परळी :- (अल्पेश लोटेकर) च्छे, कोण जाणार खेडेगावात सुट्टीला? किती गरम होतं? आमच्या मुलांना एसी शिवाय झोप येत नाही? जनावरांच्या गोठ्याचा किती घाणेरडा वास येतो? सगळीकडे नुसती धूळ असते. मुलांना ऍलर्जी होईल धुळीची. गावाला फ्रीज नाही मुलांना थंड पाण्याची सवय आहे, पोतं गुंडाळलेल्या डबडय़ातलं पाणी कोण पिणार?, किती डास चावतात तिकडे? रस्ते किती खराब आहेत, आपली गाडी खराब होईल ना.. गावाला किती गावंडळ बोलतात आपल्या मुलांची भाषा बिघडेल ना? वगैरे वगैरे वगैरे… त्यापेक्षा इथेच मुलांना समर कॅम्प मध्ये पाठवू मस्त पोहायला, डान्स, सिंगिंग शिकेल वगैरे वगैरे…. साधारणपणे असा विचार शहरात वास्तव्यास करणारे आणि वर्षानुवर्षे गावाला न येणारे कोरोनाच्या भितीने मिळेल त्या वाहनाने भेटेल त्या रस्त्याने गावाला पोहोचले परंतु मुंबई-पुण्यात अडकलेले चाकरमाने हे व्हिडीओ कॉलद्वारे गावाबद्दलचा जिव्हाळा दाखवत आहेत.
जिवाची मुंबई (मायानगरी) अन् पुणे तिथे काय उणे? अशाच झगमगत्या दुनियेत हरवणारे मुळचे सातारकर पण कामानिमित्त मुंबई-पुणे येथे वास्तव्यास असणारे चाकरमाने कोरोना मुळे 10 बाय 10 च्या खोलीत अडकले आहेत. तर काहीजण आपल्या माय भुमीत परतले आहेत. परंतु गावाडकची कधीकाळी आठवण काढणारे मुंबई-पुणेकर आता कोरोनाच्या विळख्यात अडकल्य़ामुळे व्हिडीओ कॉलवर आपल्या गावाकडच्या आठवणी सांगताना त्यांचे डोळे पाणवत आहेत. तसेच कधी हा लॉकडाऊन संपुन आपल्या माय भुमीत परतणार याचेच वेध मुंबई-पुणेकरांना लागले आहेत.
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातली बहुतांश तरुण वर्ग हा मुंबई-पुण्यात स्थित असला तरी सध्या जिल्ह्यात हजारो मुंबई-पुणेकर परतले असले तरी अजून तेवढेच अजूनही चाकरमाने अडकलेले आहेत. 10 बाय 10 च्या खोलीतून बाहेर पडायचं नाहीच त्याच बरोबर शेजारचा एकाखा रुग्ण आढळला तर मनातच धस्स होऊन जातं. अशातच आपण आपल्या गावाला कधी पोहोचणार हीच आपेक्षा आता मनात बाळगून येणारे दिवस ढकलत आहेत.
चौकट
शहरे ओसाड तर गावे लागले गजबजु
गेल्या महिन्याभरापासून लॉकडाऊन असल्याने शहरात निरव शांतता पहायला मिळते परंतु कोरोना पासून जीव वाचवण्यासाठी शहरातील नागरीक गावाकडे परतल्याने शहरे ओसाड तर गावे गजबजू लागल्याचे पहायला मिळत आहे.
हाय-फाय मुंबई-पुणेकर लागले शेतमळय़ात रमू
लग्नाला मुलगा हा मुंबई-पुण्यात सर्व्हिसवाला हवा, मुंबईला खोली हवी म्हणणारे शहरातले आता कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे गावाकडे परतल्याने शहरे ओसाड तर गावे गजबजु लागली आहेत. हाय-फाय मुंबई-पुणेकर म्हणून मिरवणारे सध्या शेतमळय़ात उन्हाळी कामात रमत असल्याचे चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे.