कराड : केंद्रातील मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने संपूर्ण देशवासीयांची फसवणूक केली आहे. त्यांच्या जनहित धोरणामुळे आज सर्वचजण अडचणीत आले आहेत. शेतकरी, उद्योजक, व्यापारी यांच्या व्यवसायावर टाच आली आहे. देशातील तरूणांच्या हाताला काम नाही. या सरकारने राफेल विमान खरेदीत मोठा भ्रष्टाचार केला आहे. अशा या सत्तेला उलथवून टाका असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी केलेे.
येथील दत्त चौकात रविवारी सायंकाळी आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचार शुभरंभ सभेत ते बोलत होते.
यावेळी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आम. पृथ्वीराज चव्हाण, माजी खासदार श्रीनिवास पाटील, सातारा लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्त आघाडीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आम. जयंत पाटील, आम. मोहनराव कदम, खासदार राजू शेट्टी, आम. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आम. जयकुमार गोरे, माथाडी नेते आम. शशिकांत शिंदे, आ. बाळासाहेब पाटील, आम. विश्वजित कदम, माजी आम. प्रभाकर घार्गे, आम. सुमनताई पाटील, जोगेंद्र कवाडे, आम. आनंदराव पाटील, कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश पाटील, इंद्रजित मोहिते, सत्यजितसिह पाटणकर, राष्ट्रवादी युवा आघाडीचे अध्यक्ष तेजस शिंदे, देवराज पाटील, प्रा. मच्छिद्र सकटे, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आजी-माजी जि.प, प.स सभापती, सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षापूर्व पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार सत्तेवर आले. निवडणुकीत त्यांीनी जनतेला वारेमाप आश्वासने दिली. या आश्वासनांची पूर्तता त्यांनी केली नाही. उलट नोटाबंदी, जीएसटी सारखे निर्णय घेतल्यान देशभरातील उद्योजक, व्यापारी, सामान्य नागरिक मोठ्या संकटात सापडला आहे. व्यापारपेठेत मंदीची लाट निर्माण झाली आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मोदी व राज्यातील फडणवीस सरकारच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत जवळपास 12 हजार शेतकर्यांच्या आत्महत्या झाल्या. शेतकर्यांच्या मालाला भाव नाही. राफेल विमान खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. त्याचा हिशोब द्यायला सरकार तयार नाही. शेतकरी शेतमालाला भाव नसल्याने देशोधडीला लागले. पुलवामा हल्ल्याचा बदला देशाच्या जवानांनी घेतला. मात्र नरेंद्र मोदी याचा फायदा राजकारणासाठी उठवत आहेत, अशी परखड टीका खा.शरद पवार यांनी करून होवू घातलेल्या निवडणुकीत मतदारांनी परिवर्तन करावे असे आवाहन केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मागच्या निवडणुकीत लोकांना स्वप्न दाखवून सत्तेनंतर त्यांचा विश्वासघात केला. सर्वसामान्य लोक, शेतकर्यांना वेठीस धरून त्यांच्यावर अन्यायी धोरणे लादली. मात्र, आणखी पाच वर्षे जर मोदी सत्तेत राहिले तर देशातील लोकशाही संपुष्टात आणून त्याठिकाणी हुकूमशाही निर्माण करतील. परंतु, मागच्या निवडणुकीत मतांची विभागणी झाल्याची चूक आम्ही पुन्हा करणार नसल्यामुळे 2019 च्या निवडणुकीनंतर मोदी पंतप्रधान असणार नाहीत, असा घणाघात त्यांनी केला. तसेच उदयनराजे भोसले यांना गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्त मतांनी विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले.
उदयनराजे भोसले म्हणाले, गत विधानसभा निवडणुकीत मोदींनी विविध आश्वासने देत सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून लोकांची हायटेक फसवणूक केली. परंतु, सत्ता मिळवल्यानंतर मोदी सरकारने लोकांची पिळवणूक करून त्यांच्या स्वप्नांवर महागाईचा नांगर फिरवला. दोन कोटी रोजगार निर्मिती करण्याची हमी देणार्या मोदींनी देशात दोन कोटींपेक्षा जास्त लोकांना बेरोजगार केले आहे. त्यामुळे यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असून या निवडणुकीकडे फक्त कोणालातरी निवडून आणण्यासाठी नव्हे तर एक चळवळ म्हणून पहा. आणि देशातच नव्हे तर राज्यातही सत्तापरिवर्तन करा, असे आवाहन त्यांनी उपस्थित मतदार, नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकार्यांना केले.
यावेळी आ.शशिकांत शिंदे, आ.जोगेंद्र कवाडे, खा.राजू शेट्टी, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भाषणे झाली. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रस्ताविक आम. बाळासाहेब पाटील तर यांनी उपस्थितांचे आभार मानले. दरम्यान, सर्व नेत्यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समधीस्थळास अभिवादन केले.
आम्हीही उदयनराजेंंचे चाहते
उदयनराजे यांची राज्यात मोठी क्रेझ असून त्यांची स्टाईल तरुणांना नेहमीच भुरळ घालत आहे. असे म्हटल्यावर उपस्थितांनी उदयनराजे, उदयनराजे असा जयघोष केला. त्यावेळी त्यांना संबोधित करताना रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, फक्त तुम्हीच उदयनराजेंंचे चाहते नाही, तर आम्हीही त्यांचे मोठे चाहते असल्याचे सांगताच उपस्थितात जोरदार खसखस पिकली. त्यानंतर उदयनराजे यांनी रामराजे माझे कॉलेजपासूनचे चांगले मित्र आहेत. आमची मैत्री आजही अबाधित असल्याचे वक्तव्य केले.
जनताच लोकशाहीची राजे
सध्याच्या जुलमी सरकारने विविध कारणाने जनतेला वेठीस धरण्याचे काम केले आहे. त्यांनी लोकशाहीच मोडीत काढून हुकूमशाही निर्माण करण्याचा चंग बांधला आहे. त्यामुळे ही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हुकूमशाही सरकारला जागा दाखवणे गरजेचे आहे, असे उदयनराजे म्हणाले.