कोरेगाव / प्रतिनिधी” :- गावाच्या विकासासाठी लोक सहभागातून नियोजन, अंमलबजावणी केल्याने ४ पाझर तलाव गाळमुक्त, २५ सिमेंट बंधारे,२५ जाळी बंधारे,२हजार एकरात डीप सीसीटी,३ कि.मी.ओढा खोलीकरण,१ लाख ब्रास गाळ काढून जलसंधारणाची अन्य कामे केल्याने आज गावात तब्बल १ टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. दुष्काळाचा प्रश्न कायमचा निकाली काढून नागझरी गावाची ‘पाणीदार आणि बागायती गाव’ अशी ओळख बनली आहे. गावात कोट्यवधी रुपयांची विकास कामे करून राज्यात आदर्श गाव असा लौकिक निर्माण केला असल्याचा अभिमान वाटतो.गावाचा लौकिक पाहून चक्क अमीरखान थक्क झाला होता.आम्ही करून दाखवलेली कामे या,पहा आणि तुम्ही ही ती करु शकता,” असा विश्वास जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी नागझरीची यशोगाथा सांगताना व्यक्त केला.
कोरेगाव पंचायत समितीच्या सभागृहात
ग्राम विकास विभाग, जिल्हा परिषद, सातारा , कोरेगाव पंचायत समिती आणि रयत शिक्षण संस्थेचे पंचायत राज प्रशिक्षण केंद्र ,वर्ये-सातारा यांनी संयुक्तपणे ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या तीन दिवशीय प्रशिक्षणात सरपंच, उपसरपंच, सदस्यांना आपली जबाबदारी, अधिकार, कर्तव्य त्याचबरोबर ग्रामपंचायतीच्या कायदयातील ठळक तरतुदी,कामकाज आणि विविध उपयुक्त विषयांची तज्ञाच्या कडून मार्गदर्शन करण्यात आले.पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे विजय जाधव,सरपंच जितेंद्र भोसले, प्रविण प्रशिक्षक सुनिता पाटणे यांच्यासह अन्य तज्ञांनी मार्गदर्शन केले.
सरपंच परिषदेचे सातारा जिल्हा अध्यक्ष जितेंद्र भोसले(सरपंचनागझरी), जिल्हा कार्याध्यक्ष आनंद जाधव (सरपंच- दरे), कोरेगाव तालुकाध्यक्ष अजीत माने(सरपंच-भोसे) यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करण्यात आली.
अनुभूलेवाडी ,आसगाव, आसनगाव, आसरे, अंबवडे स. कोरेगाव, एकंबे, कण्हेरखेड, खडखडवाडी, खामकरवाडी, खिरखिंडी,शिरंबे,शेल्टी, सुलतानवाडी, सांगवी या ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य उपस्थित होते.