तज्ञ संचालक प्रदीप क्षीरसागर यांची पत्रकार परिषदेत
सातारा : वाई तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीच्या बावीस संचालकांचा मनमानी कारभार सुरू आहे. कर्मचारी भरती, गाळ्यांचे बांधकाम या सारख्या अनेक प्रकरणात अनियमितता असून समितीला चाळीस ई ची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे तज्ञ संचालक प्रदीप कृष्णा क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कामकाजात अनियमितता असल्याचा आरोप क्षीरसागर यांनी करत जिल्हा उपनिबंधक सातारा यांनी वाई कृषी उत्पन्न बाजार समितीला चाळीस ई ची नोटीस बजावल्याचे सांगितले. क्षीरसागर यांनी जी माहिती संचालक मंडळाला मागितली त्याची उत्तरे त्यांना देता आली नाहीत. संस्थेमध्ये नियमबाह्य नोकर भरती, शिपाई भरती अंर्तगत पदोन्नती, या सारख्या गोष्टींची माहिती मागितली असता संचालक मंडळाने त्यास नकार दिला. ही माहिती गोळा करण्यासाठी सहाय्यक निबंधक वाई यांची नेमणूक करण्यात आली होती.
या चौकशीत अनेक प्रकरणात अनियमितता आढळल्याचे लक्षात आले. बाजार समिती सेवकांचा पणन संचालनालय यांच्या शेड्युल प्रमाणे मूळ स्टाफची नियम व अटी न पाळता भरती करण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने जिल्हा निबंधक सातारा यांनी चौकशीची नोटीस लावली आहे. बाजार समितीचे संचालक मंडळ आ. मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत. पाचवड येथील व्यापारी गाळ्यांच्या बांधकामाचे टेंडर सुध्दा अनियमित पध्दतीने देण्यात आले. त्यामुळे संचालक मंडळ लवकरच बरखास्त होण्याची चिन्हे आहेत असा आरोप क्षीरसागर यांनी केला.
वाई बाजार समितीत राष्ट्रवादीच्या बावीस संचालकांचा मनमानी कारभार
RELATED ARTICLES