सातारा : सन 2004 ते 2009 या काळात मी आमदार असताना 2009 ला मी खळे येथील वांग नदीवरील कामांस मंजुरी आणली होती. 2009 ला दुर्दैवाने माझा पराभव झाल्यानंतर या बंधा-याचा एक दगडही तालुक्याच्या माजी आमदारांना हालविता आला नाही. हे या विभागाचे दुर्दैव म्हणावे लागेल पण मी परत आमदार झाल्यानंतरच खळे येथील कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-याच्या कामांस सुरुवात होत आहे. माझेत ती धमक असल्यानेच मी या कामासाठी शासनाकडून निधी मंजुर करुन आणू शकलो असे प्रतिपादन आमदार शंभूराज देसाई यांनी केले.
खळे ता.पाटण येथे कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत वांग नदीवर कोल्हापुर पध्दतीचा बंधारा बांधणे या कामाचा शुभारंभ व आमदार शंभूराज देसाई यांच्या फंडातून उभारण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीचे उदघाटन आणि ग्रामपंचायत खळे यांच्या वतीने ग्रामस्थांना तालुक्यात प्रथमच उभारण्यात आलेल्या 5 लिटर स्वच्छ पाणी देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ अशा संयुक्तीत कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, शिवदौलत सहकारी बँकेचे चेअरमन मिलींद पाटील,कारखान्याचे माजी चेअरमन डॉ.दिलीपराव चव्हाण, पाटण पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.वनिता कारंडे, माजी सभापती डी.आर.पाटील,गटनेते पंजाबराव देसाई, सदस्या सौ.सिमा मोरे,नारायण कारंडे,ढेबेवाडी सरंपच संदीप टोळे, उपसरपंच सौ.सुमन सकपाळ, सोसायटी चेअरमन बाळासाहेब पानवळ, माजी सरपंच नामदेव पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळातंर्गत लघू पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बोडके, उपअभियंता दाभाडे या प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना आमदार शंभूराज देसाई म्हणाले, खळे येथे वांग नदीवर कोल्हापुर पध्दतीचा बंधारा व्हावा अशी या गावातील व विभागातील नागरिकांची व शेतक-यांची अनेक वर्षांची मागणी होती सन 2004 ते 2009 या कालावधीत मी पहिल्यांदा आमदार झालेनंतर सन 2009 मध्ये दि.23/03/2009 रोजी मी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून या कोल्हापुर पध्दतीच्या बंधा-याच्या कामांस प्रशासकीय मान्यता घेतली होती या कामांस 2 कोटी 35 लाख 90 हजार रुपये रक्कमेस मान्यता मिळाली होती. दुर्दैवाने 2009 ला माझा विधानसभेला पराभव झाला आणि मी मंजुर करुन आणलेले या बंधा-याचे काम कामास काम मंजुर असूनही माजी आमदारांना प्रत्यक्षात सुरुवात करता आली नाही. जे काम मी मंजुर करुन आणले तेच काम मी परत आमदार झालेनतंरच होत आहे यावरुनच माझेअगोदरचे आमदार किती निष्क्रीय होते हे स्पष्ट होत आहे. 2009 ते 2014 या पाच वर्षाच्या कालावधीत 2009 ला मंजुर झालेल्या या बंधा-याचा एक दगडही माजी आमदारांना हालविता आला नाही.यावरुनच त्यांच्या कामाची माहिती जनतेसमोर येत आहे. जनतेला दिलेला शब्द पाळण्याची आणि तो शब्द पुर्ण करुन दाखविण्याची धमक फक्त माझ्यात आहे म्हणूनच मी परत आमदार झालेनंतर या कामांस प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. असे सांगून ते म्हणाले, खळे असो, काढणे असो हा भाग 2009 ते 2014 या कालावधीत कुठे होता आणि आता या तीन वर्षात कुठे आहे काढणेपासून खळयापर्यंत सुमारे 4 कोटी रुपयांचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून सध्या सुरु आहे. काढणे गावाजवळ 5 कोटी रुपयांचा मोठया पुलाचे काम मंजुर झाले असून हे काम निविदास्तरावर आहे त्या कामांस लवकरच सुरुवात होत आहे. हा विकास नाहीतर आणखी दुसरे काय आहे. परंतू माजी आमदार आणि त्यांचे सुपुत्र हे मी नुसत्याच विकासाच्या थापा मारत असल्याचे तालुकाभर सांगत सुटले आहेत हे पितापुत्र तालुक्याचे ठिकाण असणारे त्यांचे गांव सोडत नाहीत त्यांना तालुक्यात सुरु असणारी कामे कशी दिसणार असा सवाल करुन ते म्हणाले आज आपण भूमिपुजन केलेला बंधारा 3 कोटी रुपयांचा, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत सुरु असणारा काढणे ते खळे रस्ता 4 कोटी रुपयांचा आणि काढण्याचा पुल 5 कोटी रुपयांचा म्हणजे या 10 किलोमीटरच्या अंतरातच सुमारे 11 ते 12 कोटी रुपयांची कामे सुरु आहेत तर काही सुरु होत आहेत.
मी परत आमदार झाल्यामुळे खळे बंधा-याचे काम सुरु : आ. देसाई
RELATED ARTICLES