स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी : बेमुदत ठिय्या आंदोलनाचा इशारा
सातारा: सन 2017 – 18 आणि 2018- 19 मधील गळीत हंगामात गाळप झालेल्या उसाचे बिल आणि अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्याकडे केली आहे. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सन 2017 – 18 आणि 2018- 19 मध्ये गाळप झालेल्या उसाचे पेमेंट काही कारखान्यांनी अद्याप शेतकर्यांना दिलेले नाही. याबाबत आमच्या संघटनेकडून आपल्या कार्यालयाकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. शेवटी आम्ही आंदोलने करून आरआरसी कारवाईचा आदेश मिळवून देऊन सुद्धा आपल्या कार्यालयाकडून कार्यवाही न झाल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागले आहेत. आमच्या संघटनेचे याअगोदर दिलेल्या निवेदनावर उलट तपासी उत्तरही देण्याची तसदी आपल्या कार्यालयाकडून घेण्यात आलेली नाही. कारखानदारांनी जाणिवपुर्वक शेतकर्यांची बिले एफआरपी कायद्यानुसार देणे बंधनकारक असून सुद्धा आपल्याकडून कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने कारखानदार शेतकर्यांना जुमानत नाहीत. त्यामुळे अनेक कारखानदारांकडून आजही शेतकर्यांच्या कष्टाचे पैसे देण्यास चालढकल केली जात आहे.
यामध्ये काही शेतकर्यांनी आपले जीवन संपवले तरीही प्रशासनाला जाग आलेली नाही. येत्या चार दिवसात सातारा जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांची सन 2017 – 18 आणि 2018- 19 मधील चालू हंगामातील बिले न मिळाल्यास आपल्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. चालू वर्षी अतिवृष्टी व परतीचा पाऊस लांबल्यामुळे हाताला आलेली नगदी पिके नष्ट झालेले आहेत. शेती क्षेत्राचे कधी न भरून येणारे नुकसान या हंगामात झाले आहे. राज्याच्या या सार्वजनिक निवडणुका झाल्यामुळे सरकारचे अद्यापि शेतकर्यांकडे लक्ष नाही. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून सर्व पिकांचे तातडीने पंचनामे करून संबंधित शेतकर्यांना नुकसान भरपाई तात्काळ द्यावी. संपूर्ण सातबारा कर्जमुक्त करण्यात यावा, कांदा, बटाटा, आले अशा पिकांचा नुकसान पंचनाम्यात समावेश करण्यात यावा, अशी मागणीही संघटनेने यावेळी केली आहे.
अर्जुनराव साळुंखे, राजू शेळके, देवानंद पाटील, धनंजय महामुलकर, दादासाहेब यादव, रमेश पिसाळ, बापूराव साळुंखे, प्रमोदसिह जगदाळे, संदीप पवार आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ऊस बिलासह अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतकर्यांना तातडीने मदत द्या
RELATED ARTICLES