कुकुडवाड येथील पाणी परिषदेतील ठराव!
म्हसवड : माण तालुक्यातील कुकुडवाड पुकळेवाडी सह सोळा गावे व खटाव तालुक्यातील कलेढोण विखळे सह सोळा गावांना टेंभू उपसा योजनेतून पाणी देण्याचा निर्णय एक महिन्यात झाला नाही तर 32 गावातील जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात सोडण्याचा प्राथमिक निर्णय घेण्यात आला.
कुकुडवाड येथे (20) रोजी आयोजीत केलेल्या टेंभू उपसा पाणी परिषदेसाठी माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिलभाऊ देसाई,प्रभाकर देशमुख,यांनी प्रमुख उपस्थितीत लावली होती. वर नमूद गावे दुष्काळी भागासाठी शासनाने सुरू केलेल्या कोणत्याही पाणी योजनेत समावेश नाही.त्यामुळे ही गावे दुष्काळाने पिचली असून दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत चालली आहे.पावसाचे प्रमाण अतिशय कमी असल्याने या 32 गावात आज लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे.या भागाला पाणी मिळाले नाही तर भविष्यात लोकांना स्थलांतर करण्याशिवाय पर्याय नाही असे परिषदेचे संयोजक सदस्य विठ्ठल काटकर यांनी प्रास्ताविक भाषणात नमूद केले.
यावेळी बोलताना कोकण विभागाचे माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी या भागाला पाणी मिळण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा आम्ही करीत असून कशा पद्धतीने पाणी या गावाच्या शिवारात आणता येईल त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.तर या 32 गावांना पाणी मिळण्यासाठी यापुढे जी आंदोलने होतील त्यावेळी मी तुमच्या बरोबर असेन असे त्यांनी सांगितले.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अनिलभाऊ देसाई यांनी या 32 गावांना पाणी देण्यासाठी कटिबद्ध असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांनी माण व खटाव तालुक्यातील या वंचित गावांना पिण्याचे पाणी व शेतीचे पाणी देण्याचा शब्दच दिला आहे त्यामुळे या भागाचा पाणी प्रश्न भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून सोडवणार असल्याचे सांगताना त्यांनी सत्ता नासणार्यांनी या कामाचे कुणी श्रेय घेऊ नये असे नमूद केले.
आ. जयकुमार गोरे यांनी बोलताना सांगितले की माझ्या मतदारसंघात जी गावे वंचित राहत आहेत त्या गावासाठी टेंभुच्या पाणी वाटपाचे फेर नियोजन करा लवाद आम्हाला माहिती नाही पाणी वाटप आम्हाला माहिती नाही माझ्या मतदारसंघात पाणी आल्याशिवाय मी पाण्याचा एकही थेंब पुढं जाऊ देणार नाही ही माझी भूमिका मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली आहे. जो काय निर्णय घ्याचा तो घ्या परंतु दुष्काळी भागाला पाण्यापासून वंचित ठेऊन कुणी पाणी नेहणार असेल व आमच्या पाण्यावर कुणी हक्क सांगत असेल तर प्रसंगी कॅनॉल तोडून कायदा हातात घेऊ असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी दिपक खताळ,अतुल देशमुख, माणिक महाराज, सतीश काटकर,संजय साळुंखे, राजेंद्र लोखंडे, नवनाथ गोरड, भगवान जाधव डॉ.रवींद्र काटकर, विक्रम काटकर, इत्यादी कार्यकर्त्यांनी आपली मनोगत व्यक्त करून या भागाला पाणी मिळालं पाहिजे अशी आग्रही भूमिका मांडली.
या 32 गावातून हजारो नागरिकांनी व महिलांनी पाणी परिषदेसाठी प्रचंड उपस्थिती लावली होती.एक महिन्याच्या आत सकारात्मक निर्णय न झाल्यास यावेळी दोन ठराव घेण्यात आले पहिला ठराव जिल्हाधिकारी कार्यालयात 32 गावातील जनावरे सोडणे आंदोलन व दुसरे आंदोलन हे चितळी येथील जलसेतु मध्ये 32 गावातील महिला व पुरुष जलसमाधी घेतील त्याला शासन व प्रशासन जबाबदार असेल.शासन व प्रशासन याना एक महिन्याचा अलतिमेटम देऊन या आंदोलनाच्या तारखा टेंभू पाणी योजना संघर्ष समिती निश्चित करून निवेदन देईल असे जाहीर करण्यात आले.पाणी परिषदेसाठी कुकुडवाड व परिसरातील नागरिकांनी प्रचंड उपस्थिती लावली त्यावरून पाणी टंचाईची तीव्रता जाणवत होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल काटकर यांनी केले व तानाजी काटकर यांनी आभार मानले.
जनावरे जिल्हाधिकारी कार्यालयात सोडण्याचा निर्णय!
RELATED ARTICLES