Sunday, June 22, 2025
Homeठळक घडामोडीपवारांनी धरला ‘नेम’, होई राजांचा गेम

पवारांनी धरला ‘नेम’, होई राजांचा गेम

आतापर्यंत पवारांनी दाखलाय सहा मुख्यमंत्र्यांना घरचा रस्ता
सातारा (डॅनियल खुडे) : गेले 52 वर्षांचा राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असणार्‍या शरद पवारांनी आत्तापर्यंत राजकारणात अनेकांवर निशाना साधून त्यांचा व्यवस्थित गेम केला. परंतु यंदाच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत 80 वर्षाच्या पवारांनी जणू काय ‘एके-56’ च हातात घेतली. यामध्ये सातारच्या राजांपासून मुख्यमंत्री फडणवीसांपर्यंत तसेच भाजपच्या अनेक आमदारांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला. त्यामुळेच सध्या सातारसह संपूर्ण महाराष्ट्रात ‘धरती पवार नेम होई राजांसह अनेकांचा गेम’ अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
शरद पवार एक अजब रसायन ! सध्या महाराष्ट्रातील तरुणाई 80 वर्षाच्या तरुणाकडे पाहून इंप्रेस झाली आहे. जिथे भले-भले 17 आमदार सोडून गेले तेथे 54 जण निवडून आणणारे शरद पवार यांनी सरकार स्थापनेत मोठा टिव्सट आणत जणू सरकारच ताब्यात घेतले. दोन्ही राजांचे भांडण सोडवत, ‘नका जाऊ राष्ट्रवादी सोडून’ अशी साद घातली परंतु उदयनराजेंना सत्तेचे डोहाळे लागले होते. त्यामुळे त्यांना जिकडे-तिकडे भाजपच दिसू लागले होेते. तर नेहमीच उदयनराजेंच्या बाजूने उभे राहणारे पवार आपल्या बाजूने काहीच पॉवर लावत नाही म्हणून संतापाने निघून गेलेले शिवेंद्रसिंहराजे…. पुन्हा नियतीने दोन्ही राजांना एकत्र आणले परंतु यावेळी त्यांच्या पाठीशी उभी होती मोदी-शहाची जोडगोळी ! त्यामुळे दोन्ही राजांच्या स्वप्नांना पंख फुटले….. तसेच राष्ट्रवादी व काँग्रेस सोडून बाहेर पडणार्‍यांच्या ही स्वप्नांना बळकटी आली. मात्र येथे नियतीने जणू ‘एके-56’ च पवारांच्या हाती दिली.
2019 ची विधानसभा निवडणुक ही अनेक अर्थांनी गाजली. या निवडणुकीची चर्चा महाराष्ट्रात अनेक वर्ष चर्चिली जाईल. राष्ट्रवादी संपत चालली असतानाच फिनिक्स पक्ष्याप्रमाणे राखेतून उठून आकाशाला गवसणी घालणार्‍या पवारांची पॉवर पुन्हा एकदा महाराष्ट्राने पाहिली. ज्या तरुणाईने पवारांच्या राजकारणाचे जुने किस्से ऐकले होते. त्यांना मात्र ‘याच देही याच डोळा’ पवारांच्या राजकारणाचे डाव पाहता आले.
शिवेंद्रबाबा असे नका जाऊ…..
उदयनराजे भोसले व शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाद संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. त्याची उजळणी करुन जुन्या कडीला ऊत नको थोडक्यात काय तर उदयनराजे राष्ट्रवादीतच राहून शिवेंद्रसिंहराजेंना व रामराजेंना त्रास देतात असा या दोघांचा आरोप होता. वारंवार याबाबत हायकमांड पवार साहेबांकडे तक्रारी केल्या जात परंतु पवार नेहमीच ही भांडणे ‘धुपत’ ठेवत की मिटवण्याचा प्रयत्न करीत हे त्यांची त्यांनाच माहित. परंतु शिवेंद्रसिंहराजेंची पक्की खात्री झाली की पवार हे नेहमीच उदयनराजेंच्या पाठीशी राहतात त्यामुळे आपल्यावर अन्याय होतोय तसेच येणार्‍या विधानसभेत एकत्र राहिल्यास उदयनराजे गनिमी कावा करुन आपल्याला पाडतील असे विविध प्रश्‍न शिवेंद्रबाबांच्या मनात आले व त्यांनी पवारांचा हात सोडला. परंतु हा हात सोडताना भाजपचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना आपलेच सरकार येणार असे सांगत सहकार मंत्रीपदांची माळ तुमच्याच गळ्यात पडणार असल्याचे सांगितले. शिवेंद्रसिंहराजेंनी सर्व ताकद पणाला लावली. व आमदारकी मिळवलीही आता भाजपने दिलेला शब्द पाळणे एवढेच बाकी होते. परंतु राजकारणात या भिष्माचार्याने अशी काय तलवार चालवली की मुख्यमंत्रीच काय संपूर्ण भाजपालाच उचलून घरचा रस्ता दाखवत विरोधी पक्षात बसवलं त्यामुळे फडणवीसांबरोबरच शिवेंद्रसिंहराजेंच्या ही स्वप्नांचा चक्काचूर झाला आहे.
उदयनराजेंच्याही स्वप्नांचा चक्काचूर
शिवेंद्रसिंहराजे भाजपात जाऊन मंत्री झाले तर जिल्ह्यात त्यांच्या हाताखाली काम करावे लागेल असे काही-बाही कार्यकर्त्यांनी सांगताच उदयनराजेच भाजपात डेरे दाखल झाले व केंद्रात मंत्रीपद मिळवण्याचा शब्द घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींची सातार्‍यात तर अमित शाहची सभा कराडात घेतली. परंतु जनतेने एकदा पारड्यात मत टाकले असताना महाराजांनी ते लाथाडले व मला जिल्ह्याचा विकास करायचाय त्याच्यासाठी भाजप हाच पर्याय आहे असे म्हणत निवडणुक लढविली. पवारांनी ज्याच्यावर भरवसा केला तोच राजा असा वागल्यामुळे 80 वर्षीय पवारांना आणखीनच बळ चढले त्यावर निसर्गानेही मुक्त हस्ते उधळण करीत पवारांवर विजयाचा पाऊस पाडला या सातार्‍यातील पावसाने भाजपचे सत्तेचे स्वप्न वाहून गेले.
थोडक्यात काय तर राजकारणात कधी ही काहीही होवू शकते मंत्रीपदाची माळ अनेकांच्या गळ्यात पडणार असतानाच गेम चेंजर पवारांनी गेमच पालथा केला. सातार्‍यातील दोन्ही राजांवर निशाना साधतच मुख्यमंत्री फडणवीसांचाही गेम केला एवढ्यावर थांबतील ते पवार कसले ते म्हणताहेत मी काय केले? आता फक्त निशाना धरलाय खटक्यावर अजून बोट पडायचय !
मुख्यमंत्र्यांना आपटण्यात पवार नेहमीच तरबेज
* मुख्यमंत्री कै. बॅ. अंतुले यांनी पवारांना त्यावेळी जाहीर आव्हान देण्यास सुरुवात केली होती. पवारांनी त्यांचा सिमेंट घोटाळा असा काही बाहेर काढला की त्यामधून ते शेवटपर्यंत बाहेर पडू शकले नाही व मुख्यमंत्रीपद घालवून बसले.
* तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना पुलोद काढून मुख्यमंत्री पदावरुन पाडले होते.
* तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकचा गेम ही महाराष्ट्राने पाहिला आहे.
* मुंबईत दहशतवादी हल्ला झाल्यानंतर काँग्रेसचे मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांचे मुख्यमंत्री पद घालवण्यासाठी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांना राजीनामा देण्यास सांगितले त्यामुळे काँग्रेसवरचा दबाव वाढला व विलासराव देशमुखांना राजीनामा द्यावा लागला.
* त्यानंतर आलेल्या मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शहिदांच्या पत्नींच्या नावे मिळणार्‍या सदनिका लाटल्याचे कळताच विरोधकांना पुरावे देवून अशोक चव्हाणांना मुख्यमंत्रीपदापासून हात धुवावा लागला.
* व आत्ता फडणवीसांचा गेम संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला हा डाव पवारांनी असा काय टाकला की जनता तर सोडाच स्वत: फडणवीसांनी देखील तोंडात बोट घातले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular