सातारा : गेल्या काही महिन्यांपासून पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरचे काम सुरु असल्याने शहरातील वाहतूकीचा ताण हा बस स्थानक, भू विकास बँक ते जुना आरटीओ कार्यालय या रस्त्यावर पडला आहे. मात्र भू विकास बँक ते जुना आरटीओ कार्यालय या रस्त्याची खड्डयांमुळे चाळण झाल्याने हा रस्ता धोकादायक बनला आहे. वारंवार मागणी करुनही सातारा पालिकेकडून या रस्त्याच्या डागडुजीकडे दुलक्ष केले जात होते. त्यामुळे आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्वखर्चातून खड्डे मुजवले. तसेच त्यांनी स्वत: हातात पाटी घेवून खड्डे मुजवूून सत्ताधार्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.
ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे सातारा शहरातील वाहतूकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यातच शहरातील सर्वच रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषत: दुचाकीस्वार आणि पादचार्यांना जीव मुठीत घेवून मार्गक्रमण करावे लागत आहे. असे असताना सातारा पालिकेकडून मात्र खड्डे मुजवण्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. याबाबत नागरिकांमधून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत वर्तमानपत्रांमधून रखाणेच्या रखाणे भरुन येत होते तरीही पालिका प्रशासनाने गांधारीची भुमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भू विकास बँक चौक ते जुना आरटीओ कार्यालय या रस्त्यावर दररोज छोटे मोठे अपघात घडत आहेत. या रस्त्यावरील खड्डे भरणे अत्यावश्यक बनले होते. पालिका प्रशासनाला जाग येत नसल्याने अखेर आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वखर्चाने या रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचा निर्णय घेतला आणि या रस्त्यासह भु विकास बँक ते शानभाग शाळा या मार्गावरीलही खड्डे मुजवून त्यावर रोलर फिरवण्यात आला.
गुरुवारी सकाळी 10.30 च्या सुमारास आ. शिवेंद्रसिंहराजे हे मुरुमाने भरलेल्या ट्रॅक्टर- ट्रॉल्या, रोडरोलर आणि मुरुम टाकणारे कामगार यांच्या लवाजम्यासह भुविकास बँकेसमोर दाखल झाले. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्वत: मुरुमाने भरलेली पाटी हातात घेवून खड्डे भरण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनीही पाट्या हातात घेवून खड्डे मुजवण्यास प्रारंभ केला. खड्डे मुजवून त्यावर रोलर फिरवण्याचे काम सुरु झाल्याने येणार्या- जाणार्या नागरिकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचे आभार मानले तसेच सातारा पालिकेच्या कुचकामी कारभाराचा तिव्र शब्दात निषेध नोंदवला.
दरम्यान, आम्ही विरोधात असल्याने आमदार फंडातून रस्त्याची कामे करायची म्हटले तरी सत्ताधार्यांकडून श्रेयवादापायी पालिकेत ठराव मंजूर केला जात नाही. त्यामुळे इच्छा असूनही शहरातील रस्त्याची कामे होवू शकत नाहीत आणि सत्ताधार्यांना या समस्येचे काहीही सोयरं सुतक नाही. त्यामुळे स्वत: या रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचा निर्णय घेतल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. याकामासाठी कोणताही शासकीय निधी वापरा नसून मी स्वखर्चाने हे काम करत आहे. आता मी काम करतोय म्हटल्यावर पालिका त्यात आडकाटी आणणार ह निश्चित पण, हे काम जनतेच्या हितासाठी होत आहे आणि पालिकेवरील काही अंशी बोजा कमी होत आहे याचे भान ठेवून पालिकेनेही या कामासाठी सहकार्य करणे अपेक्षित आहे. सत्ताधारी सातारा विकास आघाडी आणि त्यांच्या नेत्यांना सातारकरांच्या समस्यांचे काहीही देणेघेणे राहिलेले नाही. त्यांना फक्त टक्केवारी, कमिशन आणि टेंडर यामध्येच रस असून यासाठी चाललेला गोंधळ सातारकर उघड्या डोळ्यांनी पहात आहेत. साशा कंपनीला पालिकेच्या मानगुटीवर बसवून पालिकेच्या तिजारीवर डल्ला मारण्याचा एककलमी कार्यक्रम पालिकेत सुरु आहे. खड्डयांमुळे चाळण झालेले रस्ते आणि कचर्याने भरुन वाहणार्या कुंड्या यांना दिसत नाहीत. सातारकरांचे अतोनात हाल सुरु आहेत. यांनी डोळ्यावर कापडाची नव्हे तर, नोटांची पट्टी बांधली आहे का? असा सवालही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी उपस्थित केला.
अन्यथा, सातारकर तुम्हाला माफ करणार नाहीत…
सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शहरात गणेशविसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला नाही पण, जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या ऐतिहासिक सातारा शहरात मात्र गणेशमुर्ती कोठे विसर्जीत करायच्या, या समस्येने सातारकरांची आणि गणेश मंडळांची झोप उडाली आहे. सत्ताधार्यांना चेक आणि कमिशन याशिवाय काहीही दिसत नसल्याने त्यांनी या प्रश्नाकडेही सोयीस्करपणे दुर्लक्ष केले त्यामुळे हा प्रश्न आता गंभीर बनला आहे. कालच सर्वसाधाण सभा घेवून सत्ताधार्यांनी या प्रश्नाबाबत उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे खूपच उशिरा सुचलेले शहणपण आहे. शहरात रस्ते आणि कचर्याची समस्या भेडसावत असतानाही सातारकर शांत राहिले आहेत. पण, गणेशमुर्ती विसर्जनाची समस्या त्वरीत सोडवा अन्यथा तुम्हाला सातारकर माफ करणार नाहीत, असा इशाराही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना दिला.