जनआंदोलन करणार उभे; बुधवारी पाहणी करून ठरविणार दिशा
कराड : कराड ते विटा मार्गाला जोडणार्या ऐतिहासिक कृष्णा पुलालगत नवीन उंच पुल उभारणीचे काम सुरू आहे. ते काम पूर्ण झाल्यानंतर मजबुत असणारा जुना कृष्णा पुल पाडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे कराड शहर व परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होणार असून ब्रिटीश राजवटीचा साक्षीदार नष्ट झाल्यास कधीही न भरून येणारी हानी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सशमाजिक बांधिलीकीच्या भावनेतून कराड येथे पत्रकारांनी प्रातिनिधीक बैठक घेऊन हा पूल वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी बुधवारी सकाळी अकरा वाजता प्रत्यक्ष पुलाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करून पुढील जऩआंदोलन कराड तालुक्यातील सर्व पत्रकारांना बरोबर घेऊन उभे करण्यासंर्दभात निर्णय घेण्यात येणार आहे.
येथील कृष्णा पूल पाडण्याबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासून कराड शहरासह परिसरात सुरू झाली होती. यापार्श्वभूमीवर कराड येथील काही पत्रकारांनी याबाबत माहिती घेऊन येथील शासकीय विश्रामगृहात प्रातिनिधिक स्वरूपात चर्चा केली. यावेळी विविध मुद्द्यांवर उपस्थितांनी मते मांडली.
गुहागर-विजापूर हा राष्ट्रीय महामार्ग कराड शहरातून गेला आहे. पूर्वी कराड-विटा राज्यमार्गाला जोडण्यासाठी येथील कृष्णानदीवर पुल बांधण्यात आला. या पुलाची उंची कमी असल्याने जेंव्हा जेंव्हा कृष्णानदीला महापूर आला, त्यावेळी जुना कृष्णापुल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे अशा परिस्थिती जनजीवन विस्कळीत होऊ नये, याकरिता तत्कालीन खासदार तथा माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून जुन्या कृष्णा पुलाच्या बाजुला काही अंतरावर नवीन पुलाची उभारणी करण्यात आली. सध्य परिस्थितीला जुन्या कृष्णा पुलाचा वापर विट्याकडे जाण्यासाठी तर नवीन कृष्णा पुलाचा वापर कराडकडे येण्यासाठी केला जात आहे.
कृष्णानदीला आलेल्या महापुरात जुना कृष्णापूल अनेक वेळा पाण्याखाली गेला आहे. तरीही त्या पुलाला कोणताही धोका झालेला नाही. आणि महापुरासारखे प्रसंग क्वचितच येत असल्याने प्रवासी शक्यतो जुन्या कृष्णा पुलाचा वापर प्राधान्याने करत आहेत. कृष्णानदीच्या पलिकडे सैदापूर शिक्षणाचे माहेरघर बनले आहे. ओगलेवाडी परिसरात कराड रेल्वेस्थानक, भूकंप संशोधन केंद्र तर यशवंतनगर परिसरात सह्याद्रि साखर कारखाना यामुळे विभागाचा प्रचंड मोठा विकास झाला. या विभागाला जोडणारा प्रमुख पुल म्हणून जुन्या कृष्णा पुलाची ओळख आहे. याशिवाय गुहागर-विजापूर या शहरांना जोडणार आंतरराज्य मार्ग असल्याने कोकणातून पर्यायाने गुहागर नजीक असलेल्या हरणे बंधारातून कर्नाटक राज्याच्या उत्तर पूर्व भागात आंतराराष्ट्रीय वाहतूकीचा महत्त्वाचा मार्ग म्हणूनही या मार्गाचा उल्लेख केला जातो.
कराड शहरातून महाविद्यालय परिसराकडे जाणारा विद्यार्थ्यांचा मोठा लोंढा याठिकाणीहून ये-जा करत असतो. हा पुल नेहमीच पादचारी, सायकल स्वार, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, जीप, रिक्षा, ट्रक, बैलगाडी आदी वाहनांनी गजबजलेला असतो. त्यामुळे या पुल परिसरात अनेक लहान मोठ्या व्यवसायींकाची रोजीरोटी सुरू आहे. या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर झाले आणि जुना कृष्णा पुल मजबुत असतानाही त्याच्यावर अखेरची घटका मोजण्याची वेळ बांधकाम विभागाने आणली आहे. या ऐतिहासिक साक्षीदार कोणत्याही वाचवून भविष्यात या मार्गावरून होणार्या वाहतूकीला काही प्रमाणात वापरला जाणे गरजेचे आहे. जुन्या कृष्णा पुलाचे अस्थित्व आबाधित ठेवल्यास सैदापूर, ओगलेवाडी आदी विभागातील स्थानिक वाहतूक सुलभ होणार आहे. शालेय, कॉलेज विद्यार्थ्यांना सुरक्षित वाहतूक म्हणून या पुलाचा पर्याय कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहे. तसेच या पुलाच्या माध्यमातून स्थिरस्थावर झालेल्या लहान मोठ्या व्यवसायीकांचे व्यवसायही आबाधित राहणार आहेत.
कराड शहर व परिसरासह तालुक्यातील शालेय तसेच कॉलेज विद्यार्थी, नोकरदार, व्यवसायीक आदी नागरिकांचा नदीच्या पलिकडे आणि सैदापूर, पार्ले, कोपर्डे, मसूर, गोवारे, ओगलेवाडी, करवडी आदी गावातील नागरिकांचा कराड शहराशी दैनंदिन संबंध येतो. त्यामुळे जुना कृष्णापुल स्थानिक वाहतुकीसाठी महत्वाची कामगिरी पार पाडत आहे. या पुलाची किरकोळ डागडुजीकरून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीला पर्यायी मार्ग म्हणून जुन्या कृष्णा पुलाचा उपयोग करणे शक्य आहे. यासाठी कराडकरांसह पुलाशी संबंधित वाहतूक करणार्या नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असा यावेळी झालेल्या चर्चाचा सूर होता.
ऐतिहासिक कृष्णा पुलाच्या बचावासाठी पत्रकारांचा पुढाकार
RELATED ARTICLES