Monday, June 23, 2025
Homeठळक घडामोडीयेणके-पोतलेच्या वांग नदीवरील पुलाच्या कामास गती

येणके-पोतलेच्या वांग नदीवरील पुलाच्या कामास गती

आ.पृथ्वीराज चव्हाण यांची वचनपूर्ती, वांग खोर्‍यातील महत्वाकांक्षी पुल
कराडः शेणोली स्टेशन ते डिचोली या राज्यमार्गावर येणके व पोतले (ता. कराड) गावांना जोडणारा वांग नदीवर मोठ्या लांबीचा पुल आहे. त्या पुलाची उंची कमी असल्यामुळे तो पावसाळ्यात पाण्याखाली जातो. त्याचबरोबर अरुंद असल्यामुळे वहातूकीस धोकादायक राहत आहे. त्या पुलाची रुंदी व उंची वाढवावी, अशी या भागातील जनतेची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी प्रलंबीत होती.
मध्यंतरी त्या मागणीसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आग्रह धरल्यानंतर आ. चव्हाण यांनी वचनपूर्ती केली आहे. पुलाच्या कामासाठी 8 कोटी 4 लाख 60 हजार रुपयांचा निधी मंजूर आहे. त्या कामास गतीने सुरुवात झाल्यामुळे वांग खोऱयातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पुलाची उंची वाढण्यासह रुंदीदेखील वाढणार असल्याने या विभागातील जनतेच्या चेहऱयावर हास्य उमटले आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे. मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत त्यांनी हजारो कोटींची कामे मार्गी लावत तालूक्याची राज्यात विकासाच्या बाजूने आघाडी नोंदवली. कराडभोवतीच्या रस्त्यांचे चौपदरीकरण केले. त्यामधूनच वांग खोऱयामध्ये कराड ते ढेबेवाडी रस्त्याचे चौपदरीकरण झाले. गत पाच वर्षात आमदार असताना त्यांनी येणके-पोतले येथे वांग नदीवर सुमारे एक कोटी रुपयांचा बंधारा उभारला.
या दोन्ही आश्वासक कामानंतर येणके व पोतलेसह विभागातील जनतेला वांग नदीवरील पुलाची उंची वाढण्यासह रुंदीकरणाच्या कामाच्या मागणीची आ. चव्हाण यांच्याकडून पूर्तता होणे अपेक्षीत होते. आ. चव्हाण यांचे मतदारसंघावर बारकाईने लक्ष असल्यामुळे या पुलासाठी शासनाच्या नाबार्ड-24 अंतर्गत 8 कोटी 4 लाख 60 हजार रुपयांचा भक्कम निधी त्यांना मिळवता आला आहे. शासनाने मंजूर निधीस 15 सप्टेंबरच्या अध्यादेशाद्वारे प्रशासकीय मंजूरी दिली. मंजूर निधीतून पुलाच्या 105 मीटर लांबीसह साडेसतरा मीटरचे सहा गाळे होणार आहेत. रुंदीकरण व उंची वाढवली जाणार आहे. त्याचबरोबर पोचमार्गाकरिता मातीभराव, खडीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण, संरक्षक भिंत, स्मशानभूमीची पुर्नबांधणी तसेच सेवावाहिन्यांचे स्थांनातरण आदी कामे केली जाणार आहेत. पुलाच्या कामास सध्या गतीने सुरुवात आहे. कामाच्या पूर्णत्वासाठी दोन वर्षांचा कालावधी असला, तरी त्याआधीच काम पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकामच्या विशेष प्रकल्पचे उपअभियंता एम. के. पाटील यांनी दिली.
पुलामुळे या विभागातील जनतेच्या प्रलंबीत मागणीला खऱया अर्थाने यश आले आहे. पुलाचे काम दर्जेदार करण्यासाठी आ. चव्हाण प्रयत्नशील राहणार आहेत. यामागे विकासाची कामे चिरकाल टिकली पाहिजेत, असा त्यांचा प्रयास आहे. दरम्यान काम सुरु असताना जुना पुल पाडण्यात येणार आहे. त्यामुळे लगतच्या बाजूहून पर्यायी रस्ता तयार केला जाणार आहे. त्यावरुन प्रवाशी व शालेय वहातूक करणे सोयीचे आहे. परंतु कृष्णा सहकारी साखर कारखान्यास गळितास जाणाऱया आणे, येणके व किरपे येथील ऊस वहातूकीचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्याकरिता कारखान्याने लवकरात लवकर या विभागात ऊस वहातूकीसाठी ट्रॅक्टरांची जादा यंत्रणा देण्याची मागणी सरपंच राधिका कसबे, उपसरपंच नंदा गरुड यांनी केली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular