जनशक्ती आघाडीत फुट; भाजपमध्ये बेदिली
कराड: विधानसभा विनडणुकीच्या आचारसंहितेमुळे विलंबाने झालेल्या येथील नगरपालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजप व जनशक्ती या दोन्ही आघाडयांमधील मतभेद चव्हाटयावर आले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे व भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर यांच्यात जोरदार खडाजंगी झाली, तर जनशक्तीचे उपनगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांनी समर्थक चार नगरसेवकांसह स्वतंत्र बैठक व्यवस्थेची मागणी केली. दरम्यान, महिला व बालकल्याण सभापती स्मिता हुलवान यांनी समाधान होत नसल्याने खुशाल कलम 308 कलमाखाली दाद मागावी, असा सल्ला दिल्याने पुन्हा गदारोळ झाला.
सभेच्या प्रांरभीचे जयवंतराव पाटील यांनी मुख्याधिकार्यांकडे, आमच्या पाच सदस्यांची पुढील सभेपासून सभागृहात स्वतंत्र बैठक व्यवस्था करावी, अशी मागणी केली. त्यावर मुख्याधिकार्यांनी तसे पत्र देण्यास सांगितले. मात्र, पाटील यांच्या या मागणीने सभागृहातील सदस्यांमध्ये खळबळ उडाली. जनशक्ती आघाडीत गंभीर वातावरण झाले. तोपर्यंत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर बोलायला उभे राहिले. चार महिन्यानंतर सभा होत आहे. 24 ऑक्टोबरला आचारसंहिता संपली. नगराध्यक्षांना फिरायला वेळ आहे. त्यांना सभा काढण्यासाठी वेळ नाही की अधिकार नाही. असा खोचक सवाल त्यांनी केला. यावरुन नगराध्यक्षा संतापल्या. अण्णा मी तुमच्या वयाचा आदर करते. माझा अधिकार मला कळतो. काय शोभते, काय शोभत नाही, हेही समजते. तुम्ही प्लॅनिंग करुन सभागृहात येऊन बसलात, असे त्यांनी सुनावले. यावर पावसकर हेही आक्रमक झाले. मी योग्य तेच बोललो. वेडेवाकडे बोललेला नाही. सभेस विलंब का झाला, असे ते म्हणाले. वाद वाढत चालल्याने सभाध्यक्षांनी, विषय पत्रिकेवरील विषय घेण्याची सूचना केली. मात्र पावसकर ऐकायला तयार नव्हते. नगराध्यक्षांच्या नातलगाने आपणावर पोलीस केसची धमकी दिली होती, असा गौयस्फोटही केला होता. शवेटी मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी खुलासा केला. विधानसभेच्या आचारसंहितेनंतर 5 नोव्हेंबरपर्यंत शासकीय सुट्टया होत्या. त्यानंतर महिनाभरात सभा घेतली आहे, असे सांगितले.
308 च्या वक्तव्याने
गोंधळात गोंधळ
सभागृहात सुरुवातीच्या खडाजंगीने वातावरण तापलेले होते. यातच प्रत्येक विषयावर चर्चा, अवांतर चर्चाही सुरु होती. यात महत्त्वाच्या वाहतूक आराखडयाच्या विषयाच्या मांडणीस विलंब होऊ लागला. त्यामुळे वैतागलेल्या सभापती स्मिता हुलवान यांनी ज्या नगरसेवकांचे सभागृहातील खुलाशांनी समाधान होत नसेल, त्यांनी माहिती घेऊन कलम 308 खाली जिल्हाधिकार्यांकडे दाद मागावी, असा सल्ला दिला. त्यामुळे पावसकर व फारुक पटवेकर पुन्हा खवळले. त्यावरुन पुन्हा गदारोळ झाला. बांधकाम सभापती हणमंत पवार यांनीही आक्रमक होत, तुम्ही फक्त आरोप करणार असाल तर ते ऐकून घेणार नाही, असे सांगितले.
ऐनवेळी निमंत्रण दिल्याचीही तक्रार
भूमिपूजन, उद्घाटनाच्या कार्यक्रमांची निमंत्रणे ऐनवेळी, कधीही दिली जात आहेत. पूर्वी सर्क्युलर काढून निमंत्रण दिले जात होते. ती प्रथा मोडीत काढल्याची तक्रार पावसकर, पटवेकर यांनी केली. तर जयवंतराव पाटील यांनी ऐनवेळी निमंत्रण द्यायला आम्ही काय घरगडी आहोत काय, असा सवाल केला. यावर पुढील काळात वेळेत निमंत्रण दिले जाईल, असे स्पष्टीकरण सत्ताधार्यांनी दिले.
कार्वे नाका रस्त्यात
पाच दिवसांत काम सुरु
सभेत भेदा चौक ते कार्वे नाका या रस्त्याच्या कामाबाबत दीर्घ चर्चा झाली. हा रस्ता महामार्ग विभागाकडे असला तरी काम रखडल्याने पालिकेची सोशल मीडियावर बदनामी सुरु आहे. पालिकेने पाठपुरावा करावा. तातडीने काम सुरु करावे, अशी भूमिका वैभव हिंगमिरेंनी मांडली. यावर खुलासा करताना गटनेते राजेंद्रसिंह यादव यांनी, महामार्ग विभागाच्या अधिकार्यांशी बैठक झाली आहे. नगरपालिकेच्या अखत्यारितील कामे आता पूर्णत्वास आली असून येत्या पाच दिवसांत काम सुरु होईल, असे सांगितले.
यापुढे निकृष्ट कामे
होणार नाहीत
सभेपुढे शहरातील निकृष्ट रस्त्यांच्या कामांचा विषय होता. यात दत्त चौक ते प्रीतिसंगम घाट रस्ता व शहरातील अन्य 21 रस्ते निकृष्ट करणार्या दोन ठेकेदारांना दहा दिवसांची नोटीस देऊन रस्ते पूर्ववत दुरुस्त करुन देण्याच्या सूचना देण्याचा ठराव करण्यात आला. संबंधित ठेकेदारांना काळया यादीत टाकून त्यांची अनामत रक्कम जप्त करण्यासह त्यांना उखडलेली खडी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
राजेंद्रसिंह यादव यांनी यापुढे जी कामे होतील, ती चांगली होतील. ठेकेदारास पाठिशी घालणार नाही. जनतेच्या पैशातून कामे होत आहेत. निकृष्ट कामे खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. तर फारुक पटवेकर यांनी, नगरसेवकांपेक्षा सुधीर एकांडेंची लुडबुड जास्त होत असल्याची तक्रार मांडली. यावर मुख्याधिकार्यांनी खुलास करत, स्वच्छता स्पर्धेच्या रँकींगची जबाबदारी त्यांच्याकडे दिल्याचा खुलास केला. विजय वाटेगावकर यांनी स्वच्छ सर्वेक्षणच्या कामांचा विषय मांडला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे विलंबाने झालेल्या येथील नगरपालिकेच्या विशेष सभेत सत्ताधारी भाजप व जनशक्ती या दोन्ही आघाडयांमधील मतभेद चव्हाटयावर आले. त्यामुळे येथील विकासकामांना खीळ बसली असून आता प्रशासन कोणती भूमिका घेते, हे आता महत्त्वाचे ठरणार असल्याची चर्चा आहे.
कराड नगरपालिकेच्या सभेत विविध विषयावर खडाजंगी
RELATED ARTICLES