सातारा : शिक्षणामुळे फक्त पैशाची पॅकेज मिळतील पण त्याचबरोबर आपलं घरही तेवढच महत्वाचं हे ओळखून स्त्रीयांनी वागलं पाहिजे. करीयर आणि घर या दोघांचा समन्वय साधायला पाहिजे. भारतीय संस्कृतीवर पाश्चात्य संस्कृतीचे आक्रमण होत आहे. भारतीय संस्कृतीचे रक्षण व जतन करण्याचे काम स्त्रियांना करायचे आहे. प्रत्येक घरातील आई आपल्या मुलीवर योग्य संस्कार करून संस्कृती रक्षणामध्ये महत्वाची ठरू शकते, असे मत सामाजिक कार्यकर्त्यां अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांनी व्यक्त केले.
येथील रा.ना. गोडबोले (सार्वजनिक) ट्रस्ट तर्फे दिला जाणारा सातारा भुषण पुरस्कार स्वयंवर मंगल कार्यालयात अपर्णा रामतीर्थकर यांना राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या हस्ते अमरसिंह पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ट्रस्टचे विश्वस्त अरुण गोडबोले, अशोक गोडबोले, डॉ. अच्युत गोडबोले यांच्या प्रमुख उपस्थित प्रदान करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. अॅड. अपर्णा रामतीर्थकर यांना दिलेला हा 27 वा सातारा भूषण पुरस्कार आहे.
रामतीर्थकर म्हणाल्या घराबाहेर वडिलांची प्रतिष्ठा कायम ठेवायची असेल तर घरात आईने मुलीला संस्कारित केले पाहिजे. आपली संस्कृती पुरुषप्रधान असली तरी ती टिकविण्याचे कार्य स्त्रियांना करावे लागते. पूर्वी स्त्रिया चुलीवर स्वयंपाक करायच्या, पाणी भरायच्या, सर्वच कामे करायच्या. मात्र, घरात तक्रारी नव्हत्या. सध्या मात्र सोयी सुविध वाढल्या तशा तक्रारीही वाढल्या आहेत. एसएमएस आणि मिसकॉलचा हा भूलभूलैया जमाना आहे. यात मुलींनी वाहून न जाता स्वत: खंबीर राहावे. समाजात आपणाहून कोणाची बदनामी होईल, अशी कामे टाळली पाहिजे. मुलींना भरपूर शिकवा; पण त्यांच्यातील स्त्रीसुलभ भावना जागी ठेवा. मुली उच्चशिक्षित होत आहेत; पण त्या संस्कारक्षम, विनम्र झाल्यात का, हा अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. सध्या दोन सख्ख्या भावांमध्ये आईला कोणी सांभाळायचे यावरून भांडणे होत आहेत. काळाची गरज म्हणून इंग्रजी जरूर शिकवा; पण मुलांना इंग्रज बनवू नका, असे आवाहन रामतीर्थकर यांनी केले. यावेळी त्यांनी गोडबोले ट्रस्टच्या उपक्रमांचे कौतुक करून गोडबोले कुटुंबियांनी समाज कामाचा वारसा निर्माण करण्याचं फार मोलाचं काम केल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना शेखर चरेगांवकर म्हणाले की, संस्काराचा अभाव सध्याच्या पिढीत दिसत आहे. समाजातील महिलेला आई व मुलाला मुल म्हणायच की नाही असे प्रश्न दिसत आहेत. आज प्रत्येक गोष्टीत राजकारणाचा अतिरेक झालेला पहायला मिळत आहे. समाजामध्ये नेमकं काम करणारी व्यक्ती शोधायची, समस्यांची समाजाला जाणीव करून द्यायची व अशा व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन द्यायचे हे खरोखरच अवघड काम असुन रा. ना. गोडबोले ट्रस्ट तर्फे हे काम अखंड पणे गेली 50 वर्षे सुरू असल्याने या ट्रस्टचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे चरेगांवकर यांनी सांगितले.यावेळी अमरसिंह पाटणकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अरुण गोडबोले व डॉ. अच्युत गोडबोले यांनी प्रास्ताविक केले. प्रद्युमन गोडबोले आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरीक उपस्थित होते.
संस्कृती जोपासण्यासाठी आईची भूमिका महत्वाची : अॅड. अपर्णा रामतीर्थकर
RELATED ARTICLES