कराड : कथित गुंड पवन दीपक सोळवंडे याची हत्या टोळी युद्धातून झाली असल्याचे निषन्न झाले आहे. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यावरून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यापैकी गोळ्या झाडण्यासाठी फुस लावणार्या दोघाजणांना पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, मयत सोळवंडे यांच्या नातेवाईकांनी हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी करून मृतदेह ताब्यात नकार दिला. व कराड शहर पोलीस ठाण्यात बराच काळ ठिय्या मारून निदर्शने केली. पोलिस उपाधीक्षक नवनाथ ढवळे यांनी आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे, गेल्या दोन दिवसांपासून कराड शहरात गुन्हेगारांनी उचल खाली आहे. मंगळवार पेठेत राहणार्या बांधकाम व्यवसायिक निहाल अल्ताफ पठाण यास अभिनंदन झेंडे, प्रतीक चव्हाण, पवन सोळवंडे, अविनाश काटे, प्रशांत करवले या चौघांनी खंडणी मागितली होती. खंडणीची रक्कम न मिळाल्याने या चौघांनी सोमवारी रात्री तलवारी घेऊन निहाल पठाण यांच्या घरासमोर दहशत पसरली होती. याप्रकरणी निहाल पठाण यांच्या तक्रारीवरून संबंधितांवर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
दरम्यान, मंगळवारी दिवसभर पोलीस पवन सोळवंडेसह त्याच्या अन्य साथीदारांचा शोध घेत होते. मात्र ते पोलिसांच्या हाती लागले नाहीत. मंगळवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पवन त्याच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने मी संध्याकाळी जेवायला परत येतो, असे कुटुंबीयांना सांगितले.
परंतू तो रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घरी आला. तेव्हा घरासमोरच असलेल्या स्वच्छतागृहात तो गेला त्यावेळी त्यांच्या मागावर असलेल्या काही युवकांनी चारचाकी वाहनातून येऊन पवनवर बेछूट गोळीबार करून त्याची हत्या केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत रातोरात घटनास्थळाचा पंचनामा करून शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. बुधवारी सकाळी मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांसह समाज बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत सर्वजण मोर्चाने कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले.
यावेळी पवनचे नातलग व समाज बांधव महिला युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संतप्त जमावाने पोलीसांच्याच सहकार्यामुळे पवनचा खून झाला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणातील आरोपींना साथ करणारे तसेच त्यांना पैसा व शस्त्रे पुरवणारे, याचा पोलिसांनी ताबडतोब शोध घ्यावा. व प्रकरणात दोषी असणार्या सर्व जणांना तात्काळ अटक करावी तसेच त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. यासाठी जमावाने घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली. सुमारे तासभर शहर पोलीस ठाण्याच्या आवारात ठीया मारला होता.