कराड : एकटे उदयनराजे किंवा पृथ्वीराजबाबा काही करु शकत नाहीत. या देशाला महासत्तेकडे नेण्याची ताकद तुम्हा जनतेमध्ये आहे. जोपर्यंत तुम्ही पूर्ण सत्ता बदलू शकत नाही, तोपर्यंत या देशातील धोरणे बदलणार नाहीत. आणि धोरण बदलणार नाही तोपर्यंत देश प्रगतीपथावर जाणार नाही. सध्याच्या सरकारने पाच वर्षांत संपूर्ण देशच गिळून टाकलाय, असा घणाघात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केला.
वडगाव हवेली (ता. कराड) येथे झालेल्या प्रचार सभेत उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, बंडानाना जगताप, अजितराव पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शिवराज मोरे, राजेश पाटील वाठारकर, अॅड. आनंदराव पाटील उंडाळकर, नगराध्यक्षा नीलमताई येडगे, विद्याताई थोरवडे, सुनील काटकर, काका धुमाळ, संग्राम बर्गे आदी प्रमुख उपस्थित होते.
या प्रचारसभेत उदयनराजे म्हणाले की, आज देशात केवळ नावापूर्तीच लोकशाही आहे. या सरकारने लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही चालवली असून त्यांनी देश अक्षरशः विकायला काढला आहे. हे सरकार उदयोगपतींची पाठराखण करणारे आहे. ब्रिटीश पुर्वकाळातील ईस्ट इंडीया कंपनीप्रमाणे बिझनेस इंडीया कंपनी या सरकारने आणली आहे. नैसर्गीक गॅस, ऑईल त्यांच्यामार्फतच जनतेला देण्याचे धोरण आखले. मात्र त्यामुळे उदयोगपतींच्या संपत्तीत वाढ होत आहे. आणि जनतेला दाहीदिशा फिरावे लागत आहे. देशाच्या वार्षीक बजेटपेक्षाही कित्येक पटीने या धनदांडग्यांची मालमत्ता वाढत आहे.
वास्तविक हा जनतेचा पैसा शासनाच्या तिजोरीतच असायला हवा होता. तसे झाले असते तर प्रत्येक नागरीकाला वैदयकिय सुविधा आणि बालवाडीपासून उच्चस्तरापर्यंतचे शिक्षण मोफत मिळाले असते. ज्यांना घर नाही, त्यांना डोक्यावर छप्पर मिळाले असते. ज्यांना खायला अन्न नाही त्यांच्याकडे अन्नधान्य पोहच करता आले असते. मात्र सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे.
ज्या तरुणांकडे उमेद होती. ज्यांच्या ठायी महत्वाकांक्षा होती. त्या सर्वांच्या आशा, अपेक्षा पायाखाली चिरडून टाकण्याचे पातक या सरकारने केले आहे. तरुणाईच्या आकांक्षा मातीमोल करणारे हे पाप कोणत्या जन्मात फेडणार? असा सवाल करुन श्री. छ उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, तळे राखी तोच पाणी चाखी. पण या सरकारने पाच वर्षात तळीच शिल्लक ठेवली नाहीत. त्यामुळे अशा नतदृष्ट लोकांना घरपोच करा. लोकांच्या हितासाठी वाटेल तेवढया केसेस अंगावर झेलण्याची माझी तयारी आहे. माझी कमिटमेंट जनतेशी आहे. मोदींच्या राजवटीत देशाचे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे शेतकरी, विदयार्थी, नोकरदार आदी विविध घटकांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्यासाठी मतदारांनी एकजुटीने काँग्रेस व मित्रपक्षांचे सरकार स्थापन करण्यासाठी निर्धार करावा. दोन कोटी रोजगांर आणि प्रत्येक नागरीकाच्या खात्यावर पंधरा लाख रुपये जमा करण्याच्या वल्गना हवेतच विरल्या आहेत. त्यामुळे आता सर्वांनी जागृत व्हावे व केंद्रातील सरकारला सत्तेतून खाली खेचावे.
बूथ कमिटीच्या कार्यकर्त्यांनी गाव हा घटक न मानता बूथ हा घटक मानून कामाला लागावे. मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे. सरकार सातत्याने थापा मारत आहे. येत्या काही दिवसात ते आणखी काही खापा मारतील किंवा आमिषे दाखवतील. त्यापासून सावध राहावे, असे आवाहन आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
सत्ताधा-यांच्या फसव्या घोषणांना बळी पडू नका, असे आवाहन बंडानाना जगताप यांनी केले. या प्रसंगी डॉ. इंद्रजित देशमुख , अजितराव पाटील चिखलीकर यांची भाषणे झाली. या वेळी उत्तमराव पाटील, संतोष पाटील, डॉ. सुधीर जगताप, झाकीर पठाण, शिवाजीराव मोहिते, अॅड. नरेंद्र पाटील, जयेश मोहिते, अविनाश नलवडे, पोपटराव साळुंखे, जितेंद्र डुबल, स्वाती तुपे, शकुंतला शिंगण, दत्ता पवार, सचिन पाटील, नितीन थोरात,इंद्रजित चव्हाण, डॉ. सचिन कोळेकर तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोदी सरकारने पाच वर्षात संपूर्ण देशच गिळला
RELATED ARTICLES