म्हसवड (विजय भागवत) : लाखो भाविकांचे अराध्य व कुलदैवत तसेच येथील ग्रामदैवत श्री सिध्दनाथ – जोगेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा तुलसी विवाहादिवशी रात्री 12 वाजता धार्मिक विधीपूर्वक, पारंपारिक पध्दतीने लाखो भाविकांच्या उपस्थितीत थाटात संपन्न झाला.
तब्बल महिनाभर चालणार्या श्रींच्या मंगल विवाह सोहळ्याचा शुभारंभ दिवाळी पाडव्यादिवशी घटस्थापना, नवरात्रारंभ व श्रींच्याहळदी समारंभाने झाला. तुलसी विवाहादिवशी पहाटे साडेपाच वाजता मंदिराचे मुख्य पुजारी, सालकरी सुनील गुरव (कीर्तने ) यांच्या हस्ते आरती करुन मानकरी, सेवेकरी व नवरात्रकरींच्या उपस्थितीत श्रींचे 12 दिवसाचे घट उठविण्यात आले. घट उठविल्यानंतर 12 दिवसाच्या नवरात्राच्या उपवासाची सांगता होऊन उपवास सोडण्यात आले.
या सोहळ्यासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मंदिरात गर्दि केली होती. विवाहासाठी श्री सिध्दनाथ हत्तीवरून गेले होते, अशी अख्यायिका असल्याने व मंदिरातील बाहेरच्या मंडपात सहा फूट लांब व साडेचार फूट उंचीचा अखंड पाषाणाचा हत्ती आहे. या हत्तीची आकर्षक अशी सजावट करण्यात आली. त्यानंतर सुशोभित केलेली अंबारी हत्तीवर बसविण्यात आली. संध्याकाळी पाच वाजता श्रींची पंचधातूची उत्सवमूर्ती हत्तीवरील अंबारीत विधीपूर्वक बसविण्यात आली. अर्थात विवाहाला जाण्यासाठी वर सज्ज झाला.
नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, ऊसाच्या मोळ्या, भव्य अशा दोन दीपमाळा आणि आकर्षक अशी विध्युत रोषणाई यांनी संपूर्ण हत्ती मंडप सुरेख सजविण्यात आला होता. दिवसभर हत्ती मंडपाच्या मागील मोकळ्या मैदानात पंचक्रोशीतील, खेड्यापाड्यातील भाविकांचा गजी – ढोलाचा कार्यक्रम अखंड सुरु होता.
श्रींच्या मूर्तीसमोर चौक भरण्याचे व तेल उतरण्याचे काम परीट समाजातील महिलांनी केल्यानंतर सालकरी यांना हत्ती मंडपात आणण्यात आले. रात्री साडेअकराच्या सुमारास हत्तवरील अंबारीत स्थानापन्न केलेली श्रींची उत्सवमूर्ती सालकर्यांच्या छातीला बांधून मंदिरातील मुख्य गाभार्यात नेण्यात आली. बाहेरील हत्ती मंडपातून आतील गभार्यात श्रींची मूर्ती नेत असताना हजारो भाविक श्रींच्या मूर्तीस स्पर्श करण्यासाठी धडपडत होते आणि सालकर्यांसह श्रींची मूर्ती आतील गाभार्यात विवाहाप्रित्यर्थ नेण्यासाठी पुजारी मंडळी पुढे जाण्यासाठी अटोकाट प्रयत्न करीत होते. ही रणधुमाळी सुमारे अर्धा तास सुरु होती. शेवटी मोठी रस्सीखेच होऊन श्रींची मूर्ती गाभार्यात नेण्यात आली. त्यानंतर जोगेश्वरी देवीच्या मूर्तीसमोर आंतरपाट धरुन पारंपारिक पध्दतीने, विधीपूर्वक, पिंटू पाठक, प्रज्योत पाठक, गणेश पाठक आदी पुरोहितांमार्फत मंगलाष्टका म्हणून श्रींचा शाही विवाहसोहळा रात्री 12 वाजता सनई-चौघडा, ढोल-ताशा, बँड, गजी, झांज यांच्या जल्लोषात व फटाक्यांच्या आतीषबाजीत, मोठ्या थाटात संपन्न झाला. पारंपारिक रिवाजानुसार श्रींच्या विवाह सोहळ्यानंतर मंदिरातील तुळसी विवाह तसेच पुजारी मंडळीच्या घरातील तुळसी विवाह झाला.
दरम्यान,यावेळी येथील न्यायालयाचे न्यायाधीश कोल्हापुरे, ए. पी. आय. गणेश वाघमोडे, गोविंदा, अजय, विजय राजेमाने, विलासराव माने यांच्यासह श्रींचे मानकरी, सेवेकरी, नवरात्रकरी, दिवट्यांचे मानकरी, मानाच्या करवल्या, गावातील प्रतिष्टित नागरिक, पुरोहित, पुजारी मंडळी आणि लाखोंच्या संख्येने आवर्जून उपस्थित राहिलेल्या भाविकांच्या जयघोषांनी मंदीर परिसर दुमदूमून गेला.
श्रींच्या विवाहानंतरची वरातम्हणजे श्रींची रथयात्रा….ही रथयात्रा बुध वार दि.27 नोव्हेंबर रोजी असून या दिवशी तब्बल एक महिना चालणार्या श्रींच्या शाही मंगल विवाह सोहळ्याची सांगता होणार आहे. या रथयात्रेसाठी दरवर्षी 6 ते 7 लाख भाविक आवर्जून उपस्थित असतात.
दरवर्षी श्रींचा विवाह सोहळा मंदिरातील गाभार्यात होत असतो, मात्र तो सोहळा बाहेरील भाविकांना दिसत नाही.मंगलाष्टका संपल्यावर अक्षता टाकण्याचे काम भाविक करत असत, मात्र यावर्षी 5 बाय 5 चा प्रोजेक्टर हत्ती मंडपामागे लावण्यात आल्याने श्रींचा गाभार्यात चालू असणारा विवाह सोहळा बाहेरील तमाम भाविकांना प्रत्यक्ष पाहता आल्याने त्यांना खूप मोठे समाधान लाभले.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत सिध्दनाथ – जोगेश्वरीचा शाही विवाह मोठ्या थाटात संपन्न
RELATED ARTICLES