तीव्र आंदोलनासह, रास्ता रोको करण्याचा ग्रामस्थांचा निर्धार
वाई : दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला असल्यामुळे धोम धरणातून अतिरिक्त पाणी नदी व कालव्यातून सोडण्यात येत आहे. प्रशासनाने प्राप्त परिस्थितीत घेतलेला हा निर्णय योग्य असला तरी त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील बाधीत गावांमधील जनतेला भीषण पाणीटंचाई जाणवत आहे याचाही विचार प्रशासनाने करण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा वाई च्या पश्चिम भागात पाणी प्रश्न पेटण्याची चिन्ह दिसत आहेत.
दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याचे दुर्भिक्ष जाणविणार्या भागात पाणी पोहोचवण्यासाठी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत असल्याचे प्रशासन सांगत असले तरी ते साफ खोटे असून राजकीय दबावाला बळी पडत असल्याची चर्चा तालुक्यात ऐकावयास येत आहे. धरणातील पाणी जाणीवपूर्वक नियमबाह्य पद्धतीने वापरले जात आहे,प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराचा फटका वाईच्या पश्चिम भागातील जनतेला बसत आहे. जिल्ह्याच्या भल्यासाठी स्वतः च्या घरावर तुळशीपत्र ठेवले तरीही प्रशासनाने व राजकीय पुढार्यांनी स्वतःच्या स्वार्थापोटी येथील जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत ज्यांच्या त्यागामुळे संपूर्ण जिल्हा सुखी झाला परंतु या भागातील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, या भागातील जनतेचा पाण्यावरील हक्क लक्षात घेता पाण्याची कसलीही कमतरता या भागात जाणविणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेणे आवश्यक आहे, तसे होताना दिसत नाही, धोम व धोम-बलकवडी धरणांतील एकूण पाण्याचा हिशोब प्रशासनाने जाहीर करावा अशी मागणी वाईच्या पश्चिम भागातील ग्रामस्थ करीत आहेत. धोम धरणातील पाणी वाटपाच्या मुळ आराखडयात काही बदल झाला असल्यास जनतेला त्याची माहिती देणे शासनावर बंधनकारक आहे. परंतू याबाबत संबंधित जनतेला अद्यापपर्यंत विश्वासात घेतलेले नाही ही या भागाची शोकांतिका आहे.
सातारा व सांगली जिल्ह्यातील कमी पावसाच्या प्रदेशातील जनतेला पाणी देण्यासाठी धोम, कण्हेर, उरमोडी या तीन धरणांना एकाचवेळी मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील उर्वरित खंडाळा व फलटण तालुक्यांसाठी निरा-देवघर धरणाचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला होता. त्यावेळी सखोल विचारांती उपलब्ध सर्व पाण्याचे वाटप करण्यात आले होते. सहा टक्के पाणी साठा या भागातील ग्रामस्थांसाठी राखून ठेवण्यात आला होता. परंतु काही धरणांच्या कामाला विलंब झाल्यामुळे धोम धरणातील पाण्याचा नव्याने वेगळा हिशोब मांडून (फसव्या आकडेवारीचा) येथील पाणी पळवण्याचा प्रयत्न करण्यात येवून या भागातील नागरिकांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रयत्न झाला आहे.
धोम धरणासाठी ज्या जनतेने सर्वस्वाचा त्याग केला ते बाधीत लोकच आता पाण्यासाठी तडफडत आहेत. धोम धरणाच्या भूमीपूजन समारंभापूर्वी या क्षेत्रातील उपलब्ध संपूर्ण पाण्याचा हिशोब करून त्याचे वाटप करण्यात आले होते. त्या वाटपा प्रमाणे सध्या पाणी दिले जात नाही तरी त्याचा खुलासा पाटबंधारे खात्याने करावा अन्यथा या भागातील शेतकरी, कष्ठ्करी जनता रस्त्यावर उतरून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. राजकीय आणि धनदांडगे लोक तेच धोम धरणातील पाण्याचा अतिरिक्त लाभ घेताना दिसत आहेत.मुळ वाटपानुसार ज्यांना हक्काचे पाणी मिळायला पाहिजे, त्यांच्यावर अन्याय होत असून ही बाब खपवून घेतली जाणार नाही. यासाठी बुडीत क्षेत्रातील जनतेसाठी किती पाणी राखून ठेवण्यात आले आहे व प्रत्यक्षात किती पाण्याचा वापर केला जातो हे प्रशासनाने जाहीर करावे. तसेच 1967 साली (धरणाचे बांधकाम सुरू करताना) धोम धरणाच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्रात उपलब्ध असलेल्या पाण्याचा शासनाने केलेला अभ्यास व त्या पाण्याचे केलेले वाटप कशाप्रकारे केले आहे त्याचाही तपशील शासनाने जाहीर करावा. त्यात काही राजकीय नेत्यांच्या दबावापोटी बदल केला असल्यास तो कोणत्या निकषाद्वारे केला हेही जाहीर करावे, अशीही मागणी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आली आहे.
दुष्काळी परिस्थितीत पिण्यासाठी अतिरिक्त पाणी सोडण्यास आमची काही हरकत नाही. तेवढी माणूसकी आमच्यात नक्कीच आहे. परंतु आमचे हक्काचे आणि गरजेचे पाणीही जर कोणी जाणीवपूर्वक पळवून नेत असेल तर ते सहन केले जाणार नाही. आमच्याच पाण्यापासून आम्हालाच वंचित ठेवण्याचा प्रयत्न हाणून पाडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही याची नोंद प्रशासनाने घ्यावी.
धोम व धोम-बलकवडी धरणांतील बाधीत जनतेने भविष्यात निर्माण होणार्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संघटीत व्हावे आणि या विषयावर अभ्यासपूर्ण सखोल चर्चा करावी असे आवाहन वाईच्यापश्चिम भागतील ग्रामस्थ करीत आहेत. तसा जाब विचारण्या साठी वाई च्या पश्चिम भागातील जनता चक्का जाम आंदोलन करण्याच्या तयारीत आहे, असाही इशारा दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिला आहे.
धोमधरणातील पाणीसाठा नेमका कोणासाठी, पश्चिम भागातील लोकांची आर्त किंकाळी
RELATED ARTICLES