सातारा : दुष्काळी भागाला वरदायी ठरणार्या टेंभू, जिहे-कठापूर आणि उरमोडी पाणी योजनांना निधी मागणी करणारा राज्य सरकारचा प्रस्ताव केंद्र सरकारने स्वीकारला असून मंजुरीनंतर येत्या मार्च अखेर तिन्ही योजनांना निधी मिळेल, अशी माहिती भाजप नेते डॉ. दिलीपराव येळगावकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येळगावकर म्हणाले, निवृत्त अभियंता मंडळ व माजी सैनिक मंडळ यांनी जिहे-कठापूर योजना तयार केली. या दोन्ही मंडळांनी तत्कालीन अनेक मुख्यमंत्र्यांना ही योजना सादर केली. परंतु, त्याला मंजुरी मिळू शकली नाी. युती सरकारच्या काळात निवृत्त अभियंता मंडळाचे श्री. जांभळे यांनी आपल्याला सांगितल्यावर प्रदेशाध्यक्ष सूर्यभान वहाडणे व जलसंपदा मंत्री महादेवराव शिवणकर यांच्याकडे नव्याने प्रस्ताव सादर केला. त्यानंतर वारंवार पाठपुरावा केल्यानंतर 1996 साली या योजनेचे सर्वेक्षण झाले व 11/2/1997 साली युती सरकारने 269 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेला प्रत्यक्ष मान्यता दिली.
त्यानंतर युती सरकार गेल्यानंतर ही योजना अडचणीत आली. तेव्हा तत्कालीन आघाडी सरकारने घोषणा करुन जिहे-कठापूरचे काम सुरु झाले. परंतु, ती अडकलेलीच राहिली. राष्ट्रवादीचे मंत्री अजित पवार यांनी खातगुण येथून या योजनेची मशिनरी जानाई-शिरसाई योजनेसाठी नेली. त्यावर मी विधानसभेत उपोषण केले. याची दखल घेत अजित पवार यांनी घोषणा करून पुन्हा ही मशिनरी आणली आणि वर्धनगड बोगद्यानजीक योजनेचे काम सुरु झाले परंतु, तेही तात्पुरते.
या योजनेच्या पाईपलाईनसाठी जमीन संपादीत न झाल्याने ही योजना रखडली आणि यासाठी तत्कालीन मंत्री रामराजे व शशिकांत शिंदे हे जबाबदार आहेत. त्यांनी भूसंपादनाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले. पाईपलाईनसाठी भूसंपादनाची गरज नव्हती. शेतकर्यांची समजून काढण्याची गरज होती. मात्र, तसे घडले नाही आणि भूसंपादनाचा प्रस्ताव व्यपगत झाला.
ही योजना पूर्ण व्हावी यासाठी 1995 सालापासून मी भांडतोय आणि पूर्ण होईपर्यंत भांडणार, असे सांगून डॉ. येळगावकर यांनी श्रेय घेणार्यांना चांगलेच फटकारले. पाळणा कुणाचा हलतोय आणि पेढे कोण वाटतंय, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.
यावेळी पत्रकार परिषदेस संतोषभाऊ जाधव, शिवाजीराव शिंदे, बाळासाहेब मासाळ, विकल्प शहा, डॉ. राजेंद्र खाडे, नीलेश यादव यांच्यासह खटाव, माण, कोरेगाव तालुक्यातील भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. येळगावकर हेच जिहे-कठापूरचे जन्मदाते-संतोष जाधव
डॉ. दिलीप येळगावकर हे सुरुवातीपासून पाठपुरावा करत असून तेच जिहे-कठापूर योजनेचे खरे जन्मदाते आहेत. प्रशासकीय माहिती नसताना पत्रकार परिषद घेणे चुकीचे आहे, अशी टीका संतोष जाधव यांनी महेश शिंदे यांचे नाव न घेता केली.
महेश शिंदेेंची पत्रकार परिषद अनावधानाने
दरम्यान, या योजनेला कुणाचेही नाव द्यावे, नावाचा मुद्दा महत्त्वाचा नाही. आणि या योजनेला निधी मिळावा यासाठी राज्य सरकारने शिफारस केली आहे. केंद्राने अद्याप घोषणा केलेली नाही. त्यामुळे महेश शिंदेंनी अनावधानाने पत्रकार परिषद घेतली असावी, असेही डॉ. येळगावकर यांनी यावेळी सांगितले.