कराड: मी विरोधकांना मुळीच घाबरत नाही. केंद्र व राज्यातील चारीही सभागृहाचा मी सदस्य होतो. त्यामुळे मी निवडणुकीतून पळ काढणारा पैलवान नाही. आणि मी कधी रडणारही नाही. समोरच्या विरोधी उमेदवाराने स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी किती पक्ष बदलले. राजकीय सत्तेसाठी एकदा कराड उत्तर झाले. नंतर कराड दक्षिणेत ते आले. आणि पुन्हा ते दक्षिणेतून लढत आहेत. त्यांचे हे सत्तेसाठीचे दलबदलू धोरण कराडची जनता कधीच खपवून घेणार नाही. असा घणाघात करत अतुल भोसलेंच्या पराभवाची हॅट्रीक करा. असे आवाहन आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. त्याचबरोबर कराड दक्षिणेच्या वेगवान विकासासाठी मला साथ द्या. अशी सादही त्यांनी यावेळी घातली.
शुक्रवारी आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता कराडमधील दत्त चौकामध्ये झालेल्या विराट सभेने झाली. यावेळी ते बोलत होते. कराड उत्तरचे आ. बाळासाहेब पाटील, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्रजीत मोहिते, कृष्णेचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते, सौ. सत्वशिला चव्हाण, बाळासाहेब बागवान, जशराज पाटील यांच्यासह मलकापूर व कराड नगरपालिकेचे आजी-माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे आजी-माजी पदाधिकारी आदिंची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विरोधकांनी आतापर्यंत सत्तेसाठी अनेकदा पक्ष बदलले. वेगवेगळ्या मतदारसंघातून ते उभे राहिले. त्यांना त्यांचा भ्रष्ठाचाराचा पैसा गप्प बसू देत नाही. विरोधक माझी शेवटची निवडणूक आहे, हे म्हणतात. परंतु मी 20 वर्षे खासदार राहिलो आहे. लोकसभा, राज्यसभा, केंद्रीय मंत्री, विधानसभा व विधानपरिषदेचा सदस्य म्हणून काम केले आहे. जनतेच्या आशीर्वादामुळे मला हे यश मिळाले. मी मुख्यमंत्रीही झालो. त्यामुळे मला निवडणुकीची कधी भीती वाटत नाही. आणि मी रडणारा नाही. त्यामुळे माझी चिंता तुम्ही करू नका. तुम्हाला विकास काय असतो हे माहिती नाही. त्यामुळे दलबदलू अतुल भोसलेंच्या पराभवाची हॅट्रीक करा.
आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा हा मतदारसंघ आहे. त्यांच्या विचारांना सोडून जाणार्यांनी त्यांच्या नावाचा वापर करणे योग्य वाटत नाही. पृथ्वीराज बाबांनी मुख्यमंत्री असताना अनेक कामे केली. त्यानंतर आम्ही दोघांनी कायद्याने मिळालेल्या निधीचा मतदारसंघात शंभर टक्के वापर केला. त्यामुळे आम्हाला निष्क्रिय म्हणणार्यांना जनता कधी भुलणार नाही.
डॉ. इंद्रजीत मोहिते म्हणाले, झोपडीचे मालक म्हणून रहा. पण ट्रस्टवरील वाड्याचे चाकर म्हणून जगू नका. समाजाचे नेतृत्व करण्याची लायकी त्यांच्याकडे नाही. समाज नेतृत्व करण्याची पात्रता केवळ पृथ्वीराज बाबा, श्रीनिवास पाटील आणि बाळासाहेब पाटील यांच्याकडे आहे.
अविनाश मोहिते म्हणाले, अतुल भोसले नावापुढे डॉक्टर पदवी लावतात. त्यांनी एखादे तरी इंजेक्शन करून दाखवावे, हे माझे जाहीर आव्हान आहे. भोसलेंनी कामगारांवर खूप दबाव आणला आहे. परंतु कामगारांनी दबावाला बळी पडू नये.
बंडानाना जगताप म्हणाले, मदनराव मोहिते यांचा यशवंतराव मोहिते यांनी मुका घेतला नसता, तर रेठर्याच्या पारावरून सुद्धा तुम्ही उठला नसता. मनोहर शिंदे म्हणाले, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे मलकापूर नगरपालिकेस 7 कोटी व बिगरशेतीचे 14 कोटी रुपयांचे देणे आहे. अशा प्रवृत्तीला मलकापूरच्या जनतेने खड्यासारखे बाजूला काढले. तोच इतिहास पुन्हा करूया. फारूख पटवेकर, शिवराज मोरे, सौरभ पाटील, प्रतीक्षा खोत आदींसह मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी सभेस मतदारसंघातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अतुल भोसलेंच्या पराभवाची हॅट्रीक करा : आ. पृथ्वीराज चव्हाण
RELATED ARTICLES

