सरकारवर विसंबून न राहता, आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो, हा इतिहास घडवायचा आहे : खा. शरद पवार
कोरेगाव : राज्य सरकारला दुष्काळाबाबत गांर्भीय नाही. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर देता, मात्र जनावरांच्या पाण्यासाठी सरकार खर्च करत नाही, ही काही चांगली गोष्ट नाही. दुष्काळ निवारणासाठी आपण सरकारवर विसंबून न राहता, आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो, हा इतिहास घडवायचा आहे, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा धुरळा खाली बसतो ना बसतो, तोच खासदार पवार यांनी दुष्काळी भागाच्या दौर्यास सुरुवात केली आहे. कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडी आणि नागेवाडी गावाला त्यांनी शनिवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिक ग्रामस्थ, शेतकरी, लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकार्यांकडून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची अत्यंत बारकाईने माहिती घेतली. ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी वरील निर्धार केला. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, बाळासाहेब सोळस्कर, राजेंद्र भोसले, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय पिसाळ, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, उपसभापती संजय साळुंखे, तहसीलदार रोहिणी शिंदे, गटविकास अधिकारी शरद मगर, तालुका कृषी अधिकारी सुनील साळुंखे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता एस. जी. पत्की, पाणी फौंडेशनचे समन्वयक आबा लाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
खा. पवार पुढे म्हणाले, राज्य सरकार जनावरांच्या पाण्यासाठी खर्च करत नाही, ही काही चांगली गोष्ट नाही. चिलेवाडीमध्ये दुष्काळ निवारणासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून, ही स्वागतार्ह बाब आहे. आपले प्रश्न आपणच सोडवू शकतो हा इतिहास या निमित्ताने करायचा आहे, ग्रामस्थांनी यासाठी कामाला लागले पाहिजे. जिल्ह्यातील दुष्काळी गावांसाठी मी 1 कोटी रुपये खासदार निधीतून देणार आहे. यासंदर्भात मी आताच जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याशी बोललो आहे. कोरेगाव तालुक्यातील चिलेवाडीचा त्यामध्ये समावेश आहे. खासदार निधीबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र ट्रस्ट असून, त्यामार्फत आमदार शिंदे यांच्याकडे दहा लाख रुपयांचा निधी दिला जाणार असून, त्याद्वारे या भागातील जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करा. पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत जी गावे उतरली आहेत, त्यापैकी चिलेवाडीने अत्यंत मनापासून काम केले असल्याचे दिसून येत आहे. आमदार शशिकांत शिंदे व राजेंद्र भोसले यांनी पाण्याच्या टँकरची व्यवस्था केलेली आहे, हे स्तुत्य आहे.
उदयनराजे भोसले म्हणाले, कोरेगाव तालुक्यातील जनतेने मला नेहमीच भरभरुन साथ दिली आहे. जनतेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी येथे आलो आहे. भाडळे खोर्याला पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असून, ते सोडविण्यासाठी आता प्राधान्यक्रमाने उपाययोजना केली जाणार आहे. चिलेवाडी आणि नागेवाडी पंचक्रोशीत लवकरात लवकर पाणी कसे येईल, यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. दुष्काळ निवारासाठी ग्रामस्थांनी केलेल्या मागण्या अत्यंत रास्त आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी मी अहोरात्र कटीबध्द आहे. आ. शशिकांत शिंदे यांना बरोबर घेत या भागाच्या विकासासाठी मी योगदान देणार आहे.
शशिकांत शिंदे म्हणाले, चिलेवाडी गावासाठी मी आमदार या नात्याने अनेकविध कामे केली आहेत. भाडळे खोर्यातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. जिल्हा बँकेने देखील दुष्काळ निवारणासाठी पुढाकार घेतला आहे. भाडळे खोर्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही सातत्याने कार्यतत्पर आहे. माजी आमदार शंकरराव जगताप यांनी या विभागाच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटीबध्द आहे. त्यांच्या स्वप्नातून डिस्कळ घाट रस्ता पूर्ण झाला असून, त्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. लवकरच रेडे घाटाचा विषय सोडविला जाणार असून, या भागातील दळणवळण वाढल्यास, परिसराचा सर्वांगिण विकास निश्चितपणे होेणार आहे.
राजेंद्र भोसले यांनी भाडळे खोर्यातील समस्या विषद केल्या. कोरेगाव आणि फलटण तालुक्यांना जोडणार्या रेडे घाटाचे काम मंजूर असून, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे. फलटण तालुक्यात आलेले धोम -बलकवडीचे पाणी चिलेवाडीतील वागदरा तलावात आणल्यास, या भागातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी संपुष्टात येईल, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
चिलेवाडीच्या दुष्काळ निवारणासाठी निधी देणार
RELATED ARTICLES

