सातारा : कोयना धरणग्रस्तांच्या विविध मागण्यांसंदर्भात श्रमिक मुक्ती दलाच्यावतीने दि. 23 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व राष्ट्रीय संघटक डॉ. भारत पाटणकर यांनी दिली. महाराष्ट्राच्या वीज पुरवठ्यात, औद्योगिक व कृषी विकासात महत्वाची भूमिका बजावणार्या कोयना धरणामुळे विस्थापीत झालेल्या धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न 58 वर्षे उलटून गेली तरी प्रलंबित असल्याचे सांगून डॉ. पाटणकर म्हणाले, कोयना धरणग्रस्तांची ही प्रदीर्घ ससेहोलपट थांबवून त्यांचे 100 टक्के पुनर्वसन करण्याचा वेगवान कालबध्द कार्यक्रम तातडीने सुरू करणे गरजेचे आहे. धरणग्रस्तांवर पुन्हा एकदा सह्याद्री प्रकल्पामुळे बाधित होण्याची वेळ आली. त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रियासुध्दा प्रलंबित आहे. पुनर्वसन प्रक्रिया वेगवान करून त्यांचे 100 टक्के पुनर्वसन करावे.कोयना धरणग्रस्त आणि कोयना अभयारण्यग्रस्तांच्या विकसनशील पुनर्वसनासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय आणि मंत्रालय या दोन्ही ठिकाणी वॉर रूम तातडीने सुरू करावी.कोयना धरणग्रस्तांना 2013 च्या राष्ट्रीय भूसंपादन पुनर्वसन कायद्याच्या सर्व तरतुदी लागू करून त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
कोयना धरणग्रस्तांचे 23 पासून ठिय्या आंदोलन
RELATED ARTICLES