प्रशासनाकडे तक्रारी करुन देखील दुर्लक्ष : 60 वर्षांपासून वहिवाटीचा रस्ता : प्रशासनाने न्याय देण्याची मागणी
सातारा : मालगाव, ता. सातारा येथील शिवारातील गट नं. 163, 164 मधून शेतक़र्यांच्या वापरात असलेला रस्ता गेल्या दोन वर्षापासून राजकारणाच्या कारणातून अडवण्यात आल्याने या रस्त्याचा वापर करुन शेती करणा़र्या 45 शेतक़र्यांची मोठी अडचण झाली आहे. आता तर या रस्त्यावर जेसीबीने खोदून मोठा चर काढल्याने येथील वहिवाट बेकायदेशीरपणे बंद केली असून याबाबत तातडीने मार्ग काढून संबंधित रस्ता खुला करुन देण्याची मागणी दादासाहेब जगन्नाथ कदम, भास्कर गणपत कांबळे यांच्यासह 45 शेतक़र्यांनी केली आहे.
यासंदर्भात तक्रारदार शेतकर्यांतर्फे इंडिया व्हिजन संस्थेचे पंकज कुंभार यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत शेतक़र्यांनी आपली कैफियत मांडली. यासंदर्भात पूर्वी जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्यासह पोलीस ठाण्यात तक्रारी होवून देखील या शेतकर्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. यामुळे शेतक़र्यांंना साखर कारखान्यास ऊस देखील घालता आलेला नसल्याने नुकसान झाले असून आता या रस्त्यात काही दिवसांपूर्वी जेसीबीने चर खोदून व ताल धरुन हा रस्ता पूर्णतः बंद करण्यात आला यामुळे गावातील मागासवर्गीय शेतकर्यांना शेती कसता येत नसल्याचे दादासाहेब कदम व भास्कर कांबळे यांनी सांगितले.
हिरालाल निवृत्ती कदम, शैलेश नानासो कदम, वैभव उत्तम कदम व इतरांनी गट क्रमांक 163, 164 व 165 मधून जाणारा रस्ता अडवल्याने गेल्या 60 ते 65 वर्षांपासून सुरु असलेली वहिवाट थांबली आहे. रस्ता नसल्याने शेती कशी कसायची असा सवाल या 45 शेतकर्यांंसमोर उभा राहिला. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार झाली असून त्यांनी तहसीलदारांकडे जाण्यास सांगितले. त्यानंतर जिल्हाधिका़र्यांकडे याबाबत निवेदन देवून अद्याप प्रशासनाने रस्ता खुला करुन देण्यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही.
शेतक़र्यांच्या तक्रारीनंतर पाहणी करण्यात आली मात्र महसूल विभागाचे तलाठी, मंडलाधिका़र्यांनी काहीही अहवाल पाठवले नाहीत. वास्तविक महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये कलम 143 नुसार भूमापन क्रमांकाच्या सीमांवरुन रस्ता उपलब्ध करुन देण्याचा तसेच बेकायदापणे अडवलेला रस्ता खुला करुन देण्याचे अधिकार तहसीलदारांना आहेत. त्यांना देखील निवेदन देण्यात आले असून आता प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेवून आम्हाला आमची शेती कसण्यासाठी रस्ता सुरु करुन द्यावा, अशी मागणी कदम, कांबळे तसेच इंडिया व्हिजन संस्थेचे प्रमुख पकंज कुंभार यांनी केली आहे.
वहिवाटीचा रस्ता रोखून अडवणूक
मालगाव, ता. सातारा येथील या 45 शेतक़र्यांचा रस्त्याचा प्रश्न आहेच. पण आणखी 16 पाणंद रस्ते अशाच पध्दतीने अडवण्यात आलेले आहेत. वास्तविक शेतक़र्यांंची रस्ता अडवणूक करणे बेकायदा आहे. तहसीलदारांनी याबाबत चौकशी करुन शासकीय नियमाप्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक आहे. एकाच गावात राहून काहीतरी कारणातून जाणून बुजून आपल्याच शेतकरी बांधवांची अडवणूक होत असेल तर हे चुकीचे असून पाणंद रस्त्यांचे जिल्ह्यात असलेले अनेक प्रश्न सोडवले गेले पाहिजे, अशी मागणी या प्रश्नावर काम करत असलेले पकंज कुंभार यांनी पत्रकार परिषेदत केली.
मालगावात रस्ता अडवल्याने 45 शेतक़र्यांची अडचण
RELATED ARTICLES