Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीग्राहकांनी फसवणुकीबाबत तक्रारी दाखल कराव्यात : जिल्हाधिकारी

ग्राहकांनी फसवणुकीबाबत तक्रारी दाखल कराव्यात : जिल्हाधिकारी

सातारा : ग्राहकांना कमी खर्चात व कमी वेळेत न्याय मिळावा हा शासनाचा प्रयत्न असून ग्राहकांनी  होणार्‍या फसवणुकीबाबत  तक्रारी ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे दाखल कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी आज केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा विभाग यांच्यावतीने आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या ग्राहक प्रबोधनपर प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले.  याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष मिलिंद पवार, राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्या सीमा परदेशी,  उपविभागीय अधिकारी स्वाती देशमुख-पाटील, तहसीलदार निलप्रसाद चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे-पुंडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी फीत कापून दीपप्रज्वलन करुन आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीमती सिंघल पुढे म्हणाल्या, राष्ट्रीय संरक्षण कायदा हा ग्राहकांसाठीच असून त्यांच्या संरक्षणासाठी ग्राहक कायदा करण्यात आला आहे. या कायद्यामुळे ग्राहकांना अधिकचे अधिकार देण्यात आले आहे.  ग्राहकांनी आपल्या हक्काची व जबाबदारीची जाणीव करुन घेतली तरच आपली विविध ठिकाणी होणार्‍या फसवणुकीपासून सुटका होऊ शकते. ग्राहाकांच्या जनजागृतीसाठी जास्त करुन शाळा व महाविद्यालया प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करावे.  जाहिरातींच्या अमिषाला बळी न पडता आपण स्वत:च जागरुक राहून वस्तू व सेवांची खरेदी करावी. ग्राहक मंचाकडे या घडीला 1 हजार केसेस सुरु आहेत. ग्राहकांची फसवणूक झाल्या त्यांनी ग्राहक मंचाकडे तातडीने तक्रार करावी.  यावेळी ग्राहकांना प्रबोधनपर उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलधारकांकडून आपल्या हक्काविषयी माहिती करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
यावेळी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष मिलींद पवार म्हणाले, 24 डिसेंबर 1986 ला ग्राहक सरंक्षण कायदा अस्तित्वात आला. हा कायदानुसार ग्राहकांना अधिकार देण्यात आले आहेत. ग्राहक मंचाचे काम हे पूर्णपणे मराठीत चालते. एखादी तक्रार प्राप्त झाल्यास 90 दिवसात त्या तक्रारीचा निपटारा करण्याचा आमचा प्रयत्न असतो. ग्राहकांनी कायद्याचा लाभ घ्यावा ग्राहक जागृतीत राहिला तरच हक्क अबाधीत राहतील, असेही त्यांनी शवेटी सांगितले.
राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्य सीमा परदेशी व श्रीराम नानल यांनीही यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. अन्न व औषध प्रशासन,भारतीय जीवन विमा, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, राज्य परिवहन, भारत संचार निगम, महावितरण, वजन मापे, बँक ऑफ महाराष्ट्र,   भारत गॅस  विविध सेवांची माहिती देणारे व ग्राहक जागृती करणारे   प्रबोधनपर स्टॉल्स उभारण्यात आले होते. यानंतर जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी बसस्थानकात उभारण्यात आलेल्या स्टॉलची पहाणी केली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular