मुंबईस्थित कराड दक्षिणकर मेळाव्याला उदंड प्रतिसाद; अतुलबाबांच्या विजयाचा निर्धार
कराड: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी जे माथाडी कामगारांचे नेते एकमेकांच्या विरोधात होते, ते सर्व कराड दक्षिणचे भाजपाचे उमेदवार ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विजयासाठी मात्र एकत्र आल्याचे चित्र रविवारी (ता. 29) मुंबईत दिसून आले. निमित्त होते, अतुलबाबांच्या प्रचारार्थ मुंबईस्थित कराड दक्षिणकर नागरिकांच्या स्नेहमेळाव्याचे..
मुंबईत कामानिमित्त स्थलांतरित झालेल्या कराड दक्षिणमधील नागरिकांची संख्या मोठी आहे. या मतदारांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने ना. डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबईतील माथाडी भवनमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या व्यासपीठावर ठाण्याचे माजी खासदार संजीव नाईक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. नरेंद्र पाटील, महाराष्ट्र माथाडी कामगार युनियनचे सरचिटणीस बळवंतराव पवार, माथाडी कामगार नेते पोपटशेठ पाटील, दिपक रामिष्टे, सातारा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष संजय बाबुराव शेटे, नवी मुंबई भाजपाचे उपाध्यक्ष संपतराव शेवाळे, नगरसेविका दमयंती आचरे, भारती पाटील, ओंकार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश ताटे, उद्योजक प्रदीप साळुंखे, चंद्रकांत शेवाळे, राजाराम पाटील, किसन जाधव, अशोक भावके, चंद्रकांत पाटील, पांडुरंग शेटे, एकनाथ तांबवेकर, शंभू गावडे, विलासराव पाटील, अमित शेटे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध माथाडी कामगार संघटनांच्या नेत्यांनी एकाच व्यासपीठावर येऊन अतुलबाबांच्या विजयाचा सोडलेला संकल्प ही घटना लक्षवेधक ठरली आहे. लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माथाडी कामगारांचे नेते ना. नरेंद्र पाटील सातारा लोकसभा मतदारसंघातून उभे होते. मंचावर उपस्थित असलेल्या काही माथाडी कामगार नेत्यांनी त्यावेळी विरोधी उमेदवाराच्या बाजूने काम केले होते. पण सध्या मात्र बहुतांश माथाडी कामगार नेते भाजपात सामील झाल्याने त्यांनी कराड दक्षिणमधून अतुलबाबांनाच विजयी करण्याचा संकल्प या मेळाव्यात बोलून दाखविला.
ना. नरेंद्र पाटील म्हणाले, की जी मंडळी गेल्या निवडणुकीवेळी पलिकडच्या बाजूला होती, ती आज अतुलबाबांच्या बाजुला असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे. अतुलबाबांच्यावर 2014 पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मर्जी आहे. त्यांच्या माध्यमातून अतुलबाबांनी गेल्या 5 वर्षात करड दक्षिणेत एवढा भरघोस निधी आणला आहे, की माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदारांना काही कामच उरलेले नाही. त्यामुळे विद्यमान आमदार आता अतुलबाबांनी आणलेल्या कामांचे नारळ फोडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केली.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीवर टीका करताना माजी खासदार संजीव नाईक म्हणाले, की त्याफ बाबांचा त्रास आम्ही खूप भोगला आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल फार काही न बोललेलंच बरं! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगात भारताची प्रतिमा उंचावली आहे. त्यांचा वसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात सांभाळत असून, आज महाराष्ट्रात सर्वत्र कमळ फुलले आहे. अतुलबाबांना साक्षात विठुमाऊलीचा आशीर्वाद असल्याने त्यांचा विधानसभेत विजय पक्का आहे. माथाडी कामगारांचे नेते बळवंतराव पवार, पोपटशेठ पाटील, संपतराव शेवाळे व संजय बाबुराव शेटे यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामीण भागात विकासाची गंगा पोहचविण्यासाठी अतुलबाबांना विधानसभेत पाठविणे गरजेचे असून, मुंबईस्थित कराड दक्षिणमधील सर्व जनता अतुलबाबांच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेल आणि त्यांना विजय नक्कीच मिळवून देईल, अशी ग्वाही दिली.
ना. डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान अण्णासाहेबांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजारा आरक्षण देऊन खर्या अर्थाने अण्णासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले आहे. सर्व प्रमुख माथाडी कामगार नेत्यांचे मला भक्कम पाठबळ लाभल्याने माझा आत्मविश्वास दुणावला आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेताना, भाजपा सरकारच्या माध्यमातून कराड दक्षिणमध्ये रस्ते, पाणीपुरवठा योजनांची कामे मार्गी लागलेली आहेत. विकासाची घौडदौड अशीच कायम ठेवण्यासाठी आपल्या सर्वांची साथ मिळावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मत्स्य व्यावसायिक विलासराव पाटील, अमित शेटे यांनीही मनोगत व्यक्त केले. संजय शेवाळे यांनी स्वागत केले. संजय शेटे यांनी प्रास्तविक केले. पंकज पाटील यांनी आभार मानले. यावेळी मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील कराड दक्षिणचे मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अतुलबाबांच्या विजयासाठी मुंबईत एकवटले माथाडी नेते
RELATED ARTICLES