सातारा दि. 27 (जि.मा.का.): मांढरदेव यात्रे दरम्यान भाविकांना अन्न आणि पाणी बाधू नये म्हणून पाणी पुरवठ्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवावेत, अन्नाची तपासणी करुनच भाविकांपर्यंत जाईल याची खबरदारी संबंधित यंत्रणांनी घ्यावी. या यात्रा स्थान आणि परिसरात कलम १४४ एक जानेवारी ते १७ जानेवारी पर्यंत लागू करण्यात आले असून इथे पशुबळी अथवा लिंबू , बिबे ठेवणे , झाडाला खिळे मारणे , वाद्य वाजविणे हा या कायद्याने गुन्हा आहे. भाविकांनी याचे पालन करुन पोलिस यंत्रणेला आणि जिल्हा प्रशासनाला मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केले.
मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा 1,2 व 3 जानेवारी 2018 रोजी होणार आहे. त्या यात्रेच्या नियोजनाची प्रत्यक्ष पाहणी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल , जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांनी आज केली. त्या नंतर एमटीडीसी संकुलात सर्व संबंधित यंत्रणांचा आढावा घेतला , त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला पोलिस अधिक्षक संदीप पाटील , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, तहसीलदार अतुल म्हेत्रे आदीसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी यावेळी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामपंचायतीमार्फत पाण्याचे शुध्दीकरण, तात्पुरत्या शौचालयांची उपलब्धता, जंतुनाशक औषध फवारणी, त्याच बरोबर रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. कचरा होऊ नये यासाठी दर्शन मार्गावर जागोजागी कचरा कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी ठराविक ठिकाणी होऊ नये यादृष्टीने स्टॉल धारकांच्या जागांचे नियमन करावे. अन्न धान्यांच्या स्टॉलला परवानगी देतांना अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेणे बंधनकारक करावे. मांढरदेव परिसरात नारळ फोडण्यास आणि तेल वाहण्यास पूर्णतः बंदी करण्यात आली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
एसटी महामंडळाकडून या यात्रा कालावधीत ७६ बसेसची व्यवस्था करण्यात आली असून एक वाहतूक नियंत्रक अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली यात्रेच्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाचे बस स्थानक स्थापन करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाकडून ३३ डॉक्टरांसह ११६ लोकांची टिम दिवसरात्र कार्यरत राहणार आहे. आर.टी.ओ आणि पोलिसांची गस्त टिम गाड्यांची तपासणी करणार आहे. जेणेकरून पशु , कोंबड्या यात्रेच्या ठिकाणी जावू नयेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी अनिरुध्दाज ॲकडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांची ३०० लोकांची प्रशिक्षित टिम येथे २४ तास असणार आसल्याची माहिती यावेळी देण्यात आली. सर्व विभागांचा या यात्रे दरम्यान योग्य तो समन्वय राहावा यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने एकूण सोळा वॉकीटॉकी संचही दिले जाणार आहेत.
देवस्थान विश्वस्थांमार्फत नियंत्रण कक्ष स्थापने, पशुहत्या बंदीबाबत सर्वत्र फलक लावण्यात येणार असून, साफसफाईसाठी कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. वीज वितरण कंपनीतर्फे तात्पुरत्या जोडण्या देण्यात येतील. तसेच काळजी घेण्याबाबत फलक लावण्यात येतील अशी माहिती बैठकीत देण्यात आली. उत्पादन शुल्क विभागामार्फत यात्रेच्या दरम्यान तीन दिवस वाई शहर परिसरात मद्य विक्री बंद ठेवण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवावा, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी सिंघल पुढे म्हणाल्या, ही यात्रा यशस्वी करण्यासाठी आपणाला नेमुन दिलेली जबाबदारी पूर्ण करावी. बीएसएनएलने आवश्यक ते दूरध्वनी जोडणी जोडण्यात याव्यात. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाने पथके तैनात ठेवून तपासणी करावी. प्रवाशांसाठी पुरेशा व सुस्थितीत एस.टी. ठेवाव्यात अशा सूचना त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाला दिल्या. ग्रामपंचायत तसेच पाणी पुरवठा विभाग यांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन खबरदारी घ्यावी.
जिल्हा पोलिस अधिक्षक संदीप पाटील यानीही सुरक्षेच्या दृष्टीने सूचना दिल्या. जिथे जिथे सुरक्षिततेच्या बाबतीत कमतरता आहेत , त्यापूर्ण करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणांना सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे भरुन दुरुस्त केले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक कठडे तयार करण्यात येत आहेत. ज्या बाबी अजूनही अपूर्ण आहेत त्या तत्काळ पूर्ण कराव्यात. सर्व विभागांनी सतर्क राहून एकमेकांच्या समन्वयाने काम करा. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून अशा घटना घडुच नयेत म्हणून आधीपासूनच काळजी घ्यावी. यात्रा काळात समस्या, अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने सर्वांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी केल्या. बैठकीनंतर प्रत्येक ठिकाणाची बारकाईने पाहणी करुन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या.
मांढरदेव यात्रेतील भाविकांच्या आरोग्यासाठी पाणी आणि अन्न तपासणी करा तसेच कलम १४४ ची काटेकोरपणे अमंलबजावणी करा – जिल्हाधिकारी श्वेता सिंघल
RELATED ARTICLES