– जिल्हाधिकारी श्वेता सिंघल
सातारा : संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखीमार्गात वारकर्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी प्रत्येक विभागाने सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी आज केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने बैठक आज जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, वाईच्या प्रांताधिकारी संगिता चौगुले, जिल्हा नियोजन अधिकारी बी.जे. जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
वारकर्यांसाठी टॉयलेट उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेता देण्यात आली आहे. टॅायलेटचे दरपत्रक लवकरात लवकर निश्चीत करुन टॉयलेट उपलब्ध करुन घ्यावेत, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या, विद्युत वितरण कंपनीने पालखी मुक्कामाच्या ठिकाणी लाईट जाणार नाही,याची दक्षता घ्यावी तसेच अनेक ठिकाणी बेकायदा वीज कनेक्शन घेतले जातात यासाठी पोलीस व विद्युत वितरण कंपनीने पथक तयार करुन बेकायदा कनेक्शन कट करुन टाकावेत व कायदेशीर वीज कनेक्शन द्यावे.
आरोग्य विभागाने पालखी मार्गात वैद्यकीय पथक तैनात करावेत. तसेच वारकर्यांसाठी गॅस व केरोसीन पुरविण्यात यावे. अन्न व औषध प्रशासनानेही अन्न पदार्थ तपासणीसाठी पथक तैनात करावे. वेळोवेळी वारकर्यांसाठी पुरविण्यात येणार्या पाण्याची तपासणी करावी. माहिती व जनसंपर्क विभागामार्फत पालखी मार्गात संवाद वारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाद्वारे विविध विभागांच्या योजनांची माहिती संवादवारीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, यासाठी सर्व विभागांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केल्या.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी तळांची केली जिल्हाधिकार्यांनी पहाणी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी काल दि. 8 मे रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी तळांची पहाणी केली. यावेळी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या आषाढीवारी सोहळ्याची व्यवस्था, पालखी तळांची स्वच्छता, अन्य व्यवस्था, तात्पुरती शौचालये, वीज व दर्शनबारीची पालखी तळावरील व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच वारकर्यांसाठी पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरविण्यात येते या टँकर फिडींग पॉईंटची पहाणी करुन संबंधित अधिकार्यांना पाणी पुरवण्याबाबत सूचना केल्या.
वारकर्यांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही यासाठी सुक्ष्म नियोजन करावे
RELATED ARTICLES