहण्यास सुरुवात झाल्यानंतर खंडोबाची पाली येथील वंदना मला पसंत पडली. माझ्या प्रगतीत तिचा खूप मोठा वाटा आहे. प्रकट मुलाखत संपल्यानंतर अच्युत वाकडे, राहुल थोरात, समृद्धी जाधव, सोहम राजमाने, कृष्णा मुळे यांच्यासह अनेकांनी व्यवसायाविषयी प्रश्‍न उपस्थित केले. त्या प्रश्‍नांना धनंजय दातार यांनी समर्पक उत्तरे दिली.
कार्यक्रमाला रवींद्र झुटिंग, डॉ. सोमनाथ साबळे, डॉ. राजेंद्र माने, विजयकुमार क्षीरसागर, हॉटेल चंद्रविलासचे वसंतशेठ जोशी, उदय मोदी,अनील काटदरे, पराग काटदरे,बबनराव सापते,युवराज पवार,देवेंद्र पळणिटकर,अरुण मर्ढेकर आदी मान्यवर उपस्थित होते. वैदेही कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तर डॉ.राजेंद्र माने यांनी आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular