सातारा : धावडशी (ता. सातारा) येथील शेतकरी शालीवान जयसिंग पवार (वय 33) याचा कळंबे येथील शिवारात गुरुवारी रात्री 11.45 च्या सुमारास मित्रानेच डोक्यात टिकाव घालून खून केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शालिवान पवार हा कळंबे येथील शिवारात आपल्या मित्राबरोबर शेताच्या बांधावर चेंबर काढण्यासाठी टिकावाच्या साह्याने खड्डा खोदत होता. शालीवान याच्या समवेत असलेला त्याचा मित्र अनिल तुकाराम पवार रा. मकनपुर लमाण तांडा, कर्नाटक (सध्या राहणार नेले ता. सातारा) याच्याशी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. भांडणाच्या रागात अनिल याने शालिवानच्या हातातील टिकावाने शालीवानच्या डोक्यात, मानेवर घाव घातले. यामध्ये शालीवान याचा जागीच मृत्यू झाला.
तेथील शेतकर्यांना ही घटना कळताच त्यांनी फोनवरून पवार यांच्या नातेवाईकास कळवली. शेतामधे शालीवान हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. ही खबर पोलीस पाटील यांनी रात्रीच पोलिसांना दिली. घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा करून संबंधितावर गुन्हा नोंद केला. शुक्रवारी सकाळी संबंधित आरोपीस अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मिथुन मोरे करत आहेत.
डोक्यात टिकाव घालून मजुराचा निर्घृण खून
RELATED ARTICLES