पाटण:- ( शंकर मोहिते) पाटण तालुक्याचे राजकारण म्हणलं की समोर येते देसाई -पाटणकर यांचा राजकीय संघर्ष हा संघर्ष सातारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्याला परिचित आहे.या दोन राजकीय गटातून विस्तव ही जात नसताना सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाला प्रथमच आमदार शंभूराज देसाई यांना उदघाटक, विधानपरिषदेचे आमदार नरेंद्र पाटील यांना या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून दस्तुरखुद्द या कार्यक्रमाचे संयोजक विक्रमबाबा पाटणकर यांनीच निमंत्रित केल्याने अनेकांच्या भुवई उंचावल्या आहेत.पाटण मध्ये प्रथमच एका सामाजिक कार्यक्रमाच्या निमिताने शंभुराज देसाई, नरेंद्र पाटील, विक्रमबाबा पाटणकर एकाच व्यासपीठावर येत आहेत. अगोदरच राष्ट्रवादी विरोधात नाराज असलेले विक्रमबाबा पाटणकर यांनी आमदार देसाई आणि आ. पाटील यांना निमंत्रित केल्याने पाटण मध्ये नवी राजकीय समीकरणे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाटण तालुका म्हटले की पाटणचे राजकारण सर्वप्रथम समोर येते ते पाटणकर- देसाई गटातील संघर्ष या संघर्षात अधुन- मधुन प्रवेश असतो तो माथाडी कामगार नेते आमदार नरेंद्र पाटील यांचा या संघर्षमय राजकीय वातावरणात एन्ट्री होऊ लागली आहे ती सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांची. विक्रमबाबा पाटणकर यांनी सामाजिक उपक्रम म्हणून आपले वडील स्वातंत्र्य सैनिक कै. बाळासाहेब ( भडकबाबा ) पाटणकर यांच्या स्मरणार्थ पाटण शहरात सुरू केलेले साहित्य संमेलन तिसऱ्या पर्वात प्रवेश करत आहे. या तिसऱ्या साहित्य संमेलनानिमित्त एका व्यासपीठावर येणाऱ्या आ. शंभुराज देसाई, आ. नरेंद्र पाटील आणि विक्रमबाबा पाटणकर यांच्या एकत्रित येण्याने पाटण तालुक्यात अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत. या साहित्य संमेलनात सत्यजितसिंह पाटणकर, सारंग पाटील यांनाही समारोपाच्या कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे.
शेवटी हे सार्वत्रिक सामाजिक उपक्रमाचा भाग असलेले साहित्य संमेलन. या साहित्य संमेलनात केवळ राजकीय मंडळींच निमंत्रित नाहीत तर साहित्यिक क्षेत्रातील दिग्गज लेखक, कवी, संपादक, कथाकार, नाटक, सिनेमा क्षेत्रातील कलाकार यांची मांदियाळी पाटण वासियांना अनुभवायला मिळणार आहे. कोणी या साहित्य संमेलनाकडे राजकीय दृष्टीने पाहू नये. असे साहित्य संमेलनाच्या संयोजन समिती कडून सांगण्यात येत आहे.
विकासकामांच्या मुद्यावरून आज ही या मतदार संघात दोन्ही राजकीय गट आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणात गुरफटून आपापल्या गटाचे अस्तित्व टिकविण्याचा प्रयत्नात आहेत.या तालुक्यात देसाई पाटणकर या दोन राजकीय गटामध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता एवढ्या प्रचंड प्रमाणात टिकून राहिला आहे कि या तालुक्यात देसाई- पाटणकर या दोन राजकीय गटांव्यतिरिक्त तिसऱ्या राजकीय शक्तीचा उदय अद्याप तरी येथे झाला नसल्याचे दिसून येते.
मात्र आजपर्यंत माजी मंत्री पाटणकर आणि पाटणकर पुत्र सत्यजितसिंह पाटणकर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे आणि माजी मंत्री पाटणकर यांच्या आजपर्यंतच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे सातारा जिल्हा परिषदे चे माजी अध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांना नुकतेच पाटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ‘चेअरमन’ या पदावर अविश्वास ठराव आणून त्यांना चेअरमन पदावरून पायउतार व्हावे लागल्याने ‘विक्रमबाबा ‘पाटण मधील पाटणकर गटविरोधात काही महिन्यापासून नाराज आहेत.
तशा प्रकारची स्पष्ट नाराजी ही विक्रमबाबा यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली होती.एवढेच नव्हे तर कार्यकाऱ्यांना विचारात घेऊन आपण आपली पुढील राजकीय वाटचाल व दिशा ठरवणार असल्याचे ही त्यांनी जाहीर केले होते.असे असतानाच विक्रमबाबा यांचे वडील स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथी च्या पार्षवभूमीवर ‘विक्रमबाबा’पाटणकर यांनी नवीन राजकीय खेळी करून आजपर्यंत पाटणकर गटाचे राजकीय कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या देसाई गटाचे प्रमुख आमदार शंभूराज देसाई यांनाच साहित्य संमेलनाच्या उदघटनाचे निमंत्रण देऊन राजकीय गुगली टाकली आहे.
स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त यावर्षी शुक्रवार दि. 2 व शनिवार दि. 3 फेब्रुवारीला पाटण येथे ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक 2 रोजी या संमेलनाचे सकाळी अकरा वाजता उद्घाटन होणार आहे. यावेळी जेष्ठ कवी व लेखक प्रा. वैजनाथ महाजन सांगली हे संमेलनाध्यक्ष, आमदार शंभुराज देसाई,यांच्या सहीत तालुक्यातील विविध पक्षांचे अनेक राजकीय नेते यांची प्रमुख उपस्थिती आहे.मात्र या कार्यक्रमाच्या समारोपाला ‘सत्यजित सिंह पाटणकर’ यांना ही निमंत्रण देऊन ‘विक्रमबाबा’नी आपली राजकीय प्रगल्भता दाखवून दिली असल्याने ‘विक्रमबाबा’यांच्या भविष्यातील राजकीय दिशा लवकरच स्पष्ट होण्याचे संकेत मिळत आहेत.
आमदार देसाई आणि विक्रमबाबा यांची यापूर्वी ही भेट झाली आहे.गत आठवड्यातच पाटण बसस्थानक परिसरात आमदार देसाई यांनी आपल्या गाडीतून खाली उतरून भर रस्त्यामध्ये विक्रमबाबा यांच्या बरोबर हस्तांदोलन व चर्चा केल्याचे पाटणवासीयांनी अनुभवले असतानाच पुन्हा थेट पाटणकर यांच्याकडून आमदार देसाई यांना कार्यक्रमाचे निमंत्रचं आल्याने पाटण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या नजरा पाटणच्या आगामी राजकारणाकडे लागल्या आहेत.
एकंदरीत विक्रमबाबा आणि आमदार देसाई यांच्या एकत्र येण्याने मात्र पाटण तालुक्यातील राजकारणात नवी राजकीय समीकरणे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.