सातारा : माजी पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी शांती दूतासाठी विधायक लढा उभारण्याचा संकल्प सोमवारी प्रसार माध्यमासमोर जाहीर केला. त्यांनी ही भूमिका जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासातच शांती दूत पोलीस मुख्यालयासमोरच बसवण्याचे लेखी आश्वासन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सोमवारी दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी पोलीस अधीक्षकांच्या वतीने हे निवेदन सोशल मिडियावर जाहीर केले. कोल्हापुरी पाटलांच्या नादाला न लागता सातारच्या पाटलांनी सातारकरांच्या भावनांची बूज राखल्याने शांतीदूत प्रकरणाच्या वादावर पडदा पडण्याची आशादायक परिस्थिती आहे. चार दिवसा पूर्वी रात्रीच्या अंधारात शांती दूत गुपचूपपणे हटवण्यात आला होता. या प्रकरणाचे तीव्र पडसाद सातार्यात उमटले. प्रसारमाध्यमांनी व परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उचलून धरल्याने जिल्हा पोलिसांवरील दबाव वाढला होता. त्यात अठरा वर्षापूर्वीचे सातार्याचे माजी पोलीस अधीक्षक सुरेश खोपडे यांनी महाराष्ट्रातील मनुवादी प्रवृत्तीच्या आयपीएस अधिकार्यांच्या लॉबीचा परखडपणे भांडाफोड करत सातायात विधायक संघर्ष उभारण्याची घोषणा केली. त्यामुळे सोमवारचा पहिला दिवस धक्कादायक घडामोडींचा राहिला. शांती दूत प्रकरण चिघळणार असे वाटत असताना पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी समजदारीचा यू टर्न घेतला. पोलीस मुख्यालयाचे नूतनीकरण सुरू आहे. त्यामुळे शांती दूत हलवण्यात आला होता. नूतनीकरणाची कामे पूर्ण होताना शांतीचे प्रतिक असणारे कबुतराचे प्रतीक पोलीस मुख्यालयाच्या दर्शनी भागातच मूळ ठिकाणी बसवले जाईल अशी स्पष्ट ग्वाही संदीप पाटील यांनी सातारकरांना दिली आहे.