सातारा : सातारचा पारा 40 अंशांच्या पुढे सरकू लागला असून अवघ्या जिल्ह्यात उष्णतेत वाढ झाली आहे. नागरिकांना वाढत्या उन्हाचा चटका सोसवेनासा झाला आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे अनेकजण भर उन्हाळ्यात घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत. यानिमित्ताने होणारी किरकोळ खरेदी थांबल्याने बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. बहुतेक दुकानदारांचा दुपारचे वेळी आपली दुकाने बंद ठेवून विश्रांती घेण्याकडे कल आहे. उन्हाच्या झळा सोसत शेतात काम करणारे शेतमजूर विविध ठिकाणी काम करणारे कामगार यांचा जीव मेटाकुटीस येत असून पोटाला पर्याय नसल्याने या परिस्थितीत काम करणे त्यांना भाग पडत असल्याचे दिसून येत आहे.
बहुतांश नागरिक दुपारच्या वेळी घरातच फॅनच्या वार्याखाली राहणे पसंत करत आहेत. जे दुपारी बाहेर पडत आहेत ते उन्हापासून आपला बचाव करण्यासाठी डोक्याला टोपी, डोळ्याला गॉगल तर महिलांच्या हातात पावसाळ्यात नेहमी दिसणारी छत्री आता उन्हाळ्यातही डोक्यावर दिसत आहे. कडक उन्हापासून बचावासाठी प्रामुख्याने डोक्याला टोपी, डोळ्याला गॉगल घालून नागरिक बाहेर पडत असून उन्हाळी कपड्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत आहे. रस्त्यावरील ज्युस, फळांच्या स्टॉलसह बर्फावरील थंडगार कलिंगड खाण्याकडे कल वाढला आहे. शहर व परिसरात असणार्या उद्यानात दुपारच्या सत्रात नागरिक वामकुक्षी घेताना दिसत आहेत. बसस्टॉप, रिक्षा थांबे येथेही प्रवासी वर्ग सावलीचा अडोसा घेताना दिसत आहे. झाडांची, वाहनांची तसेच मिळेल ती सावली शोधून उन्हापासून संरक्षण करत असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसत आहे.
उन्हाच्या तडाख्याने जनजीवन होरपळून गेले असून दुपारच्या वेळी तर रस्त्यावर सन्नाटा पसरत आहे. पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिकांची उलघाल होत आहे. आभाळ भरून येत असले तरी ते बरसत नसल्याने उकाड्यात आणखी वाढच होत आहे. दरम्यान, थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरचा पाराही 35 अंशांवर गेला आहे.
सातार्यात उन्हाच्या झळांनी नागरिकांचा जीव मेटाकुटीस
RELATED ARTICLES