कराड: मला पंचायत समितीच्या निवडणुकीत विभागातील कार्यकर्त्यांनी जातीयवादी पक्षाबरोबर आघाडी करण्याबाबत दबाव आणला. परंतु त्या दबावाशी तडजोड न स्वीकारता मी यशवंत विचाराचे प्रतिनिधी पंचायत समितीत निवडून जावेत, हा विचार जपला. त्यामुळे येत्या निवडणुकांमध्ये कराड दक्षिणमध्ये काँग्रेस आघाडीचा धर्म पाळणार आहे, अशी ग्वाही आ. बाळासाहेब पाटील यांनी दिली.
वहागाव (ता. कराड) येथील वहागाव विकास सेवा सोसायटीच्या नुतन इमारत व जिल्हा सहकारी बँकेच्या शाखा उदघाटन समारंभात ते बोलत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अजितराव पाटील-चिखलीकर, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन अॅड. अमृतराव पवार, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे संचालक माणिकराव पाटील, संजय जगदाळे, युवा नेते इंद्रजीत चव्हाण, पंचायत समिती सदस्य नामदेव पाटील, प्रणव ताटे, माजी सदस्य भास्करराव पवार, बाळासाहेब पवार, सरपंच शकुंतला पुजारी, सह्याद्री सहकारी बँकेचे संचालक संभाजीराव पिसाळ, संजय पिसाळ, प्रतापराव देशमुख, विकास सेवा सोसायटीचे व्हाईस चेअरमन संभाजी पवार यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. पाटील म्हणाले, शेतमालाला हमीभाव देण्यासाठी केंद्र व राज्यातील भाजप सरकार काही करत नाही. पण दुसर्या बाजूला शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याची केवळ आश्वासने देत आहेत. केवळ भावनेवर आधारीत त्यांचे काम सुरु आहे. केंद्रातील सत्ता घेण्यासाठी प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करण्याचा त्यांनी जुमला केला. सत्ता बदल झाल्यानंतर जेव्हा त्यांनी परदेशात जाऊन काळा पैसा शोधला तेव्हा त्यांना काहीच सापडले नाही. यावर त्यांनी नोटबंदीचा निर्णय घेतला. लोकांची गैरसोय समजून न घेता असे अनेक प्रयोग केले, याचाही विचार करणे गरजेचे आहे.
ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विचाराचे सरकार आले पाहिजे. काँग्रेसच्या विचारांमुळे लोकांच्या विकासात परिवर्तन झाले. हे कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. राज्य सरकार अरबी समुद्रात उभारल्या जाणार्या शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत सतत निकष बदलत आहे. यामध्ये ते स्मारकाची चेष्टा करत आहेत. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ताकदवान लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. लोकशाही टिकवायची की पुन्हा पेशवाईकडे वळायचे हे येत्या लोकसभा निवडणूकीत ठरवण्याची वेळ आली आहे. देशात समता टिकवण्याचे काँग्रेसचे विचार आहेत. परंतु लूट केलेल्या पैशाच्या जीवावर येत्या लोकसभा निवडणूकीत मते विकत घेण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे शाहू, फुले व आंबेडकरांचे विचार राहणार की नाहीत याची भीती वाटते. ते म्हणाले, गेल्या पाच वर्षातील पापाचे शालन करण्यासाठी प्रत्येकाच्या खात्यावर सहा हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. यामध्येही हातचलाखी करुन ही रक्कम टप्प्या-टप्प्यामध्ये विभागली आहे. गेल्या वर्षात एक कोटींपेक्षा जास्त रोजगार कमी झाले. कृत्रिम बुध्दीमत्तेमुळे यामध्ये आणखी घट होणार आहे. अजितराव पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, आबासाहेब पार्लेकर, आण्णाजी सावकर यांच्यासारख्या महान विचारांच्या नेत्यांची समाजात पोकळी असल्यामुळे कुणाच्या मांडीवर विश्वासाने मान ठेवावी. असा प्रश्न उपस्थित होत असताना पृथ्वीराज चव्हाण व बाळासाहेब पाटील यांच्या मांडीवर जनतेने विश्वासाने मान ठेवावी. लोकसभा व विधानसभा निवडणूकीत वहागावातून काँग्रेसला मताधिक्य मिळेल. कुलदीप पवार यांचे भाषणे झाले. प्रारंभी अकबर मुल्ला व धनाजी पवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अॅड. अमृतराव पवार यांनी प्रास्ताविक केले. आनंदराव जानुगडे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप पवार यांनी आभार मानले.
कराड दक्षिणमध्ये काँग्रेस आघाडीचा धर्म पाळणार : आ. पाटील
RELATED ARTICLES

