सातारा : सातारा शहर नजिक असलेल्या समर्थनगर ग्रामपंचायत कार्यालयात दोन दिवसांपूर्वी उपसरपंचांनी दिलेल्या राजीनाम्याची मूळ प्रत ग्रामसेवक महिलेकडून घेऊन फाडल्याने चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, या बाबत तक्रार देण्यास कोणीही पुढे आले नाही. तक्रार दाखल केल्यास कारवाई केली जाईल असे वरिष्ठ पदाधिकारी यांनी सांगितले. या ग्रामपंचायतीचे सरपंच यांचा राजीनामा मंजूर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
गाजलेल्या सिंघम चित्रपटात एफआरआय क्यू फाडा या डॉयलाँगमुळे सिंघम चांगलाच गाजला होता. तसा प्रकार सातारा जिल्ह्यातील समर्थनगर ग्रामपंचायत मध्ये घडला आहे.प्रत्यक्षात समर्थनगर ग्रामपंचायत उपसरपंच शिंदे यांनी दिलेला राजीनामा अर्ज ग्रामसेवक महिलेकडून घेतला व चक्क सर्वांच्या समोर अर्ज फाडून टाकला. याबाबत महिला ग्रामसेवकांनी विचारणा केली. पण, त्यांना कोणाची साथ लाभली नाही.
शासकीय कामात अडथळा निर्माण केला तर कोणत्या शिक्षेची तरतूद आहे. याची भली मोठी यादी सातारा जिल्ह्यातील सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालयात ठळक अक्षरात लावण्यात आली आहे. राजकीय वातावरणात त्याचा वापर केला जातो. पण, एखाद्या शासकीय महिला कर्मचार्यांना बाबत कोणी शासकीय कामात अडथळा केला तर त्याला जाब विचारण्याचे धाडस ग्रामसेवक संघटना व इतर संघटना सुध्दा करीत नाही. हे या प्रकरणात पाहण्यास मिळाले आहे.
सदरच्या प्रकरणाबाबत महिला वर्गात सामाजिक काम करणार्या महिला व पुरोगामी संघटना आंदोलन करण्याच्या उद्देशाने रस्त्यावर उतरून जाब विचारण्यासाठी हालचाल करीत असतानाच उपसरपंच यांनी पुन्हा राजीनामा अर्ज दाखल करून झालेली चूक सुधारली आहे. या प्रकरणात पंचायत विस्तार अधिकारी यांनी समर्थनगर ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. वरिष्ठांना अहवाल सादर करण्यापूर्वीच हे प्रकरण मिटल्याचा जावई शोध लावून शासकीय कामात अडथळा होऊन सुध्दा प्रकरण मिटल्याचाचे समाधान करून घेतले.
याबाबत सभापती मिलिंद कदम यांच्याशी संपर्क साधला असता, त्याठिकाणी उपस्थित असलेल्या व्यक्तींनी लेखी तक्रार दाखल केल्यास कडक कारवाई करण्यात येईल. अध्याप कोणीही तक्रार देण्यास पुढे आले नाही. ही बाजू समजून घेतली पाहिजे असे स्पष्ट केले. सातारा पंचायत समितीच्या माध्यमातून अनेक विकास कामे व शासकीय योजना ग्रामीण भागात राबविण्यात येतात. ग्रामसेवक,ग्रामविस्तार अधिकारी परिश्रम घेतात पण, असा प्रकार महिला कर्मचार्यांच्या बाबतीत घडल्यानंतर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे कोणी उभे राहत नाही. ही शोकांतिका असल्याचे चित्र दिसून आले असल्याची चर्चा होत आहे.
समर्थनगरमध्ये ग्राम कार्यालयात राजीनामा अर्ज फाडल्याने चर्चेला उधाण
RELATED ARTICLES