खंडाळा : निरा देवघरचे पाणी धोम बलकवडी कालव्यात टाकण्याबाबतचा प्रस्ताव आठ दिवसांत सादर झालाच पाहिजे, असे आदेश जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी कृष्णा खोरे महामंडळाच्या अधिकार्यांना दिले. हा प्रस्ताव आल्यास त्वरीत दोन दिवसांत निर्णय घेवून खंडाळा तालुक्याला न्याय दिला जाईल, अशी ग्वाही मंत्री महाजन यांनी किसन वीर उद्योग समुहाचे अध्यक्ष मदन भोसले यांना दिली. दरम्यान, ना. गिरीश महाजन यांच्या आणखी एका धडाकेबाज निर्णयामुळे खंडाळा तालुक्यातील गावांना या पाण्याचा लाभ होणार असून त्यामुळे खंडाळा तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निरा देवघर धरणातून खंडाळा तालुक्याला मिळणारे हक्क़ाचे पाणी गेली अनेक वर्ष मिळाले नाही. यासाठीच्या उपायोजनांची पुर्तता होण्याचा कालावधी लक्षात घेता ते काम त्वरेने होण्याची शक्यता नाही. यामुळे किसन वीर उद्योग समुहाचे अध्यक्ष मदन भोसले यांनी जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांची भेट घेवून गावडेवाडी उपसा योजनेद्वारे निरा देवघरचे पाणी धोम बलवकवडीच्या कालव्यांत सोडण्याची मागणी केली. असे झाल्यास खंडाळा तालुक्यातील जनतेला पाणी मिळण्याची प्रक्रिया गतीने होण्यासोबत शासनाचाही मोठा खर्च वाचणार असल्याचे निदर्शनास आणून दिले. मदन भोसले यांनी केलेल्या या मागणीबाबत कृष्णा खोरे महामंडळाचे अधिक्षक अभियंता विजय घोगरे यांनी मंत्री महाजन यांच्यापुढे सविस्तर सादरीकरण केले. निरा देवधर उजवा कालवा 1 ते 208 कि.मी. पैकी आतापर्यंत 1 ते 65 कि.मी. अंतरातीलच कामे बहुतांशी पुर्ण झाली आहेत. त्यापुढील कालवे भुसंपादनाअभावी झाले नाहीत. तसेच खंडाळा तालुक्यात 34 गावांना पाणी देण्यासाठीच्या या कालव्यावरील तीनही उपसा योजना झालेल्या नाहीत. त्यामुळे हे शिल्लक पाणी लाभ क्षेत्राबाहेर वापरले जाते. त्यासाठी देवघर कालव्यावरील गावडेवाडी, शेखमीरवाडी व वाघोशी तसेच धोम-बलकवडीची 0.93 टीएमसी उपसा योजना या चार योजनांऐवजी गावडेवाडी येथे एकच उपसा योजनेद्वारे धोम-बलकवडी कालव्यात पाणी सोडून या गावांना पाणी द्यावे. त्यातून धोम-बलकवडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात आठमाही सिंचना राबविता येईल व निरा देवघर उपसाचे कालवा खर्चात भरीव बचत होईल, असेही मदन भोसले व घोगरे यांनी यावेळी मंत्री महाजन यांच्या निदर्शनास आणून दिले.
मंत्री महाजन यांनी जागेवरच अधिक्षक अभियंता विजय घोगरे यांना याबाबतचा प्रस्ताव येत्या आठ दिवसात सादर करण्याबाबत सांगितले. हा प्रस्ताव सादर झाल्यास दोन दिवसांत निर्णय देवू, अशी ग्वाही यावेळी त्यांनी मदन भोसले यांना दिली. मंत्री महाजन यांची कार्यतत्परता, विषय त्वरेने समजून घेण्याची क्षमता आणि जागेवर निर्णय घेण्याची पद्धती याबाबत मदन भोसले यांनी समाधान व्यक्त करीत मंत्री महाजन यांना धन्यवाद दिले. या निर्णयामुळे वर्षानुवर्ष हक्काच्या पाण्याच्या केवळ प्रतिक्षेत असणार्या खंडाळा तालुक्यातील जनतेला न्याय मिळणार असल्याचे मदन भोसले यांनी सांगितले. दरम्यान, या निर्णयामुळे खंडाळा तालुक्यासह फलटण तालुक्यातील देखिल गावांना निरा देवघरचे हक्काचे पाणी मिळणार आहे. त्यामुळे या परिसरात आनंद व्यक्त होत आहे. यावेळी भाजपा नेते अनिल जाधव, भाजपाचे खंडाळा तालुकाध्यक्ष राहुल हाडके, पंचायत समितीचे माजी सदस्य बापूराव धायगुडे, किसन वीर कारखान्याचे संचालक राहुल घाडगे, ऋतुराज बिरामणे, इशान भोसले, विनोद जाधव उपस्थित होते.
तळमळीला साथ धडाडीची
अनेकांना अनेक प्रश्न भिजत ठेवण्याची सवय असते. त्यापाठी विशिष्ट हेतूही असतो मात्र मंत्री गिरीश महाजन यांची प्रश्न निकाली लावण्याची पध्दत, धडाडीने निर्णय घेण्याची क्षमता या बाबी जनतेला दिलासा देणार्या आहेत, असे सांगुन मदन भोसले म्हणाले, निरा देवघरचे उर्वरित कालवे पुर्ण करण्यासाठी हजारों कोटींचा खर्च आहे. त्यामुळेच चार उपसा योजनांएवेजी गावडेवाडी येथील एक योजना फायद्याची ठरणार असुन ती कमी कालावधीत पुर्ण होईल नेमक्या याच गोष्टीला मंत्री महाजन यांच्यामुळे बळ मिळाले आहे. असेही भोसले यांनी सांगितले. मंत्री गिरीश महाजन मदन भोसले यांना म्हणाले मदनदादा, तुम्हीं प्रत्येक प्रश्न नेमक्या पध्दतीने आणि त्याच्या उत्तरासह मांडता त्यामुळेच तुमच्या प्रत्येक कामांपाठी संपूर्ण मंत्रीमंडळ यापुर्वीही ठाम राहीले असुन यापुढेही ठाम राहुन तुमच्या जनप्रश्नाच्या तळमळीला साथ दिल्याशिवाय राहणार नाही.
आठ दिवसांत प्रस्ताव द्या.. लगेच निर्णय देतो
RELATED ARTICLES