Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडी‘लवकरच शेतकर्‍यांना शेती नुकसानीबाबत अनुदान दिले जाईल’

‘लवकरच शेतकर्‍यांना शेती नुकसानीबाबत अनुदान दिले जाईल’

कराड: महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यापर्यंत सततच्या पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळवले, भात, सोयाबीन, भुईमूग, खरीप हंगामी ज्वारी, मका अशा पिकांच्या ऐन काढणीच्यावेळी सतत कोसळणार्‍या पावसामुळे खुप नुकसान झाले. यामुळे तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत होती. तालुका प्रशासनाने शेती नुकसानीचे पंचनामे करत त्याचे अहवाल शासनास सादर केले आहेत. लवकरच शेतकर्‍यांना शेती नुकसानीबाबत अनुदान दिले जाईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात
आले आहे.
काढणीच्यावेळी पावसाने अजिबात उघडीप न दिल्याने उभी पिके शेतातच सडून गेली. त्यामुळे शेतकर्‍यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. त्यानंतर तातडीने तहसीलदार, महसूल विभाग आणि तालुका कृषी अधिकार्‍यांच्या बैठकीत बाधित गावांची संख्या जारी करण्यात आली. तालुक्यातील 216 गावांना पावसाचा फटका बसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गावनिहाय शेती नुकसानीचे पंचनामे करणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले.
गावांमधील तलाठी, ग्रामसेवक, आणि कृषी अधिकारी यांना त्या त्या गावांमधील सरपंच, पंचायत समिती सदस्य आणि मंडळांच्या सहकार्याने प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन शेती नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सुचना दिल्या.
त्यानुसार एकूण 1639.54 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. यात 1541 शेतकर्‍यांच्या भात पिकाचे 243.97 हेक्टर क्षेत्र, 2741 शेतकर्‍यांच्या सोयाबीन पिकाचे 667.81 हेक्टर क्षेत्र, 1415 शेतकर्‍यांच्या भुईमूग पिकाचे 245.62 हेक्टर क्षेत्र, 497 शेतकर्‍यांच्या खरीप हंगामी ज्वारी पिकाचे 111.91 हेक्टर क्षेत्र, 87 शेतकर्‍यांच्या मका पिकाचे 14.19 इतर पिकांचे 56.04 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचे महसूल कडून सांगण्यात आले.
गंभीर बाब म्हणजे 7194 शेतकर्‍यांपैकी फक्त 53 शेतकर्‍यांकडे पिकविमा होता ही माहिती समोर आली आहे. तालुक्यातील 216 गावांतील 7194 शेतकरी ओल्या दुष्काळाने बाधित आहेत.
कराड तालुक्यातील 216 गावांच्या शेती नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. सतत पडणार्‍या पावसाने संपूर्ण भात पीक सुमारे 15 दिवस शेतात पाण्यात बुडले होते. आता त्यातच भात उगवून आल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. साळशिरंबे येथील संतोष पाटील यांचे सोयाबीनचे पिक शेतातच पूर्णपणे सडून गेले आहे. सोयाबीन काढणीवेळी 15.20 दिवस पाऊस थांबलाच नाही. त्यामुळे सोयाबीन पीक हातातून गेल्याचे पाटील यांनी सांगितले.
कृषी विभागाने सांगितले की जुलै.ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने नुकसानीचे पंचनामे ऑगस्टच्या शेवटी शासनाला सादर केले आहेत. तसेच ऑक्टोबरचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उभी पिके, बांधावर ठेवलेली पिके, पावसातच मळणी झाल्याने खराब पिके अशा सर्वच पिकांचा पंचनामा झाला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular