Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीकराड तालुक्यातील धरणे व बंधार्‍यांचे सर्व्हेक्षण करा

कराड तालुक्यातील धरणे व बंधार्‍यांचे सर्व्हेक्षण करा

कराड : गोटेवाडी बंधार्‍याचा सांडवा फुटल्याने या भागातील शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकर्‍यांना योग्य ती भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे सर्व्हेक्षण करावे. तसेच पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील सर्वच धरणे आणि बंधार्‍यांचे सर्व्हेक्षण करून, भविष्यातील हानी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी प्रशासनाला दिल्या. गोटेवाडी बंधार्‍याचा सांडवा फुटल्याने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते प्रांताधिकारी, कृषी अधिकारी व अन्य शासकीय अधिकार्‍यांसमवेत गोटेवाडी येथे आले असते, त्यांनी याप्रश्‍नी प्रशासनाला सूचना दिल्या.
येळगाव विभागातील गोटेवाडी गावातील बंधार्‍याचा तात्पुरता केलेला सांडवा रविवारी (ता. 7) प्रचंड पाऊस व पाण्याच्या दाबाने वाहून गेला. अचानक फुटलेल्या या सांडव्यामुळे धरणातील पाणी वाहून गेल्यामुळे खालील भागात असणार्‍या 17-18 शेतकर्‍यांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले. तसेच धरणातील दगडधोंड्यांचा खच या शेतात साचला असून, भात पीक वाहून गेले आहे. या नुकसानीची ना. डॉ. अतुल भोसले यांनी शासकीय अधिकार्‍यांसमवेत पाहणी केली.
यावेळी डॉ. भोसले यांनी हा परिसर डोंगरी विभाग असून या भागात एकच पीक घेतले जाते. अचानक झालेल्या या घटनेमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी यांनी संयुक्तपणे नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे पाठवावेत. जेणेकरून या शेतकर्‍यांना भरीव मदत करणे शक्य होईल. दरम्यान, महावितरणच्या 1 हजार मेगावॅट विद्युत वाहिनीचे खांब स्थलांतरित न झाल्यामुळे बंधार्‍याचे काम रखडले आहे. याबाबत बोलताना ना. डॉ. भोसले म्हणाले, की उर्वरित कामाचनया पूर्ततेसाठी सर्व्हेंक्षण करणे गरजेचे असून, यासाठी प्रांत कार्यालयामार्फत महावितरणला सुमारे 60,000 रूपये अदा केले जाणार आहेत. सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाल्यावर जलसंधारण खात्यामार्फत खांबाचे स्थलांतर करण्यासाठी 10 लाख रूपयांचा निधी प्रदान करण्यात येणार असून, बंधार्‍याच्या कामाच्या पूर्ततेसाठी तरतूद केलेल्या 6 कोटी 20 लाख रूपयांच्या निधीतून हे काम त्वरीत मार्गी लावले जाणार असल्याची ग्वाही ना. डॉ. अतुल भोसले यांनी दिली. तसेच धरणग्रस्तांनाही अधिकाधिक नुकसानभरपाई मिळावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रांताधिकारी हिम्मत खराडे, ग्रामसेवक श्री. शेळके, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष संजय शेटे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, संदीप भावके, नितीन साळुंखे, गोटेवाडीचे सरपंच प्रकाश कळंत्रे यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular