सातारा : मांढरदेव यात्रेदरम्यान जिल्हयातील सर्व यंत्रणानी सतर्क राहून आपआपसात समन्वय ठेवावा आणि आपणाला दिलेली जबाबदारी पार पाडावी, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांनी आज दिल्या.
मांढरदेव येथील श्री काळेश्वरी देवीची यात्रा 1,2 व 3 जानेवारी 2018 रोजी होणार आहे. त्या यात्रेच्या नियोजनाबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात सर्व यंत्रणांची आढावा बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. गायकवाड बोलत होते. या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.बी. पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे, वाईच्या प्रांताधिकारी अस्मिता मोरे, तहसीलदार अतुल म्हेत्रे आदीसह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश शिंदे यांनी यावेळी विविध विभागांचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामपंचायतीमार्फत पाण्याचे शुध्दीकरण, तात्पुरत्या शौचालयांची उपलब्धता, जंतुनाशक औषधफवारणी, त्याचबरोबर रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही याबाबत उपाययोजना करण्यात येत आहेत. कचरा होऊ नये यासाठी दर्शन मार्गावर जागोजागी कचरा कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी ठराविक ठिकाणी होऊ नये यादृष्टीने स्टॉल धारकांच्या जागांचे नियमन करावे. अन्न धान्यांच्या स्टॉलला परवानगी देतांना अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना घेणे बंधनकारक करावे.
अन्न व औषध प्रशासनामार्फत खाद्य पदार्थ तयार करणार्या व्यावसायिकांसाठी शिबीर अयोजन केले असून परवाने देण्यात येणार आहेत. त्याच बरोबर काय दक्षता घ्यावी याबाबत फलक लावण्यात येणार आहे. तसेच अन्न पदार्थांचे नमुने घेऊन तपासणी करण्यात येईल. त्यासाठी पथकांची नियुक्ती केली जाईलअशी माहिती अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिली.
देवस्थान विश्वस्थांमार्फत नियंत्रण कक्ष स्थापने, , पशुहत्या बंदीबाबत सर्वत्र फलक लावण्यात येणार असून, साफसफाईसाठी कर्मचार्याची नेमणूक करण्यात आहे. वीज वितरण कंपनीतर्फे तात्पुरत्या जोडण्या देण्यात येतील. तसेच काळजी घेण्याबाबत फलक लावण्यात येतील अशी माहिती बैठकीत देण्यात आली. उत्पादन शुल्क विभागामार्फत यात्रेच्या दरम्यान तीन दिवस वाई शहर परिसरात मद्य विक्री बंद ठेवण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
सर्व यंत्रणांनी आपआपसात समन्वय ठेवावा, अशा सूचना करुन अपर जिल्हाधिकारी श्री. गायकवाड पुढे म्हणाले, ही यात्रा यशस्वी करण्यासाठी आपणाला नेमुन दिलेली जबाबदारी पूर्ण करावी. बीएसएनएलने आवश्यक ते दूरध्वनी जोडणी जोडण्यात याव्यात. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाने पथके तैनात ठेवून तपासणी करावी. प्रवाशांसाठी पुरेशा व सुस्थितीत एस.टी. ठेवाव्यात अशा सूचना त्यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाला दिल्या. ग्रामपंचायत तसेच पाणी पुरवठा विभाग यांनी आवश्यक त्या उपाययोजना करुन खबरदारी घ्यावी.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरील खड्डे त्वरीत भरावेत. दुरुस्तीचा दर्जा चांगला ठेवावा. आवश्यक त्या ठिकाणी संरक्षक कठडे तयार करावेत. सर्व विभागांनी सतर्क राहून एकमेकांच्या समन्वयाने काम करा. कोणतीही दुर्घटना घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा सर्व संबंधित विभागांनी सतर्क राहून अशा घटना घडुच नयेत म्हणून आधीपासूनच काळजी घ्यावी. यात्राकाळात समस्या, अडचणी दूर करण्याच्या दृष्टीने सर्वांनी जबाबदारीने काम करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी श्री. गायकवाड यांनी शेवटी केल्या.
मांढरदेव यात्रेसाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने जबाबदारी पार पाडा : अप्पर जिल्हाधिकारी
RELATED ARTICLES